उमाजी केळुसकर यांचा अल्पपरिचय

     

     वरिष्ठ पत्रकार, साहित्यिक उमाजी केळुसकर यांनी ३७ वर्षे पत्रकारिता आणि साहित्यसेवा केली. २५ वर्षे दैनिक कृषीवलमध्ये सहसंपादक, त्यांनतर आता १३ वर्षे सा. कोकणनामा या वृत्तपत्राचे संपादक म्हणून पत्रकारिता चालू आहे. त्यांची आकाशवाणीवर अभंग, चमत्कार ही दोन नभोनाट्य सादर झाली आहेत. नाटकांत भूमिका केल्या. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर लिटिल चम्प्स मुग्धा वैशंपायन हिची मुलाखत घेतली आहे. इतिहासा वाक माझ्या पुढे, सम्राट, कधीतरी ही ३ नाटके आणि शिकार, अंतर्दृष्टी, दादाच्या गोष्टी, गोड पाण्याची विहीर, रायगडचे रंगकर्मी, स्व. प्रभाकर पाटील यांचे चरित्र- कथा एका कर्तृत्वाची इत्यादी १५ ग्रंथांची साहित्यसंपदा त्यांनी निर्माण केली. गूढकथा, ऐतिहासिक कथा, बालकथा, बालकादंबरी, कविता हे सर्व प्रकार त्यांनी हाताळले आहेत. तसेच विश्‍वभरारी, दादागिरी, दादाच्या गोष्टी, भ्रमंती, ठसा आणि ठोसा, खारावारा, गूढयात्रा, पुस्तकवेध आदी दैनंदिन आणि साप्ताहिक सदरे त्यांनी विविध वृत्तपत्रांत चालवली आहेत. लोकसत्ता, नवल, हंस, किस्त्रीम, सामना, कथाश्री, किशोर, फुलबाग आदी महाराष्ट्रातील, तसेच अमेरिकेतील महाराष्ट्र मंडळाच्या सावली दिवाळी अंकांतूनही त्यांनी कथालेखन केले आहे. तसेच नवोदितांना आपल्यापरीने व्यासपीठ मिळवून देण्याचे त्यांनी काम केले आहे.
     पत्रकारितेत महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाचा राजामाता जिजाऊ सर्वोत्कृष्ठ पत्रकार पुरस्कार २०१६, रायगड प्रतिष्ठान, वावेचा रायगड गौरव पुरस्कार २०१८, नागोठणे ग्रामीण विभाग पत्रकार असोसिएशनचा ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार २०१६, रायगड प्रेस क्लबचा काळकर्ते शि.म. परांजपे पत्रकारिता पुरस्कार २०१०, ऍड. दत्ता पाटील पत्रकारिता पुरस्कार २०१२, गुरुवर्य सुभानराव राणे पत्रकारिता पुरस्कार २०१४, पोयनाड गौरव पत्रकारिता पुरस्कार २०१४,  साहित्यात रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाचा र.वा. दिघे कोकणस्तरीय साहित्य पुरस्कार २०१०, सह्याद्री साहित्य मंडळाचा गंगाधर पाटील साहित्य पुरस्कार २०१०, मराठा भूषण पुरस्कार २०१९ आणि इतरही अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे. निळू ङ्गुले, बाबा कदम, शिवाजी सावंत, द.मा. मिरासदार, ह.मो. मराठे, दिनकर गांगल, प्रवीण दवणे, वसंत जोशी अशा दिग्गजांकडून त्यांचा गौरव झाला आहे.
     रायगड जिल्हा श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणून, तसेच अलिबाग तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले आहे. स्व. भ.ल. पाटील साहित्य सामाजिक संस्थेच्या अध्यक्षपदी कार्यरत असून त्यांनी २०१८ च्या दुसर्‍या समुद्र साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा