बुधवार, २७ ऑगस्ट, २०२५

चाकरमानी की कोकणवासी? विकासाचं बोला

 -उमाजी म. केळुसकर ⬑ दादागिरी ⬉

कोकण हा महाराष्ट्राचा रत्नजडित प्रदेश. निसर्गसंपन्नता, समुद्रकिनारे, सुपीक शेती, सांस्कृतिक वारसा आणि परंपरा यामुळे कोकणाची ओळख नेहमीच वेगळी राहिली आहे. मात्र रोजगार, शिक्षण आणि व्यवसायाच्या संधींच्या अभावामुळे गेल्या अनेक दशकांपासून कोकणातील लाखो नागरिक मुंबई, पुणे आणि देशभरातील तसेच परदेशातील शहरांमध्ये स्थायिक झाले. या स्थलांतरितांना खुद्द कोकणातले लोकच प्रेमाने ‌‘चाकरमानी‌’ असे संबोधन वापरतात. हा शब्द केवळ संबोधनापुरता नसून तो एका ऐतिहासिक स्थलांतर संस्कृतीचा भाग बनला होता. आता मात्र या शब्दावरून विवाद निर्माण झाला असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे की सरकारी कागदपत्रांमधून ‌‘चाकरमानी‌’ हा शब्द काढून ‌‘कोकणवासी‌’ असा वापर केला जाईल. पण खरी गोष्ट एवढीच आहे का? की हा फक्त शब्दांवरची उठाठेव आहे?

       कोकणातील नागरिकांच्या स्थलांतराला अनेक दशकांचा इतिहास आहे. रोजगार, नोकरी, व्यवसाय, शिक्षण या कारणांमुळे कोकणातील असंख्य नागरिक मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबईसारख्या शहरांमध्ये जाऊन स्थायिक झाले. या सर्वांना एकत्रित करून चाकरमानी ही संज्ञा रूढ झाली. भाषाशास्त्रीय दृष्टीने पाहता या शब्दाला अवमानकारक छटा नाही. उलट मेहनत, सेवा, कष्ट व कामधंदा करणारा असा अर्थ यातून उमटतो. पण कालांतराने भाषेतील अर्थछटा बदलतात आणि काही लोकांना ही संज्ञा अपमानकारक वाटू लागली. त्यामुळे काही संघटनांनी सरकारकडे या शब्दाबाबत आक्षेप नोंदवला. मात्र या शब्दाला असलेला ऐतिहासिक आणि सामाजिक संदर्भ लक्षात घेतला गेला का, हा प्रश्न निर्माण होतो. सरकारने केवळ काही संघटनांच्या दबावाखाली निर्णय घेतला तर व्यापक समाजमानस काय विचार करेल? कोकणवासीयांची खरी मागणी रोजगार, उद्योग, पायाभूत सुविधा, शैक्षणिक संधी या क्षेत्रात आहे. जर सरकारने फक्त शब्दांवर बदल करून लोकांना समाधान दिल्याचा दिखावा केला तर ही लोकांची दिशाभूल ठरेल. कोकणातून स्थलांतरित झालेल्या पिढ्या या शब्दाशी भावनिकदृष्ट्या जोडलेल्या आहेत. त्यांच्या कष्टकथांना, संघर्षाला हा शब्द ओळख देतो. त्यामुळे अशा बदलांना संवेदनशीलतेने व ऐतिहासिक भान ठेवूनच वळण द्यायला हवे. 

        कोकणवासी सगळे ‌‘चाकरमानी‌’ म्हणून ओळखले गेले. या शब्दामध्ये कमीपणाचा सूर आहे का, हे कधीच गंभीर चर्चेचे कारण झाले नाही. उलट, ‌‘चाकरमानी‌’ हा शब्द भावनिक नात्याने कोकणातील मूळगावी आणि शहरातल्या माणसातला दुवा ठरला. मुंबई-पुण्यात,  इतर जिल्ह्यात स्थायिक झालेल्या लोकांनी दरवष गणपतीत, दिवाळीत, लग्नसमारंभात गावाकडे जाण्याची परंपरा जपली आणि ‌‘चाकरमानी‌’ हेच त्यांचं अस्सल ओळखचिन्ह बनलं. कोकणवासीयांच्या काही संघटनांनी या शब्दावर हरकत घेतली, या संघटना कोणत्या आहेत, हे काही समोर आलेले नाही. त्यांचे म्हणणे असे की ‌‘चाकरमानी‌’ हा शब्द सेवकत्व दाखवतो, त्यामुळे तो अपमानकारक आहे. नागरिक हे ‌‘कोकणवासी‌’ आहेत, त्यांना कमीपणा दाखवणारे टोपणनाव नको. ही मागणी सरकारकडे गेली आणि उपमुख्यमंत्र्यांनी तत्परतेने ती मान्यही केली. पण प्रश्न असा आहे की, हा आक्षेप खरोखर सर्वसामान्य कोकणवासीयांच्या मनात होता का? की काही संघटनांनी मुद्दाम यावरून विषय रंगवला? आजही मुंबईत किंवा पुण्यात राहणारे हजारो कोकणवासी स्वतःला प्रेमाने ‌‘चाकरमानी‌’ म्हणवतात. गावाला जाण्याची वेळ आली की ‌‘चाकरमानी परतलेत‌’ असा आनंद व्यक्त होतो. लग्नकार्यात, जत्रेत किंवा गणपतीच्या वेळी गावोगाव हीच ओळख त्यांच्या अभिमानाचा भाग ठरते. मग असा शब्द जबरदस्तीने अवमानकारक ठरवण्याची काय गरज?

