सोमवार, १९ सप्टेंबर, २०११

पोटाचा प्रश्‍न

-उमाजी म. केळुसकर ⬑ ठसा आणि ठोसा ⬉


     काय जमाना आहे हा? लोकांचं पोलिसांच्या पोटाकडे लक्ष असते, इतकेच नव्हे तर केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी देखील आपल्या पोलिसांच्या पोटाकडे गांभीर्याने पाहायला सुरुवात केली आहे. मुळात सुशीलकुमार शिंदे हे एकेकाळी स्वत: पोलिस उपनिरीक्षक होते. त्यांनी नुकतेच आपल्याला पोट वाढलेले पोलिस अजिबात पसंत नाहीत, असे सांगितले. पण सुशीलकुमार शिंदे यांनी राजकारण्यांच्या पोटाबद्दल काही नाराजी व्यक्त केली नाही. तसे सर्वांचेच राजकारण्यांच्या पोटाकडे दुर्लक्ष असते. ते कितीही फुगलेले असले तरी त्याबद्दल कोणाला काही वाटत नाही. उलट त्यांच्याबद्दल विश्वासच लोकांच्या मनात असतो. एखाद्या बुवा- महाराजांवर असावी तशी ही श्रद्धा चिवट असते, त्यामुळे या राजकारण्यांनी कितीही पक्षांतरे केली, तरी जनता त्यांना अंतर देत नाही. नेत्यापाठोपाठ मुकाट जाण्यात तिला धन्य वाटते. 
      हीच जनता नंतर गृहित धरली जाते आणि एकदा जनता गृहित धरली गेली की, तिच्या हाती आश्वासनांशिवाय काहीही उरत नाही. नेत्यांची पोटे फुगत जातात, नशिबाने ती फुटत नाहीत आणि फुटली तर त्यातून काय बाहेर पडेल हे सांगता येणार नाही. नेत्यांवर त्यांच्या समर्थक जनतेचा इतका विश्वास असतो, परंतु पोलिसांचे समर्थक नसल्यामुळे त्यांची फुगलेली पोटे नजरेस भरतात. या पोटांकडे अविश्वासाने पाहिले जाते. या पोटांत काय दडले आहे, याचा अंदाज घेतला जातो. लोकांनी पोलिसांना टार्गेट ठरविले असले, तरी विनोदी लेखकांचे टार्गेट तुंदीलतनू राजकारणीच राहिले आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे. त्यांनी वारंवार लिहिले आहे की, नेतागण किती सिमेंट खातात, किती चारा खातात; पण कधी ढेकरही देत नाहीत. याचा अर्थ, ते सतत अतृप्तच असतात. एक मात्र खरे आहे की, नेत्यांच्या पोटावरील या भाष्याला राजकारण्यांच्या आताच्या पिढीने खूपच गांभीर्याने घेतले आहे. आजकाल सर्वांनी जीम जॉईन केली आहे अथवा एखाद्या योगगुरुला शरण गेले आहेत.
      यात त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे, आपले पंतप्रधान आणि दुसरे भावी पंतप्रधान सपाट पोटवाले आहेत. याचा अर्थ, पोटाबाबत आता खूपच जागृती झाली आहे. त्यामुळे पुढे सगळेच राजकारणी, नेते सपाट पोटांचे दिसले तर नवल नाही. पण, प्रश्न असा आहे की, सपाट पोटे होऊन भ्रष्टाचार, घोटाळे थांबणार आहेत काय? हे पोटपुराण इतपतच मर्यादित नाही. पुरुषांचे पोट परमनंट ङ्गुगते. महिलांचे पोट अल्पकाळासाठी फुगू शकते. भारताच्या बहुसंख्य लोकसंख्येचे पोट आणि गाल दोन्ही पिचलेले आहेत. त्यांच्या पोटातील वेदनेचं कारण आहारातील गडबड नाही, तर भूक, कुपोषण आहे.
लोकसंख्येच्या एका लहानशा भागाला पोट वाढविण्याची सुविधा आहे. त्यांना खाण्यासाठी मेवा-मिठाई, चिकन- बिर्याणी, तूप-लोणी सहजपणे उपलब्ध आहे. या लठ्ठांमुळे योगगुरु, जिमगुरु, डाएटेशियन, सडपातळ करणारं तेल, औषध आणि चहा विकणार्यांची दुकाने धूमधडाक्यात चालतात. टीव्हीवर जाहिरातदार सांगतात की, तुमच्या पोटावर चरबीचे थराच्या थर चढले आहेत.
      वय वाढण्याबरोबरच चरबी जमा होणे साहजिकच आहे. चरबीचा हा अभेद्य दुर्ग भेदणे कठीण आहे. मग आपण जीममध्ये जाऊन घाम गाळा, नाहीतर वेगाने धावा किंवा कपालभाती करा, पोट सपाट होणार नाही. आमचं जादूई तेल किंवा करामती चहाच आपल्याला या लठ्ठपणापासून मुक्ती देऊ शकेल. पंतप्रधान मनमोहन सिंग आणि युवराज गांधी यांचं स्लिम राहण्याचं रहस्य आहे, तेच जाणोत, परंतु हे मात्र खरे आहे की, विवाहापूर्वी अधिकांश पुरुष काडी पेहेलवान असतात. पत्नीचं प्रेम आणि तिच्या हातचं अन्न त्याला ढेरपोट्या बनवतं. या जगात आईच्या प्रेमापेक्षा मोठं दुसरं काही नाही. विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आईचे प्रेम आणि तिच्या हातचं अन्न ज्याला ढेरपोट्या बनवू शकत नाही, त्याला पत्नीच्या हातचं अन्न कसं ढेरपोट्या बनवतं? वयाच्या तीस-बत्तीसाव्या वर्षी जन्म घेणारी ही तुंदीलतनू व्यक्तीला अगदी स्मशानापर्यंत साथ देते. मैत्री, संबंध जरी सुटले तरी हा लठ्ठपणा साथ सोडत नाही. जितका लठ्ठपणावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला जातो, तितका लठ्ठपणा वाढतोच, अशी लठ्ठपणाची ख्याती आहे. त्यामुळे लठ्ठ माणसाला लठ्ठपणासारखा सोबती नाही असे म्हटले तर लठ्ठ माणूस आणि लठ्ठपणा यांचा गौरव केल्यासारखेच आहे. ढेरपोटाबाबत अधिक तणावग्रस्त होण्याची आवश्यकता नाही. लठ्ठपणा असेल तर हार्ट ऍटॅक येईल, मधुमेह होईल. हे होईल ते होईल, असा तणाव मनात निर्माण करु नये.
       जितका तणाव बाळगला जाईल, तितकाच अधिक आहार केला जातो. अतिरिक्त आहार आणि ङ्गुगलेले पोट. ङ्गुगलेले पोट इतकी वाईट गोष्ट नाही. पोलिसवाले जेव्हा गुन्हेगारांबाबत पुरावे शोधत असतात, तेव्हा वाहिन्यांवर दाखवले जाणारे त्यांचे पोट किती सुंदर दिसते. त्यासमोर बिकीनीवालीचं सौंदर्यही ङ्गिकं पडतं. ढेरपोट्या माणूस जेव्हा हसतो, तेव्हा त्याचे हिंदकळणारे पोट पाहून उदास, निराश व्यक्तीही हसण्याची उबळ दाबू शकत नाही. त्याची नाराजी, निराशा छु-मंतर होते. त्यामुळे पोट नाही त्यांनी कुत्सिक हसायचं नाही आणि पोट आहे त्यांनी रुसायचं नाही. ज्यांनी त्यांनी आपापली पोटं सांभाळावी, तेच बरे.

शुक्रवार, २ सप्टेंबर, २०११

राखीची लगीनघाई

-उमाजी म. केळुसकर ⬑ ठसा आणि ठोसा ⬉

  
   राम... राम... योगगुरु रामदेवबाबांशी राखी सावंतला लग्न करायचेय! एखाद्या वृद्धाला खोकल्याची उबळ यावी तशी सावंताच्या राखीला लग्नाची उबळ येते. पण ठसका लागतो, पळ पळ करणाऱ्या बिचाऱ्या वर मंडळींना. या वर मंडळींत रामदेवबाबा स्वत:हून सामील झाले नाहीत आणि होणारही नाहीत. म्हणून राखीनेच त्यांच्यामागे वरमाला घेऊन धावायचं ठरवलं असावं. आपण म्हणाल, राखी रामदेवबाबांना राखी बांधो नाहीतर लग्न करो, त्यात आमचं काय जातेय? कोणाचंच काही जात नाही; पण एक पेच तर निर्माण झाला ना? राखीने रामदेवबाबांच्या ब्रह्मचर्याला खिंडार पाडायचं ठरवलंय म्हटल्यावर कॉंग्रेसनेही सुटकेचा श्वास टाकला आहे. 
     आपल्याला घाम फोडणार्या रामदेवबाबांना राखी सावंत लग्नाची बेडी घालून माणसाळवणार आहे, याचे काँग्रेसला अप्रूप वाटते आहे आणि समाधानही वाटत आहे. ती विचार करते आहे की, रामलीला मैदानावर रामदेवबाबांच्या उपोषणाचा फियास्को करण्यासाठी दिल्ली पोलिसांना कामाला लावण्यापेक्षा एकट्या राखी सावंतला तेथे पाठवलं असतं, तर कोणतीही जीवित आणि वित्तहानी न करता रामदेवबाबांवर लगाम घालता आला असता. त्यामुळे उपोषण पोलिसी बळाने उधळून लावण्याच्या नाचक्कीपासूनही आपण वाचलो असतो. काँग्रेस चुकीचा विचार करीत नाही, परंतु ती आधीच अविचार करुन बसल्याने चूक सुधारायला तिला वाव नाही. अशा परिस्थितीत राखी सावंतच्या निमित्ताने परस्पर काटा निघतोय म्हटल्याने कॉंग्रेस खुश आहे. ब्रह्मचारी बाबा गृहस्थाश्रमी बनला तर त्याला अनुल्लेखानेच मारता येईल, असा कॉंग्रेसचा तर्क असावा. काहीही असो, राखीच्या सैराट मेंदूत हा रामदेवबाबाशी लग्न करण्याचा विचार कसा आला, हे कळणे सोपे नाही, परंतु याप्रसंगाने पुन्हा एकदा इंद्रदेवाने विश्वामित्राची तपश्चर्या भंग करण्यास पाठविलेली अप्सरा-मेनकेची आठवण आली. काळा पैसा परत आणण्याच्या आणि भ्रष्टाचार संपवण्याच्या मोहिमेत गुंतलेल्या बाबांचं ध्यानभंग करण्यासाठी कोण जाणे कोणत्या आधुनिक इंद्राने राखीकडे हे काम सोपवलं असावं. पूर्वी इंद्र तर एकच होता आणि जगजाहीर होता, परंतु आजच्या अति आधुनिक युगात याचा छडा लावणे सोपं काम नाही. कारण आज आपण ज्याला इंद्र समजत असाल, तोही इंद्राचा डमी असणे शक्य आहे. असंही असू शकतं की, आधी टीव्हीमार्फत स्वत:चं एक स्वयंवर केलेली राखी आताही त्याच मूडमध्ये असावी आणि तिला वाटत असावे की, जो प्रसिद्ध, पण अविवाहित आहे, त्याच्याशी लग्न करुन स्वत:चे एक जग निर्माण करावे. यापूर्वी तिच्या रडारवर आजचे सर्वात हॉट तरुण काँग्रेसी पदयात्री होते. तिने सांगितलं की, आधी ती राहुल गांधी यांच्यावर आसक्त होती आणि त्यांच्याशी लग्न करण्याची स्वप्न पाहात होती. परंतु हे चांगलं झालं की, तिच्या वास्तव लवकरच लक्षात आलं की, राहुलच्या मम्मीबरोबर तिची डाळ शिजणार नाही. यानंतर रामदेवबाबांच्या योगाने राखीच्या जीवनावर असा परिणाम केला की, ती त्यांची दिवानी झाली. रामदेवबाबांचं तिला वेड लागलं. हे एकतर्फी प्रेम असलं तरी प्रेमच आहे ना! तिला स्वत:ला किती योग माहीत आहे, हे ती स्वत:च सांगू शकेल, परंतु तिचं म्हणणं आहे की, लग्नाची माला योगगुरुंच्या गळ्यात टाकते, मग पहा. भारतात सौंदर्यवती प्राचीन काळापासूनच योगी आणि संन्याशाकडे आकर्षित होत आल्या आहेत. राखीनेही रामदेवबाबा यांची निवड अशीच केलेली नाही, ती त्यांना सर्वात हॉट मानते. दुसरीकडे, रामदेवबाबाच जाणो, त्यांना या राखीच्या इच्छेबाबत काय वाटते? आपली इच्छा जाहीर करण्यापूर्वी याबाबत रामदेवबाबांचा काय विचार आहे हे राखीने समजून घेतलंच नाही. राखी नावाची कुणीतरी आयटम गर्ल आहे आणि ती तिची आपल्याबरोबर लग्न करण्याची इच्छा आहे, हे ऐकून रामदेवबाबांनी काही प्रतिक्रिया दिली नसली, तरी ते मनातून धास्तावलेच असतील. मिकाने तिचा मुका घेतला तर तिने आकांडतांडव केला; पण तिच जर आपल्यासमोर तोंडाचा चंबू करुन आली तर आपण काय करणार? बरं आहे, ती महाराष्ट्रात आहे. आपल्याकडे येईपर्यंत आपल्याला पलायन करता येईल. पलायन करण्याचा आपल्याला सरावही आहे, असे रामदेवबाबा मनातल्या मनात म्हणत असतील. तथापि, राखीलाही माहीत असावे की, रामदेवबाबा काही आपल्या गळाला लागणार नाहीत, त्यामुळे तिच्या यादीतलं आणखी एक नाव काही दिवसाने पुढे आलं तर त्यात नवल वाटणार नाही. राखीला अशी प्रसिद्धी मिळत आहे, त्यामुळे त्याचा फायदा ती उठवतच राहणार आहे. त्यामुळे तिच्या बोलण्याचं टेन्शन रामदेवबाबांनी घेऊ नये आणि वाचकांनीही घेऊ नये. राखीची वन साइडेड स्टोरी चाललेय ती चालू द्यावी, दुसरं काय?

मंगळवार, ३० ऑगस्ट, २०११

वड्याच्या नामांतराचा पेच

-उमाजी म. केळुसकर ⬑ ठसा आणि ठोसा ⬉



   ‘वडा’ हा पदार्थ काय भांडणाचा आणि भांडण लावायचा आहे? परंतु गेले काही महिने मुंबईत या वड्यावरून राजकारण रंगले आहे. या आठवड्यात तर वड्याच्या राजकारणाने उसळी घेतली, त्यामुळे या वड्याचा सांबार होते की काय वाटण्याजोगी परिस्थिती झाली. बरं हा वडा साधासुधा नाही आणि या वड्याचे पुरस्कर्तेही साधेसुधे नाहीत. एका वड्याचे नाव आहे शिववडा आणि दुसऱ्याचे नाव आहे छत्रपती वडा. मराठेशाहीत जितकी सुंदोपसुंदी झाली नसेल, तितकी या वड्यांवरून सुंदोपसुंदी चालली आहे. 
     दोघा पुरस्कर्त्यांकडे मराठी बाणा आहे. एकीकडे स्वाभिमान आहे तर दुसर्याकडे वाघाची डरकाळी आहे, परंतु दोघे मात्र झुंजीच्या कोंबड्यांप्रमाणे झुंजत आहेत. एवढा वडा मातब्बर कसा झाला? वडा हा पेशवेशाहीची देणगी आहे असं म्हणतात, मग आता पेशवेशाही अवतरली आहे की काय? काहीही असो आता सर्व प्रश्नांपेक्षा वडा महत्त्वाचा ठरला आहे. तो सर्वसामान्यांच्या पोटाची भूक भागवतो. त्यामुळे वडा हा पोटाचा प्रश्न बोलता येईल, परंतु तो अस्मितेचा विषय बनला आहे. अस्मितेचे अनेक प्रकार आहेत. मराठी अस्मिता आहे, भाषिक अस्मिता आहे, हिंदू अस्मिता आहे, मुस्लिम अस्मिता आहे, इतरही अस्मिता आहेत. या अस्मिता वेळोवेळी डोके वर काढत असतात आणि त्यासाठी वाद निर्माण होत असतात, परंतु दोन मराठी माणसे एकाच अस्मितेशी भांडतात, याला विशेष म्हटले पाहिजे. 
      वड्याचे तेल वांग्यावर काढले जाते असे म्हटले जाते, परंतु येथे मात्र उलट आहे. येथे राजकारणाचे तेल वड्यावर ओतले जात आहे. शिवछत्रपतींनाही या राजकारणाची कीव यावी असा हा प्रकार आहे. त्यांच्या नावाचा चांगल्या आदर्शासाठी (आदर्श म्हटला की छातीत धस्स होते!), शौर्यासाठी वापर व्हावा, परंतु येथे त्यांचे नाव वड्यासाठी वेठीस धरले गेले आहे. वडा तोच, पण त्यांची नावे काय शिववडा आणि छत्रपती वडा. अखंड हिंदुस्थानमध्ये भारत-पाकिस्तान अशी फाळणी व्हावी असा हा प्रकार आहे. वड्याचे साहित्य तेच, बेसन, बटाट्याची भाजी. त्यापासून निर्माण झालेला वडा मात्र शिववडा आणि छत्रपती वडा. माणूस प्रांताची फाळणी करतो आता वड्याचीही फाळणी करायला लागला आहे यासारखे दुर्दैव नाही. बरं ही फाळणी करून हा वडा पोटातच जायचा आहे. पोटात तर सर्वधर्म समभाव असतो. तिथे सर्व पदार्थांचे ऐक्य असते. मग असा हा वडा मुंबईचे ऐक्य कसा भंगवू शकतो? यात वड्याचा काही दोष नाही आणि शिवछत्रपतींचाही दोष नाही. हा दोष आहे दोन पक्षातील अहमहमिकेचा. एकाने शिववडा काढला म्हणून दुसऱ्याने छत्रपती वडा काढण्याची गरज नव्हती आणि दुसऱ्याने छत्रपती वडा काढला म्हणून पहिल्याच्या पोटात दुखायचे काही कारण नव्हते. दुर्दैवाने दोघांच्याही पोटात वड्याने दुखणे निर्माण केले आणि वातावरण काहीसे गढूळले. होय, ‘जिथे जिथे ‘शिववडा’ तिथे तिथे ‘छत्रपती वडा’ अशी घोषणा करून स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांनी शिवसेनेच्या ‘शिववडा’ योजनेला प्रत्युत्तर दिले आहे. 
     तथापि, शिववडा अधिकृत असून छत्रपती वडा अनधिकृत असल्याचे मुंबई महापालिकेने म्हटले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि नितेश राणे यांच्यामधील वडा पुराण अधिकच रंगणार यात शंका नाही. वडा बिचारा म्हणत असेल, मी निनावी होतो, तेव्हा काही प्रॉब्लेम नव्हता. आता प्रॉब्लेमच प्रॉब्लेम निर्माण झालेत. माझे मन कोणीच विचारात घेत नाही. माझी विविध नामांतरे झाली तर माझी चव बदलणार आहे की आकार बदलणार आहे? मी तसाच ढोल्या राहणार आहे. आज मुंबईत माझी अशी अवस्था करून ठेवलेय, उर्वरित महाराष्ट्रातही माझी अशीच वेगवेगळी नामांतरे झाली, तर मी ‘घर का, ना घाटका’ राहणार. वड्याच्या या मनोगताने खवय्यांचे हृदय काही पिळवटणार नाही, पण त्यांच्या दृष्टीने वड्याला काहीही नाव दिले तरी वडा हा खाण्याचाच एक पदार्थ असणार आहे. नेत्यांमधील राजकारण कशावरून रंगत नाहीत? खुर्चीवरून नेहमीच राजकारण रंगत आले, वड्यावरून ते आता रंगले आहे. वड्यावरून सत्तेचा सोपान पार करता येईल की नाही, हे माहीत नाही. परंतु या मुद्यावरून दोन्ही पक्षीयांना स्वत:च्या प्रतिमा चमकवता येतील. यात फायदा वड्याचा नाही आणि वड्याच्या चाहत्यांचाही असणार नाही. वड्याला अखेर त्याच्या चाहत्यांच्या पोटात जायचे आहे आणि वडा हल्ली इतका स्वस्त राहिला नाही, त्यामुळे त्याच्या चाहत्यांचे खिसे रिकामे व्हायचे आहेत. फक्त वड्याला नावे देऊन राजकारण करताहेत ते नेहमी वडा खातात काय हाच शेवटी प्रश्न आहे.

शनिवार, २७ ऑगस्ट, २०११

‘जिलेबी’ची व्यथा,‘जलेबी’ची कथा

-उमाजी म. केळुसकर ⬑ ठसा आणि ठोसा ⬉



    माणूस खाण्यासाठी नाही. खाणे माणसासाठी आहे. पाणी आणि अन्न या दोन बाबी माणसाला जीवित राहण्यासाठी आवश्यक आहेत; पण माणूस खाण्यात वैविध्य शोधू लागला आणि विविध खाद्यपदार्थांचा जन्म झाला. आता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की, एका वर्गासाठी खाणं उपलब्ध नाही, त्यामुळे त्याचं कुपोषण होत आहे, तर दुसर्‍या वर्गासाठी खाणं उपलब्ध आहे, त्यामुळे त्याचं अतिरिक्त पोषण होत आहे. खाण्यासाठी जगणार्‍या माणसांची गोष्टच वेगळी आहे. ही माणसे तुम्हाला अनेक ठिकाणी दिसतील. त्यांचे आकारही आपल्याला ठसठशीतपणे पाहायला मिळतील. पण आजचा विषय त्यांच्या आकाराचा नाही. कुपोषणाचा नाही की, अतिरिक्त पोषणाचा नाही. आजचा विषय जिलेबीचा आहे. तिच्या अवमानाचा आहे. गोड आणि रसाळ अशी कमनीय, देखणी जिलेबी, जिभेचे चोचले पुरविते. अशी ही गरीबांना प्रिय असलेली आणि श्रीमंताच्या जिभेची सहचर असलेली जिलेबी, प्रत्येक बाजारपेठेत, अगदी गल्लीबोळातील दुकानात दिसून येते. हलवायांच्या दुकानातून ‘प्रमोट’ होऊन आता जिलेबी चित्रपट जगतातही दाखल झाली आहे. येथूनच सर्व बखेडा सुरु झाला आहे. प्रसिद्ध मिळाली की बदनामी, हा वादाचा मुद्दा आहे, परंतु जिलेबीची इज्जत जरुर लुटली जात आहे.
       ‘जलेबीबाई’च्या रुपात आजकाल चित्रपट जगतात ‘जिलेबी’च्या एका नवीन आवृत्तीने जन्म घेतला आहे. तिने ‘टपोरी’ समाजात जिलेबीची गोडी अधिकच वाढवली आहे. मला वाटते, बॉलिवूडही ‘जिलेबी’चा आणि तिच्या दिव्य स्वादाचा चाहता आहे. त्यामुळेच तर जिलेबीला सोनेरी पडद्यावर आणून उभे केले आहे. श्रीमतांच्या जगाची गोष्ट सोडली तर बिचारा गरीब, सर्वसामान्य माणूस, मिठाईच्या नावावर केवळ जिलेबीचं स्वप्न पाहू शकतो. काजूकतली, बदामपिस्ता यासारखी मिठाई सर्वसामान्यांसाठी बनलीच नाही. या मिठाईची मजा घेण्यासाठी खिशात मोठी रक्कम असली पाहिजे. पण जिलेबीची गोष्टच वेगळी आहे.
     असे असले तरी सुमधुर, कर्णप्रिय आणि गरमागरम देहयष्टीने परिपूर्ण अल्पवस्त्रधारिणी ‘जलेबीबाई’ने आपल्या ठुमक्यांनी खरोखरच प्रेक्षकांना आकर्षित केलं आहे. त्यामुळे मूळ जिलेबीच्या अस्तित्वाचीच चिंता निर्माण झाली आहे. पण, दुदैवाने या प्रश्‍नाची चिंता कोणत्याही भारतीय हलवायाला वाटत नाही. पण जिलेबीची इभ्रत तर वाचवायला हवीच. कोणाला काही वाटो; पण जिलेबी वळणदार असली तरी मी ती साधी आणि सरळ मानतो. तिच्यात काही जोडतोड नाही आणि कृत्रिम गुंतागुंतही नाही, ती ‘जलेबी’बाईमध्ये आहे. जलेबीबाई आपण जिलेबीची प्रतिष्ठा वाढवत असल्याचा आव आणत असल्या तरी त्यात काही अर्थ नाही. जलेबीबाई खवय्यांना आपल्याकडे आकर्षित करुन घेत आहे. त्यामुळे खर्‍याखुर्‍या जिलेबीची वंचना सुरु झाली आहे. तिचा अवमानही होत आहे. परंतु कोणत्याही हलवाई अथवा जिलेबी भक्षणकर्त्यांकडून कोणतीही हरकत घेतली गेली नाही, विरोध प्रदर्शन केले गेले नाही, ही अतिशय दु:खाची बाब आहे. खरेतर ‘हलवाई असोसिएशन’ने एकजूट होऊन उपोषण केले पाहिजे होते.
     तसेही आजकाल उपोषणाचा मोसम सुरु आहे. त्यामुळे जाहीर घोषणा केली पाहिजे होती की, आम्ही जिलेबीशिवाय दुसरं काहीही खाणार नाही. जोपर्यंत निष्पाप जिलेबीच्या नावाचा दुरुपयोग होईल, तोपर्यंत जिलेबीचे चाहते उपोषण, धरणे आंदोलनावर ठाम राहतील. त्यामुळे पोलिस आणि प्रशासनाची झोप उडाली असती. आणि दिल्लीच्या रामलीला मैदानातील बाबाच्या योगशिबिराप्रमाणे ‘जिलेबी मुक्ती आघाडी मोहिमे’वर लाठीचार्ज झाला असता, अश्रूधर सोडला गेला असता, तर संपूर्ण जगाची नजर जिलेबीवर केंद्रित झाली असती. मीडिया सक्रिय झाला असता, जनतेत हाहाकार माजला असता, न्यायपालिकेने ऍक्शन घेतली असती, तेव्हा एखाद्या ‘योग्य’ ऍडव्होकेट महाशयांनी कोर्टात पिटीशन दाखल केेली असती आणि ‘जिलेबी’च्या नावाचा दुरुपयोग आणि जिलेबीच्या लाजलज्जा आणि शीलभंगाचा खटला चालवला असता. बॉलिवूडवर दबाव निर्माण झाला असता आणि त्याला नाईलाजाने कॉपीराइट, सेन्सॉर बोर्डाच्या प्रतिबंधांकडे पाहून समझोता करावा लागला असता. बिचार्‍या जिलेबीला काही नुकसानभरपाई मिळाली असती आणि उपोषणकर्त्यांना प्रसिद्धीही.
       मीडियानेदेखील अशा सरस-रसाळ वृत्ताला ‘लाईव्ह कव्हरेज’ देऊन टीआरपी गगनाला भिडवला असता. पुन्हा एखाद्या चित्रपटनिर्माता-दिग्दर्शकाला यापासून प्रेरणा मिळाली असती. मग त्याने यावर पुन्हा नवा चित्रपट काढला असता आणि बदनामी वादावादीचं सत्रं चालू राहिलं असतं. अशाप्रकारे जिलेबी आणि जलेबीबाईलाही प्रसिद्धी मिळाली असती आणि दोघांचीही दुकानदारी वाढीस लागली असती. पण तसं झालं नाही, हे जिलेबीचे की जलेबीबाईचे दुदैव, हे ज्याचं त्यांने शोधावे.

सोमवार, २२ ऑगस्ट, २०११

उपभोगाचे स्वामी

-उमाजी म. केळुसकर ⬑ ठसा आणि ठोसा ⬉



     सध्या पुट्टपर्थीच्या सत्यसाईबाबांच्या गडगंज संपत्तीची त्यांच्या मृत्यूनंतर मोठी चर्चा सुरु आहे. ही चर्चा फक्त विचारवंतांमध्येच सुरु आहे. सर्वसामान्यांना या चर्चेत रस नाही, त्यांना फक्त श्रद्धा महत्त्वाची वाटते. तसेही त्यांच्या श्रद्धेला नाव ठेवणे योग्य होणार नाही, परंतु धनवान संत कसा असू शकतो याचा विचार तर केला पाहिजे. आपली श्रद्धा असलेली व्यक्ती संताच्या व्याख्येत आणि परंपरेत बसते का हा विचार व्हायला नको? येथेच श्रद्धेची मती कुंठीत होते, आणि अंधश्रद्धेचा मार्ग सुरु होतो.
     साधू-संत, अध्यात्मिक गुरुंची पुरातन काळापासूनची ओळख म्हणजे त्यांची विरक्तवृत्ती आणि एका ध्यासापोटी पत्करलेली खडतर तपश्चर्या. हा ध्यास सकळ मनुष्यजातीचे कल्याण करण्याचा असायचा. ‘जे का रंजले गांजले, त्यांना म्हणावे आपुले’ अशा स्वरुपाचा असायचा. हा ध्यास संत तुकारामांनी घेतला, हा ध्यास संत ज्ञानेश्वरांनी घेतला, हा ध्यास जुन्या सर्वच संतांनी घेतला. आधुनिक काळात संत गाडगे महाराजांनी तर या ध्यासाला कळसच चढवला, पण आजच्या आधुनिक ‘बाबा’ मंडळींनी या ध्यासालाच चूड लावली आणि ते आसन व वासना (मग ती पैसा, प्रसिद्धी कशाचीही असो.) यांत गुरफटले आहेत.
      सर्वसामान्य जनता आर्थिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या लुळीपांगळी बनली आहे आणि ‘कफनी’तले साधू-संत दिवसेंदिवस धनवंत बनत चालले आहेत. अध्यात्मिक गुरुही संपत्तीच्या मोह-लोभापासून सुटलेले नाहीत, हे वास्तव तथाकथित आध्यात्मातील रोग दर्शवणारे आहे. नुकतीच काही बाबा-महाराजांच्या संपत्तीची आकडेवारी प्रसृत झाली आहे, ती थक्क करायला लावणारी आहे. बाबा रामदेव यांची वार्षिक उलाढाल १५००-२००० कोटी रुपये आहे. रविशंकर महाराज यांची वार्षिक उलाढाल ९००-१०० कोटी आहे. आसाराम बापू यांचा वर्षाचा टर्नओव्हर ४०० कोटी रुपये आहे. ‘अम्मा’ अमृतानंदमयी यांची वार्षिक उलाढाल ७००-९०० कोटी आहे. सुधांशू महाराज यांची वार्षिक उलाढाल ३५० कोटी रुपये. या सर्वांचे अनुयायी कोट्यवधी आहेत. कोट्यवधींचे प्रेम मिळवणे ही मोठी गोष्ट ठरते, परंतु कोट्यवधी पैसा मिळवणे ही या बाबा-महाराजांना छोटी करणारी गोष्ट आहे. या मंडळींना कशासाठी पैसा पाहिजे? त्यांना गाडगे महाराजांचे उदाहरण दिले गेले पाहिजे. देव माणूस आणि संत माणूस होऊन जगण्यापेक्षा माणूस म्हणूनच आयुष्यभर सेवा करण्यात गाडगे महाराज यांनी धन्यता मानली. १ फेब्रुवारी १९०५ रोजी बाबांनी सर्वसंग परित्याग केला. तेव्हापासून कमरेला गुंडाळलेले एक वस्त्र, वर ठिगळ लावलेला शर्ट आणि बरोबर पाण्यासाठी एक गाडगं याचं रुपात बाबा सर्वत्र वावरत असतं. तेव्हापासून त्यांना लोक ‘गाडगे बाबा’ म्हणू लागले. सर्वसंग परित्यागानंतर पुढे जवळजवळ बारा वर्षे बाबांनी भारतभ्रमण केले. या भटकंतीतून त्यांच्यात एका समाजक्रांतीकारकाचा जन्म झाला आणि खेड्यापाड्यातून समाजाची सेवा करीत लोकजागृती करणे हेच पुढील आयुष्याचे ध्येय त्यांनी मानले. मला कुणी गुरु नाही आणी मी कोणाचाही गुरु नाही हीच भावना ठेवून त्यांनी समाजाला प्रबोधन केले. समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता या समाजाच्या विरुद्ध गतीतून बहुजन समाजाबाहेर पडावा म्हणून त्यांची सतत धडपड असे. त्यासाठी बाबा समज असणार्यांना शब्दाने फटकारीत तर कधी कधी हातातल्या काठीचा फटका मारुनही शहाणं करीत आणि हे वागणं फक्त शब्दांपुरते मर्यादित नव्हतं, तर हातात खराटा घेऊन बाबा स्वत: गावाची स्वच्छता करुन लोकांना धडा घालून देत असत.
       लोकांकडून मिळालेला पैसा ते समाजालाच अर्पण करीत. आपल्या मृत्यूनंतर पुतळे किंवा स्मारके बनविण्यास त्यांनी मनाई केली, परंतु त्यांनी निर्माण केलेल्या धर्मशाळा, त्यांनी शाळांना केलेली मदत, त्यांनी केलेली समाजजागृती यामुळे गाडगेबाबा चिरस्मरणीय बनले आहेत. त्यांनी कधी प्रवासासाठी एसी गाडी वापरली नाही, पाय हेच त्यांनी आपले वाहन समजले.
      आजच्या बाबा-बुवा-महाराजांकडे वाहनांचे ऐश्वर्य असते, भाविक सेवेकरी असतात. ही ऐश्वर्यवान मंडळी उपभोगशून्य म्हणता येणार नाही, त्यामुळे हा आधुनिक काळ आता उपभोगवादी बुवा-महाराजांचा आहे हे लक्षात येते, त्यामुळे श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला फरक करायला सर्वसामान्य शिकले तरच त्यात त्याचे हीत आहे, असे म्हटले तर वावगे नाही.

शनिवार, १३ ऑगस्ट, २०११

जागृती मोर्चाने व्हावे प्रबोधन

-उमाजी म. केळुसकर ⬑ ठसा आणि ठोसा ⬉



      मुंबईने खूप सोसले आहे आणि अनुभवले आहे. स्वातंत्र्यपूर्व मुंबई आणि स्वातंत्र्योत्तर मुंबईत खूप बदल झाला. मुंबईची अगदी मिसळ की भेसळ झाली, असेही तिच्याबाबत बोलले गेले. पण या मुंबईतून स्वातंत्र्य चळवळीचा हुंकार उठला, संयुक्त महाराष्ट्रासाठी वज्रमूठ उगारली गेली. या मुंबईने अनेक चळवळी, मोर्चे पाहिले; पण आता नव्या स्वातंत्र्यासाठी याच मुंबईत सप्टेंबरमध्ये स्लॅट वॉक म्हणजेच, बेशर्मी मोर्चा निघणार आहे. 
     पाश्चात्य देशांतील अनेक शहरांतून फिरलेला हा बेशर्मी मोर्चा आपल्या देशाच्या राजधानीत, दिल्लीतही नुकताच निघाला होता. दिल्लीपूर्वी हा मोर्चा मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमध्येही निघाला होता, परंतु त्याला इतकं महत्त्व मिळाले नव्हते. कारण जेव्हा हा मोर्चा भोपाळमध्ये निघाला होता, तेव्हा हा आपल्या मीडियासाठी अनाकलनीय शब्द होता. दिल्लीपर्यंत पोहोचता-पोहोचता स्लॅट वॉक आणि बेशर्मी मोर्चा यासारखे शब्द नीट समजू लागले होते, म्हणूनच त्याने दिल्लीच्या बेशर्मी मोर्चाला जास्त महत्त्व दिले. आता सप्टेंबर महिन्यात होणार्या बेशर्मी मोर्चाचे नेतृत्व ती मॉडेल करणार आहे, जिने विश्वचषक क्रिकेट दरम्यान असे म्हणून धक्का दिला होता की, जर भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला, तर ती स्टेडियममध्येच आपल्या अंगावरील सर्व कपडे उतरवून नग्न होईल.
     बेशर्मी मोर्चाच्या रुपाने त्या मॉडेलच्या हाती लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी, प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणखी एक शस्त्र लागलं आहे. काहीही असो, यात शंका नाही की, जगभरच्या महिलांची अवस्था सारखीच आहे. महिला अन्याय, अत्याचाराने पिचलेल्या आहेत. जरी आपण पाश्चात्य देशांचा अपवाद केला, तरी जगाच्या इतर भागांत महिलांची अवस्था ठीक नाही. मुस्लिम देशांत एखादा अपवाद सोडल्यास, सर्व ठिकाणी महिलांबरोबर पशुतुल्य व्यवहार केला जातो. भारताबाबत बोलायचे तर आपला देश जगातील असा चौथा देश आहे की, जेथे महिलांबरोबर सर्वाधिक दुर्व्यवहार केला जातो. महिलांना देवी समजणार्या भारतीय संस्कृतीत त्यांना विविध अन्याय, अत्याचारांना तोंड द्यावे लागत आहे, यासारखा दुसरा विरोधाभास नसावा.
     अजून असं कोणतंही सर्वेक्षण झालेलं नाही, परंतु असे निश्चितपणे म्हणता येऊ शकेल की, भारतात जितके चुटकुले प्रचलित आहेत, त्यातील पन्नास टक्क्यांपेक्षाही अधिक महिलांवरच बेतलेले असतात. हीच मानसिकता विकृत बनत इथपर्यंत आली आहे की, देशाची राजधानी दिल्लीदेखील महिलांसाठी सुरक्षित नाही. एका अंदाजानुसार दिल्लीमध्ये रोज सात महिलांवर बलात्कार होतो आणि छेडछाडीच्या घटना इतक्या आम आहेत की, एक महिला जर चार तासांसाठी घर अथवा कार्यालयाबाहेर राहिली, तर तिली येता-जाताना कमीत कमी दोनशेवेळा पुरुषांच्या विकृत शेर्यांना तोंड द्यावे लागते. ही दिल्लीतीलच परिस्थिती नाही, तर संपूर्ण देशाची आहे. मुंबईही याला अपवाद नाही.
     कार्यालयांत महिलांचे शोषण होते, तर घरांतही तेच होते. कन्या भ्रूणहत्या तर याची चरमसीमा आहे, यात सुशिक्षित आणि सधन कुटुंबंही सामील आहेत. एकीकडे समाजात जितके अपशब्द प्रचलित आहेत, ज्यांचा वापर पुरुष आपसातील भांडतात करतात, ते सर्व महिलांना अवमानित करणारेच असतात, तर दुसरीकडे महिलांविरुद्ध वापरले जाणारे अपशब्द आणि त्यांना केले जाणारे अश्लील इशारे मनोरंजनाचा पर्याय बनले आहेत. चित्रपटांत अधिकांश हेच असतं. तसेच पुरुष महिलांना सल्ला देतात की, त्यांनी कोणता पोशाख करावा आणि करु नये. महिलांची कोण छेड काढतं? पुरुष. त्यामुळे पुरुषांनी आपली मानसिकता बदलली पाहिजे, महिलांचा आदर करणे शिकले पाहिजे, परंतु ते करतात उलटं. ते महिलांना सांगतात की, त्यांनी काय घालावे आणि घालू नये. या सर्व बाबींतून महिलांची स्थिती किती दयनीय आहे, याची जाणीव होते, परंतु ही स्थिती बदलण्याचा उपाय बेशर्मी मोर्चासारखे कार्यक्रम असू शकत नाही. बेशर्मी मोर्चाने महिलांच्या प्रश्नाविषयीचे गांभीर्यच नष्ट होते आणि त्यात केवळ दिखाऊपणाच येतो. महिलांना बेशर्मी मोर्चा नाही, जागृती मोर्चाची आवश्यकता आहे. यासाठी महिलांनी एकजूट व्हावे आणि त्या सर्व विसंगतींविरुद्ध आवाज उठवावा, ज्यांना पुरुषांनी महिलांना दुय्यम बनवण्यासाठी निर्माण केलं आहे. कन्या भ्रूणहत्या, ऑनर किलिंग, हुंड्यासाठी छळ यासारख्या कृत्यांविरुद्ध एकजूट होऊन आवाज उठवला पाहिजे, तरच निश्चितपणे ही परिस्थिती बदलेल. स्लॅटवॉक म्हणजे, बेशर्मी मोर्चा शहरी महिलांचे फॅड आहे, याने काही साध्य होणार नाही.

बुधवार, १० ऑगस्ट, २०११

सचिनची गाडी आणि...

-उमाजी म. केळुसकर ⬑ ठसा आणि ठोसा ⬉
   
    आपल्या देदीप्यमान कामगिरीने भारतभरात सकारात्मक प्रवृत्तीचं प्रतीक बनलेल्या क्रिकेटपटू म्हणजे सचिन तेंडुलकर. अशा या सचिन तेंडुलकर याला भारतीय क्रिकेटसंघाचा कर्णधार धोनी याने एप्रिलमध्ये वर्ल्ड कपची भेट दिली. वर्ल्ड कपमध्ये सचिनची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नसली, तरी त्यातील त्याची उपस्थिती प्राणवायूप्रमाणे होती, त्यामुळे वर्ल्डकपचा आनंद द्विगुणीत झाला असे म्हटले तर त्यात काहीही वावगे नाही. या सर्वांमुळे प्रत्येक भारतीयांच्या मनात सचिनची प्रतिमा हनुमानरायाच्या हृदयातील श्रीरामाप्रमाणे दृढ झाली आहे. म्हणूनच सचिनला भारतरत्न मिळावे अशी प्रत्येक भारतीयाची अपेक्षा आहे. या अपेक्षेबद्दल कोणताही आक्षेप घेता येणार नाही, कारण हिमालयाकडे मान उंच करून पाहताना टोपी गळून पडावी, त्याप्रमाणे सचिनच्या कर्तृत्वाच उंची आहे. 
    या सचिनकडे फेरारी नावाची गाडी होती. फार मानाची गाडी होती. ती वादग्रस्त झाली होती, कारण त्या गाडीची कस्टम ड्युटी माफ करावी, म्हणून सचिनने सरकारकडे केलेल्या विनंतीवर प्रचंड टीकेची झोड उठली होती. धावांचा पाऊस पडणारा सचिन या खेळातून पैशांचा पाऊसही पाडतो, अशा सचिनने कस्टम ड्युटी माफ करण्यासाठी सरकारकडे हात पसरावे, याचे सर्वसामान्य सचिनप्रेमींना निश्चितच दु:ख वाटले. तर सांगण्यासारखे म्हणजे सचिनने ही फेरारी गाडी विकली आहे. फेरारी विकली म्हणजे तिच्या जागी सामान्य गाडी तो वापरणार नाही, हे ओघाने आलेच. सचिनने आता फेरारीपेक्षाही भारी गाडी खरेदी केली आहे. आता तो निस्सान जीटी-आर या लाल रंगाच्या चकाचक सुपर कारमधून सफर करणार आहे. ही कार नुकतीच त्याच्या ताफ्यात दाखल झाली आहे. ताफ्यात अशासाठी की, त्याच्याकडे एकसोएक कारस् आहेत. सर्वसामान्यांकडे एक सायकल असणेही अभिमानाचे असते, त्यामुळे सचिनसारख्या असामान्यांकडे गाड्यांचा ताफा असणे आणि त्याला त्याचा अभिमान वाटत असणे, यात नवल नाही. 
     सचिनच्या निस्सान जीटी-आर गाडीची किंमत ८७ हजार डॉलर्स, म्हणजे सुमारे चार कोटी रूपये आहे. तो त्याच्या घामाचा पैसा आहे. मग तो क्रिकेटमधील असो, त्याच्या हॉटेलमधील असो अथवा त्यांनी केलेल्या जाहिरातीमधील असो, त्याने घाम गाळला आहे, हे नक्की. त्याचे वडील रमेश तेंडुलकर यांनीही अध्यापनात घाम गाळला. विद्यार्थ्यांना घडविणे ही बाब साधी नाही. तेथे गाळला जाणारा घाम दिसत नाही आणि कोणाला त्याकडे गांभीर्याने पहावेसेही वाटत नाही. त्याचे वडील प्राध्यापक असले तरी उत्तुंग प्रतिभेचे कवी होते. त्यांनी कवितेचे चौकार, षट्कार ठोकले, परंतु त्यांचा चाहता वर्ग सीमित राहिला, अर्थात मराठी कवींची, साहित्यिकांची अशीच परिस्थिती असते. प्रसिद्धी आणि पैसा त्यांच्या नशिबी नसतो. प्रसिद्धी मिळाली तरी पैसा नाही, अशी दरिद्री अवस्था बर्याच कवी आणि साहित्यिकांची असते. प्रा. रमेश तेंडुलकर यांची ओळख कवी म्हणून फारच थोड्यांना आहे, ते सचिनचे वडील आहेत हीच त्यांची ओळख आता प्रस्थापित झाली आहे. एका अर्थाने सचिनने आपल्या वडिलांचे नाव उज्ज्वल केले आहे .सचिनने त्यांची कविता घेतली नाही, त्यांचे शब्द घेतले नाहीत, परंतु त्यांची मृदूता घेतली, आक्रमकताही घेतली. कवीमध्ये आक्रमकता असते ती प्रत्यक्ष दिसत नसते, परंतु त्याच्या कवितेत मृदूता आणि आक्रमकता यांचा मिलाफ आढळतो. त्यामुळे वडिलांचे हे दोन्ही गुण सचिनने उचलले. त्याची बोलण्यावागण् यातील मृदूता आणि खेळातील आक्रमकता पाहून हे तेंडुलकरी रसायन वेगळेच आहे, याची जाणीव होते. सचिन हा मध्यमवर्गीय पित्याचा पूत्र. त्याच्या वडिलांन सायकलवरून प्रवास केला असेल, पण सचिन आज कोट्यवधींच्या कारस्मधून प्रवास करतो आहे, हे दोन पिढ्यांतील आर्थिक आणि सामाजिक अंतर आहे. गरीब आणि श्रीमंतांमध्ये जरी दरी असते तशी ही दोन पिढ्यातील दरी असली तरी ही दरी संपन्नतेची आहे, ही संपन्नतेची दरी प्रत्येक सामान्य माणसाच्या जीवनात यावी, अशीच अपेक्षा सर्वसामान्यांचे हित पाहणारा प्रत्येकजण करेल.
     सर्वसामान्यांची आज अवस्था अशी आहे की, त्याला दोन वेळच्या अन्नासाठी रक्ताचे पाणी करावे लागते. गॅस सिलेंडरप्रमाणे ५० रूपयांची वाढ केली गेल्यावर त्याच्या तोंडाला फेस येतो. रिक्षाने, एस.टी. बसने प्रवास करायचा आहे म्हटल्यावर त्याच्या पायातलं बळ निघून जातं. आपल्या पायालाच चाकं असती तर बरं झालं असतं असं त्याला वाटतं. महागाईच्या सरणावर तो जळतो आहे. त्याला सचिनच्या फेरारीचं नवल नाही किंवा निस्सान जीटी-आरचं कौतुक नाही, त्याला चिंता स्वत:ची आहे, स्वत:च्या जगण्याची आहे. त्याला सचिनच्या कर्तृत्वाचा अभिमान आहे, पण हा सचिन आपलं भविष्य आणि भवितव्य बदलणार नाही, हे सर्वसामान्यांना माहीत आहे. सचिनच्या गाड्यांबद्दल लिहिणार्या माध्यमांनी आपल्या कुपोषित, रोडावलेल्या पोटाकडेही पाहावं, असं सर्वसामान्यांना वाटतं. सचिन मराठी माणूस आहे, त्याहूनही तो भारतीय आहे, त्यामुळे त्याचा सर्वांना अभिमान आहे. त्याचं ऐश्वर्य वाढो असेच सर्वांना वाटेल, परंतु गरीबांची फरफट संपो, त्यांचं दारिद्रय नाहीसं होओ, अशी आपण यानिमित्त शुभेच्छा व्यक्त केली तर त्यात काही अयोग्य नाही. होय ना?

शनिवार, २३ जुलै, २०११

आत्मचरित्र लिहायचंय?

-उमाजी म. केळुसकर ⬑ ठसा आणि ठोसा ⬉


    सांगतो ऐका! तुम्हाला एखादं आदर्श आत्मचरित्र वाचायचं आहे? थोडी कळ काढा. त्याची सोय होतेय. गेल्या चाळीस वर्षांत लिहिले गेले नाही, असे आत्मचरित्र लिहिले जाणार आहे. १९७० साली, म्हणजे ४० वर्षांपूर्वी ‘सांगत्ये ऐका’ म्हणून हंसा वाडकर यांनी आपल्या आत्मचरित्रातून आपल्या जीवनाचं कटू वास्तव मांडलं. आता ‘बोलतो ऐका’ म्हणून यावर्षी एक नवीन आत्मचरित्र लिहिलं जाणार आहे आणि त्यात कटुवास्तवाऐवजी केवळ आणि केवळ साखरपेरणी असणार आहे. त्यामुळे सुखांताची अपेक्षा असलेल्या वाचकांना गोड गोड वाटणार आहे किंवा गोड वाटून घ्यावे लागणार आहे. पुणेकरांचं लाडकं व्यक्तिमत्त्व आणि भारतातील ‘महान’ व्यक्तिमत्त्व सुरेश कलमाडी हे आपले आत्मचरित्र लिहिणार आहेत. 
     लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात ‘गीतारहस्य’ लिहिलं, तर सुरेश कलमाडी तिहार तुरुंगात आपल्या आत्मचरित्रातून आयुष्याचा गुंता सोडवणार आहेत. त्यांनी गुंता सोडवो अथवा वाढवो, वाचकांच्या हाती तुरुंग परंपरेतील एक पुस्तक पडणार आहे, हे नक्की! पंडित नेहरुंनी तुरुंगातच ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ लिहून खर्या अर्थाने ‘भारताचा शोध’ घेतला. सुरेश कलमाडी यांनी आपले आत्मचरित्र लिहून स्वत:चा शोध घेतला तरी पुरेसे आहे. परंतु ते तसं करतील असं वाटत नाही. कारण आत्मचरित्रात खरं लिहून नागडं व्हायचं नसतं, मग भले आपण समाजात कितीही उघडे पडलेलो का असेना. याच्या टिप्स त्यांना मिळाल्याच असतील आणि खरं सांगायला ते इतके निर्बुद्ध नाहीत. ते तसे असते, तर १६०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार त्यांच्याकडून झालाच नसता. तो त्यांना पचला नाही, ही वेगळी गोष्ट आहे. सुरेश कलमाडी सध्या तिहार तुरुंगात आराम करीत आहेत. राष्ट्रकुल घोटाळ्यांचं त्यांच्यावर ओझं असलं, तरी ते तसं अजिबात जाणवू देत नाहीत. तुरुंगवासातील आपला वेळ ते पंचतारांकीत उपक्रम राबवण्यात घालवू शकत नाहीत. कारण ते कैदी आहेत. व्हीआयपी कैदी आहेत, म्हणून ते तिहार तुरुंगाधिकार्यांच्या कार्यालयात बसून चहापाणी पिऊ शकतात. तुरुंगातील इतर कैद्यांशी मनमोकळ्या गप्पा मारु शकतात. पण, तुरुंगाधिकारी तर व्हीआयपी नाहीत ना, त्यामुळे त्या बिचार्या तुरूंगाधिकाऱ्यांची अंदमानला तुरुंगाधिकारी म्हणून बदली केली जाते. 
     कोणाचं केव्हा काय होईल, हे सांगता येत नाही. पूर्वी स्वातंत्र्य योद्ध्यांना अंदमानात काळ्या पाण्याची शिक्षा दिली जायची, परंतु २०११ मध्ये कलमाडी यांच्या पायगुणामुळे तुरुंगाधिकार्यांची पार्सल थेट अंदमानला पाठवली जाते, यापेक्षा दुसरी कुठची गंमत नसेल. अशा गंमतीजमती कदाचित कलमाडी लिहितील, पण ‘माडी’च्या गोष्टी त्या लिहितील काय हा प्रश्नच आहे. कलमाडी यांना सुरसुरी आली आहे. त्यामुळे ते आत्मचरित्र लिहितीलच. त्यासाठी त्यांनी संगणकासाठी तुरूंग प्रशासनाची परवानगीही मागितली आहे. पण चार-दोन दिवसातच कलमाडी यांनी आपल्याला स्मृतिभ्रंश झाला असल्याचे जाहीर केले आहे. म्हणजे तसा अहवालच त्यांच्या एमआरआय चाचणीतून मिळाला आहे. त्यामुळे कलमाडी यांनी पूर्ण विस्मरण होण्यापूर्वी आत्मचरित्र लिहावे. तथापि, ते आत्मचरित्रात काय आणि कसं लिहितील याची थोडी जरी कल्पना केली, तरी गंमत वाटते. म्हणून गमती गमतीतच त्यांच्या खर्याखोट्या चरित्राचा पट अलगदपणे उलगडावासा वाटतो. 
     कलमाडी लिहितील, ‘मी जर महाराष्ट्रात जन्माला आलो नसतो, तर कर्नाटकात जन्माला आलो असतो. माझे वडील कर्नाटकातून पुण्यात वैद्यकीय व्यवसायासाठी स्थायिक झाले, म्हणून माझा जन्म पुण्यात झाला. कानडी विठ्ठलु जर पंढरपुरी राहून महाराष्ट्राच्या भक्तीचा मळा फुलवत आहे तर मी महाराष्ट्रात क्रीडेचा मळा फुलवला, यात नवल ते काय? तत्पूर्वी माझे शिक्षण पुण्यातील उच्चभ्रू शाळा-महाविद्यालयात झाले. त्यानंतर मी भारतीय हवाई दलात वैमानिक म्हणून देशाच्या सेवेसाठी रुजू झालो. १९६५ च्या भारत-पाक युद्धात भाग घेण्याची मला संधी मिळाली. हवाई दलाच्या सेवेत आठ पदकांची मी घवघवीत कमाई केली. ती मला तेव्हा लाखो-कोट्यवधी रुपयांपेक्षा मोठी वाटली. नंतर मात्र माझा दृष्टीकोन बदलला. मी कॉंग्रेसमध्ये आलो. तेथे मी अर्थपूर्ण राजकारण केलं. मी राज्यमंत्री झालो. खासदार बनलो. या दरम्यान मी क्रीडाक्षेत्रात माझा ठसा निर्माण केला. मी डोळस बनलो होतो. मला कळलं होतं की, हजारो कोटींचा भ्रष्टाचार या देशातील नागरिकांना आता नवा राहिलेला नाही. ज्याच्या हाती ससा तो पारधी या न्यायाने आपल्या देशातील उच्चपदस्थ व्यक्ती बिनबोभाट भ्रष्टाचार करू लागल्या आहेत. पण, भ्रष्टाचाराच्या या मांदियाळीत आपल्या महाराष्ट्राचा कोणी नाही याची मला शरम वाटली. म्हणूनच मी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांच्या आयोजनात तब्बल १६०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला. महाराष्ट्राचा नावलौकिक वाढविण्यासाठी मी हे सर्व केलं, पण माझी ही सद्भावना कोणी लक्षात घेतली नाही आणि मला थेट तिहार तुरुंगात कोंबलं.’ कलमाडी आपलं अर्ध खरं आणि अर्ध खोटं आत्मचरित्र कसं लिहितील. याची ही एक चुणूक दाखवली आहे. ज्यांना आत्मचरित्र लिहायचं आहे त्यांनी या लेखाचा अभ्यास केला तरी ते कलमाडींपेक्षा भन्नाट आत्मचरित्र लिहू शकतील यात शंका नाही.

सोमवार, ११ जुलै, २०११

सरकारी अधिकारी आणि तणाव?

-उमाजी म. केळुसकर ⬑ ठसा आणि ठोसा ⬉


   सरकारी अधिकारी आणि तणाव? होय, सरकारी अधिकारी आणि कर्मचारी तणावग्रस्त झाले आहेत. हा तणाव कसला हे त्यांनाच विचारले पाहिजे. तथापि, या तणावामुळे राज्याचे प्रशासन संतप्त झाले आहे. राज्याचे मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड यांनी यावर उपाय शोधला आहे. सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ताणतणावातून मुक्त होण्यासाठी विपश्यना प्रशिक्षण घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सुट्ट्या इत्यादी सवलती देण्यात येणार आहेत. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देण्यात येणार्या पायाभूत प्रशिक्षण वर्गात विपश्यना प्रशिक्षणाचा समावेश करण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील ‘विपश्यना रिसर्च धम्मगिरी इन्स्टिट्यूट’तर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या विपश्यना शिबिरात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावे, असे परिपत्रक मुख्य सचिवांनी ५ जुलै रोजी जारी केले आहे. ‘यशदा’ व अन्य सरकारी संस्थांमार्फत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी चालविण्यात येणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमांतही विपश्यनेचा समावेश करण्याचा आदेश दिला आहे. मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड यांचा हेतू प्रामाणिक आहे. विपश्यना प्रशिक्षणही चांगले आहे, पण हे सरकारी अधिकारी आणि कर्मचारी प्रामाणिक आणि चांगले आहेत का, हा प्रश्न आहे.
     कोणतेही सरकारी विभागाने कार्यालय असो, तेथे कार्यसंस्कृती आहे, असे कुणालाही जाणवत नाही. म्हणूनच सरकारी नोकरांबद्दल चांगले बोलणाऱ्यांची संख्या फारशी आढळत नाही. जनतेची कामे करायचीच नाहीत. तिला हेलपाटे मारत ठेवायचे आणि नंतर मनात आले तर तिचे काम कराचये, ही सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची खासीयत आहे. त्यामुळे प्रत्येक सरकारी कार्यालयांत पेंडिग फायलींचा ढिग दिसून यतो. लाल फितशाही हा सरकारी कार्यालयांचा आणि अधिकाऱ्यांचा स्थायी भाव झाला आहे. अधिकारी सरकारी वेळेचा त्यांच्या दृष्टीने सदुपयोग खासगी कामासाठी करतात आणि अगदीच काही केले नाही, असे वाटू नये म्हणून काही काम करतात. आपली निष्क्रियता झाकली जावी, म्हणून आपल्या हाताखालील कर्मचाऱ्यांवर फायर करतात.
       कर्मचाऱ्यांनाही कुठे कामाची ओढ असते? अधिकारी तसे कर्मचारी. घरी बायकोबरोबर गप्पा माराव्या, तशा कार्यालयांत आपल्या सहकारी मित्र-मैत्रिणींबरोबर गप्पांचा फड रंगवतात. कामासाठी आलेली जनता तेथे डोक्यावर हात मारत उभी असते. त्यांचे काम करण्याची या गप्पीष्ट कर्मचार्यांची मानसिकताच असते कुठे? त्यामुळे जनतेला कामासाठी हेलपाटे मारल्याशिवाय तिला तिच्या कामाचे महत्त्व कसे समजणार? सरकारी कर्मचार्यांचे महत्त्व कसे समजणार? सरकारी कर्मचाऱ्यांची दांडगाई इतपतच मर्यादित नसते. त्यांना काम करून देण्यासाठी चिरीमिरीचीही गरज असते. ‘लाच देणे आणि घेणे हा गुन्हा आहे’ हे वाक्य सरकारी कार्यालयांवर एखाद्या सुभाषितासारखं लटकवलेलं असतं, तशीच येथे गरजू लोकं लटकलेली असतात. सदर वाक्याचा बाऊ कोणी करू नये, त्याचा धसका सरकारी अधिकारी, कर्मचारी घेत नाहीत आणि जनतेनेही त्याचा धसका घेऊ नये, असे त्यांना वाटत असते. जर जनतेने कामासाठी चिरीमिरी दिली नाही, तर या सरकारी जावयांची पोटे कशी भरणार? प्रत्येक वेतन आयोगाबरोबर त्यांचे पगार गलेलठ्ठ होत असूनही, ते स्वत:ला गरीबच समजताहेत. म्हणूनच ते खासगी क्षेत्राकडे डोळे लावून बसले आहेत. कामापेक्षा इतर वादात असलेल्या या सरकारी अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना तणावाने ग्रासले हे खरोखरच आश्चर्य आहे. असलाच तर हा तणाव पैशासाठी आहे.
गेल्या काही वर्षात काही सनदी अधिकाऱयांनी खासगी कंपन्यांत गलेलठ्ठ पगाराच्या नोकऱ्या पत्करल्या. प्रशासकीय सेवेतील कटकटींना कंटाळून आपण असे केले अशा चोराच्या उलट्या बोंबाही त्यांनी मारल्या. परंतु जनतेला सर्व काही माहीत आहे. काही सनदी अधिकाऱ्यांनी वर्षा-दोन वर्षांच्या रजा घेऊन सेझसाठी भूसंपादन करणाऱ्या खासगी कंपन्यांच्या सेवा तितक्या काळाकरिता पत्करल्या. सेझमुळे अशा ‘पैसा हाच परमेश्वर’ समजणाऱ्या अधिकाऱ्यांचं चांगभलं झालं. आपलं ज्ञान, सरकारी गुपितांचा त्यांनी काही दीडक्यांसाठी या कंपन्यांना लिलाव केला आणि पुन्हा आपल्या सरकारी सेवेत परतले. हाही एक प्रकारचा देशद्रोह आहे. त्यामुळे अशा अधिकार्यांना तुरूंगात बसवायला हवे होते, परंतु सेझविरुद्ध आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनाच तुरूंगात बसावे लागले.
      कंपन्यांचे दलाल असलेल्या या सरकारी अधिकाऱ्यांना पकडून भूमीपुत्रांनी त्यांची धिंड काढली, तर ते अयोग्य ठरणार नाही. सर्वच सरकारी अधिकारी, कर्मचारी अकार्यक्षम आणि भ्रष्ट नसले तरी या बदनाम मंडळींमुळे सर्वांचीच बदनामी होत आहे. त्यामुळे भ्रष्ट आणि अकार्यक्षम मंडळींचा ताणतणाव विपश्यनेने कसा दूर होणार आणि त्यांच्यात कार्यसंस्कृती, प्रामाणिकपणा कसा वाढेल हा प्रश्नच आहे.

बुधवार, १५ जून, २०११

वाचन संस्कृतीचा उद्घोष

-उमाजी म. केळुसकर ⬑ पुस्तकवेध ⬉


      समाजमन समृद्ध करण्यात साहित्य संस्कृतीचा महत्त्वाचा वाटा असतो. अगदी रामायण, महाभारतासारख्या धर्मग्रंथांनीही समाजमनावर परिणाम केला आहे. वेद असो, बायबल असो, वा कुराण किंवा अन्य धर्मग्रंथ यांनी समाजमनाला एक डोळस विचार दिला. परंतु त्यातील अविचारांचं काहूर तेवढे अंधपणाने स्वीकारल्यामुळे एक प्रतिगामी शक्ती त्यातून तयार झाली. तथापि, पुरोगामी विचार मांडणारेही कमी झाले नाहीत. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, रामदास स्वामी यांनी आपल्या साहित्यातून जो पुरोगामी विचार मांडला, तो समाजमन समृद्ध करणारं जागरण ठरलं. त्यानंतर आधुनिक काळात महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर इत्यादींनी आपल्या साहित्यातून माणूस जागवला. माणूस जागवण्याचे हे कार्य अजूनही चालू आहे. हे कार्य महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे ‘लोकराज्य’ या मासिकाद्वारे गेली ६३ वर्षे चालू आहे. परंतु २१ वं शतक उजाडल्यानंतर ‘लोकराज्य’च्यात अंतर्बाह्य बदल झाला. आधुनिक काळाबरोबर धावण्याची आपली कार्यक्षमताही या मासिकाने सिद्ध केली. लोकप्रेम मिळवलं.
     ‘लोकराज्य’ने आपल्यात बदल घडवताना अनेक प्रयोग केले आहेत. या प्रयोगांनी वाचक संख्या वाढवून वाचन संस्कृतीही फुलवली. याचाच एक भाग म्हणून जून-जुलै २०११ च्या ‘लोकराज्य’ वाचन विशेषांकडे पाहिले पाहिजे. खरोखरच, ‘वाचन: एक अमृताभव’ हे या विशेषांकाच्या मुखपृष्ठावर म्हटले आहे. त्यातून हा अंक म्हणजे अलिबाबाची गुहा आहे, याची जाणीव होते. ‘तिळा तिळा दार उघड’ असे म्हणून मुखपृष्ठ पालटावे आणि साहित्याच्या माणिक प्रदेशात शिरावे, अशी अवस्था लोकराज्यमुळे होते. या माणिक प्रदेशाला दिग्गजांच्या साहित्य रत्नांनी समृद्ध केले असून, त्यातून वाचकांना निश्चितच एक वेगळी दृष्टी मिळते. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘वाचन संस्कृती जोपासताना’ या लेखात ‘दिसामाजी काहीतरी लिहावे| प्रसंगी अखंडित वाचित जावे॥या समर्थ रामदास स्वामींच्या श्लोकातील दोन ओळी उद्धृत करून म्हटले आहे की, एक नीतीवान, समर्थ आणि राष्ट्र उभारणीत छोटे-मोठे योगदान देणारा जबाबदार नागरिक घडवायचा असेल तर केवळ ‘माहिती संपन्न’ असून चालणार नाही, तर ज्ञानसंपन्न बनावे लागेल, ज्ञानी व्हावे लागेल आणि यासाठी अर्थातच वाचनाला दुसरा कोणताही पर्याय नाही. वाचनाची श्रीमंती या लेखात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही अशीच भूमिका आहे.
     अरूण टिकेकर, दिनकर गांगल, गंगाधर पानतावणे, कुमार केतकर, डॉ. सदानंद मोरे, सचिन परब, हरी नरके, डॉ. मंगला आठलेकर, प्रज्ञा पवार, रा.रं. बोराडे, विजया राजाध्यक्ष, वसंत आबाजी डहाके, अरूण साधू, नंदिनी आत्मसिद्ध, निळू दामले, वि.वि. करमरकर यांचे लेख एकंदरित साहित्य संस्कृतीचा धांडोळा घेणारे आहेत यात वादच नव्हे, परंतु त्यांच्या लेखनातून सामाजिक जाणीवांचा विस्तारही होताना दिसतो. मानवी मूल्ये, बदलते जग, भाषा आणि वाचन या चतुसूत्रीचे मंथन या लेखकांनी आपल्या लेखनातून केले आहे. ज्ञानाच्या ज्या ज्या वाटा आहेत, त्यांचे दर्शन प्रत्येक लेखातून घडले आहे. सर्वंकष वाचनाची गरज, ज्ञानविश्वात फेरफटका, युवक वाचतील तर देश वाचेल, संत साहित्य, स्त्री-स्वातंत्र्याची वाटचाल, समग्र परिवर्तनाच्या दिशेने, जुने जाऊ द्या मरणालागूनी, कोशांचा धांडोळा, आमचं ‘विचार’धन, कवी आणि कविता, मराठी कादंबरीचे न्यून, वाङ्मयीन नियतकालिके, नवे शिक्षण-नव्या दिशा-नवे ग्रंथ, व्याकरण आणि भाषा व्यवहार, अक्षर-कल्पवृक्षाचा बहर, वेब विश्वातील मराठी, सफर मराठीच्या अनुवादविश्वाची, वाचन हा ज्याचा त्याचा प्रश्न, शासकीय ग्रंथ प्रकाशन विश्व इत्यादी लेखांतून एक साहित्य संस्कृतीविषयी परिसंवादच घडला आहे. या परिसंवादातील सूर निराशेचा नाही. ‘कोण म्हणतो वाचन कमी झाले आहे?’ असा खणखणीत सूर या दिग्गज साहित्यिकांनी आपल्या लेखांतून लावला आहे, हे महत्त्वाचे आहे. ‘लोकराज्य’ या ताज्या अंकाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यात प्रकाशन संस्था आणि त्यांच्या वाचकप्रिय पुस्तकांबद्दलचे लेख. सुनील मेहता यांचे मेहता पब्लिशिंग हाऊस, बाबा भांड यांचे साकेत प्रकाशन, अरूण पारगावकर यांचे प्रतिमा प्रकाशन, उल्हास लाटकर यांचे अमेय प्रकाशन, साधना ट्रस्टचे साधना प्रकाशन, मकरंद कुलकर्णी यांचे साहित्य प्रसार केंद्र, भागवतांचे मौज प्रकाशनगृह, दिलीप माजगावकरांचे राजहंस प्रकाशन, भटकळांचे पॉप्युलर प्रकाशन, तसेच लोकवाङ्मय गृह, ग्रंथाली यासारख्या प्रकाशन संस्थांची आणि त्यांनी प्रसिद्ध केलेल्या पुस्तकांची माहिती निश्चितच वाचकांची अभिरूची वाढविण्यास मदत करणारी आहे. मराठी प्रकाशन विश्वात सरस-निरस साहित्यकृती पुस्तक रूपाने बाहेर पडत आहे. जे सरस आहे, त्याला वाचकवर्ग मिळतोय आणि निरस आहे, त्याची रद्दी होतेय. पण प्रकाशन विश्व हा रद्दीचा कारखाना नाही, ते वाचन संस्कृती जोपासण्याचे मंदिर आहे. या मंदिरात घंटानाद करण्याचे कार्य ‘लोकराज्य’ने केले आहे.
     ‘लोकराज्य’ मासिकाचा उद्देश सरकारी मुखपत्र एवढेच नाही, त्यातून समाजमनावर साहित्य संस्कारही चांगल्या प्रकारे करता येतात, हे मात्र या वाचन विशेषांकाच्या उदाहरणावरून मान्य करावेच लागेल. या ‘लोकराज्य’ वाचन विशेषांकाबाबत मुख्य संपादक विजय नाहटा यांनी म्हटले आहे की, ‘सर्वसामान्य वाचकाला एक दिवा दाखवावा, दिव्याने दिवा उजळत जावा आणि त्या प्रकाशात सारा महाराष्ट्र उजळून निघावा याच भावनेने मासिकाच्या वाचन विशेषांकाची निर्मिती करण्यात आली आहे.’ विजय नाहटांचे हे म्हणणे पूर्णपणे योग्य आहे याची प्रचिती या अकांचे वाचन करणार्या प्रत्येकाला येईल, यात शंकाच नाही.