       आज कोकणाची खरी समस्या रोजगाराची आहे. उद्योग नाहीत, शेतमालाला हमीभाव नाही, पायाभूत सुविधा नाहीत, आरोग्य व शिक्षणाची वानवा आहे. दरवष महापुरामुळे जनजीवन उद्ध्वस्त होते. मुंबई-गोवा महामार्गाची कामे दशके लांबत आहेत. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील गावे रिकामी होत आहेत. युवक रोजगाराच्या शोधात पुणे-मुंबईत स्थायिक होतात, तर वृद्ध आणि स्त्रिया गावात उरतात. या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष नसून शब्दांवर उठाठेव केली जात आहे. ‌‘चाकरमानी‌’ शब्द वापरायचा की ‌‘कोकणवासी‌’, हा मुद्दा प्रत्यक्षात कोकणातील लोकांच्या जिव्हाळ्याचा नाही. त्यांना रोजगार द्या, महामार्ग वेळेत पूर्ण करा, शेतकऱ्यांना बाजारपेठ द्या, शिक्षणसंस्था उभारा, उद्योग क्षेत्र विकसित करा  हीच खरी मागणी आहे.

     कोकणवासी जेव्हा ‌‘चाकरमानी‌’ म्हणून गावाकडे परततात, तेव्हा ते केवळ स्थलांतरित नसतात तर गावाचा अभिमान असतात. ते मुंबईत वा पुण्यात कितीही मोठे झाले तरी गावाशी त्यांचे भावनिक नाते अबाधित राहते. ‌‘चाकरमानी परतलेत‌’ हा आनंदोत्सव असतो. यात कुठलाही कमीपणा नसून उलट जिव्हाळा आहे. या परंपरेत भावनिक उब आहे. शब्द बदलून तो वारसा नष्ट होईल का? असा प्रश्न पडतो. शब्द बदलण्याचा हा निर्णय राजकीय आहे की सामाजिक, यावरही शंका उपस्थित होते. कारण सामान्य कोकणवासींच्या दैनंदिन जीवनात ‌‘चाकरमानी‌’ या शब्दामुळे कुठेही अपमान किंवा न्यूनगंड दिसत नाही. काही संघटनांच्या मागण्या तातडीने मान्य करून सरकारने केवळ गाजावाजा केला की काय, अशीही शंका येते. याउलट, कोकणवासीयांच्या खऱ्या समस्या  महामार्ग, आरोग्य सेवा, उद्योग, पायाभूत सुविधा  याकडे दुर्लक्ष झालेले दिसते. चाकरमानी संबोधन कोकणवासियांनीच स्थलांतरीत कोकणकरांसाठी वापरला आहे. या शब्दाच्या भानगडीत पडून सरकारने मूळ प्रश्न झाकू नये.

       आज कोकणवासीयांना हवे आहे ते सन्मानाने जगण्याचे साधन, रोजगार, उद्योग, पायाभूत सुविधा, शिक्षण आणि आरोग्य. “चाकरमानी“ हा शब्द अपमानकारक आहे की नाही यावर राजकारण करण्याऐवजी कोकणात विकासाचे वारे आणणे हीच खरी गरज आहे. कारण लोकांना शब्दांपेक्षा कृती महत्त्वाची असते. त्याशिवाय कोकणात गेल्या काही वर्षांत अनेक विकास प्रकल्प जाहीर झाले, परंतु प्रत्यक्षात फारच कमी कामे झाली आहेत. त्यामुळे ‌‘कोकणवासीय‌’ या नावाखाली सन्मान मिळाला, तरी पोटापाण्यासाठीची धडपड मात्र तीच राहणार आहे. नाव बदलून विकास होणार नाही, हे वास्तव सरकारने आणि प्रशासनाने मान्य केले पाहिजे. कोकणातील तरुणांना केवळ सणासुदीला गावी परतण्यासाठी नव्हे तर कायमस्वरूपी आपल्या जमिनीवर रोजगार मिळावा, ही त्यांची खरी अपेक्षा आहे. शब्दांच्या गोंधळात ही अपेक्षा दडपली जाणे हा सर्वात मोठा अन्याय ठरेल. त्यासाठी शब्दांच्या आभासी लढाईत अडकण्याऐवजी शासनाने खऱ्या अर्थाने विकासाची ग्वाही द्यावी, हेच सर्वसामान्य कोकणवासीयांचे ठाम मत आहे. आणि हे मत केवळ कोकणापुरते मर्यादित नाही, तर राज्यातील प्रत्येक नागरिकासाठी लागू आहे, कारण शब्दांवरून सन्मान मिळत नाही, तो मिळतो तो प्रत्यक्ष कृतीतून आणि ठोस बदलातून.