शनिवार, १४ मे, २०११

अनोखे रक्षा कवच

-उमाजी म. केळुसकर ⬑ ठसा आणि ठोसा ⬉


      ताईत. एखाद्याच्या गळ्यातील ताईत बनणे आणि स्वत:च्या दंडाला ताईत बांधणे, यात जमीन अस्मानाचा फरक आहे. एखाद्याच्या गळ्यातील ताईत बनणे, म्हणजे त्याचा लाडका असणे आणि स्वत:च्या दंडात ताईत बांधणे याचा अर्थ, आपल्याला कोणाचीही नजर लागू नये, भूतबाधा होऊ नये, याची काळजी घेणे, असा आहे. देवस्थान परिसरात अशा ताईतांची मोठ्या प्रमाणात विक्री होते. परंतु तीस वर्षांपूर्वी लोकांकडे गंडेदोरे, ताईत पाहायला मिळायचे, ते हल्ली मात्र पाहायला मिळत नाहीत. गंडेदोर, ताईत बनवणार्या तांत्रिक-मांत्रिकांचे, भगतांचे धंदे मंदावले आहेत. याचे कारण आता लोकांना भूत-प्रेतांची भीती वाटत नाही, हे आहे. तशी भीती वाटूही नये, कारण भीषण महागाईसमोर भूत-प्रेताची काय कथा? अशा परिस्थितीत हायटेक ज्योतिषी व भविष्यवेत्ते टीव्ही आणि टेलिशॉपमध्ये येऊन कधी फेंगशुई टिप्स विकताना दिसून येतात, तर कधी वास्तूशास्त्र समजवताना दिसतात. 
     तसं पहाता टीव्हीवर सर्वात जास्त मार्केटिंग ‘रक्षा कवचाची’ होते. याचा अर्थ आधुनिक काळात ताईताची जागा या रक्षा कवचाने घेतली आहे. हे रक्षा कवच अंगावरही बाळगायची गरज नसते. घराच्या दारावर ते लावले की बस्स. भूतबाधा, नजर लागणे, अपयश या गोष्टींची मग भीती नाही, असे म्हटले जाते. परंतु या रक्षा कवचाचा खरा फायदा काय आहे, हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. रक्षा कवच विकणारे मात्र छातीठोकपणे म्हणतात की, हे रक्षा कवच आपल्या जीवनातील सर्व अशुभ बाबींपासून रक्षण करेल. हे रक्षा कवच खरेदी करणारा विचार करतो की, जर टर्म इन्शुरन्समध्ये कोणत्याही रिटर्नची अपेक्षा नसताना दहा-वीस हजार रूपये फुंकता येऊ शकतात तर, रक्षा कवचावर हजार-पाचशे रूपये खर्च करण्यात काय हरकत आहे? कोणास ठाऊक, कोणती दैवी शक्ती केव्हा किमया करेल. परंतु, आता रक्षा कवचवाल्यांसाठी आपल्या मार्केटिंगला मॉर्डनाईझ करण्याची वेळ आली आहे. यात फायदेच फायदे आहेत. उदाहरणार्थ, रेल्वे रक्षा कवचाच्या मार्केटिंगमध्ये सध्या प्रचंड शक्यता आहेत, कारण रेल्वेगाड्या नेहमी रूळावरून घसरत आहेत आणि एकमेकांवर चढत आहेत. हे रक्षा कवच डब्यांच्या हिशोबाने विकता येऊ शकते. म्हणजे एसी डब्याचं रक्षा कवच शंभर रूपयांत आणि जनरल डब्याचं रक्षा कवच दहा रूपयांना. याला स्पेसिफीकही करता येऊ शकतं. राजधानीचं रक्षा कवच विशेष नावाने आणि अभिमंत्रित करून हजार रुपयांपर्यंत विकता येऊ शकतं. 
      आणखी एका रक्षा कवचाची डिमांड मोठ्या प्रमाणात आहे आणि ते आहे विमान रक्षा कवच. विश्वास ठेवा, याची विक्री विमानाच्या तिकिटापेक्षा अधिक होईल. हे रक्षा कवच विमानातून उड्डाण करणारे कमी आणि ज्या गावावरून विमान जाईल, त्या गावांतील लोक मोठ्या प्रमाणात खरेदी करतील. खरेतर जेव्हा विमान कोसळतं, तेव्हा ते एखाद्या गावावरच कोसळतं. ट्रक, बाईक आणि बस रक्षा कवचाच्या विक्रीचीही अशीच अवस्था असणार. ही वाहनेही केव्हा एकमेकांना धडकतील हे सांगता येणार नाही. 
       कोणाला वाटलं तर, वक्तव्य रक्षा कवचही सिद्ध करून विकू शकतं. एकमेकांविरुद्ध वक्तव्य करणारे नेता असे रक्षा कवच खरेदी करतील. फ्लॅट बुकिंग रक्षा कवचालाही खूप मार्केटिंग स्कोप आहे. नाईट ड्युटी रक्षा कवच आणि कोर्ट-कचेरी रक्षा कवचाची मागणी तर सेल लावूनही पूर्ण करता येणार नाही. आपल्या देशात घरगुती रक्षा कवच तर मुलांचा जन्म होताच सुरु होतात. मुलाला काळं तीट लावणे, अभिमंत्रित गंडादोरा बांधणे हे घरगुती उपाय झाले. पण, मार्केटवाल्या रक्षा कवचाची गोष्ट ही दुसरी आहे. जे आपण पैसे देऊन खरेदी करतो, त्यावर विश्वास जास्त असतो. विज्ञानाने कितीही प्रगती करो आणि सुरक्षाव्यवस्था कितीही कडक असल्याचे कितीही दावे केले जावोत, रक्ष कवचाविना घराबाहेर पडणे धोकादायक आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्यांचे जीवन वाचविण्यासाठी नव्या प्रकारच्या रक्षा कवचांची विक्री होऊ लागली. तर त्यात काय हरकत आहे? आजचे जीवन धकाधकीचे असल्यामुळे केंद्रीय व राज्याच्या गृहमंत्र्यांनी या रक्षा कवचाच्या विक्रीला प्रोत्साहन दिले, तर सरकारेही संकटात सापडणार नाहीत, हेच खरे.

सोमवार, ९ मे, २०११

सोयीचे स्मरण-विस्मरण

-उमाजी म. केळुसकर ⬑ ठसा आणि ठोसा ⬉


    विस्मरण ही काही आश्चर्याची बाब नाही, कारण ती आजच्या काळाची देणगी नाही. याची मुळे थेट पौराणिक काळात जाऊन पोहोचतात. मेनकेला विश्वामित्रापासून झालेली कन्या ती टाकून देते, तेव्हा शकुंत पक्षी तिचे रक्षण करतो. कण्वऋषीच्या नजरेस ती पडते, तेव्हा तिला घेऊन ते आपल्या आश्रमात आणतात आणि शकुंत पक्ष्याने तिचे रक्षण केले, म्हणून तिचे नाव ते शकुंतला ठेवतात. ही शकुंतला तिथेच लहानाची मोठी होते. राजा दुष्यंत तेथे आला असता दोघांचे प्रेम होते, तो तिच्याशी गांधर्व विवाह करतो. त्यांच्यात शरीरसंबंधही होतो. ‘मी तुला सन्मानाने घेऊन जाण्यास येईन’ असे आश्वासन देऊन राजा दुष्यंत तेथून जातो. पण, तो काही तिला नेण्यास येत नाही
    शकुंतलेच्या पोटी त्याचा अंकुर वाढत असल्यामुळे कण्वऋषी तिला राजा दुष्यंताकडे घेऊन जातात, परंतु दुष्यंत आपल्या आयुष्यात कधी काळी शकुंतला आली असल्याचे नाकारतो. त्याला तिचा सोयीस्कर विसर पडतो. शकुंतला हिरमुसली होऊन परत कण्वआश्रमात येते. तेथे तिला पुत्र होतो. त्याचे नाव भरत ठेवले जाते. नंतर दुष्यंताचे डोळे उघडतात आणि त्या दोघांना तो आपल्या राजवाड्यात सन्मानाने आणतो. अशी ही ढोबळमानाने मला आठवणारी कथा आहे. शकुंतला आणि दुष्यंताच्या पुत्राच्या भरत या नावावरुनच आपल्या देशाचं नाव भारत पडलेलं आहे. याचा अर्थ, भारत हे नाव ज्याच्यावरुन या देशाला प्राप्त झाले आहे, त्या भरताच्या पित्याच्या विस्मरणाची परंपरा आधुनिक भारतातही कायम आहे. आजही सर्व काही झाल्यावर आजच्या शकुंतलांचा विसर आजच्या दुष्यंताना होतो. त्यामुळे शकुंतलेच्या मातेने तिला जसे टाकून दिले, तसेच शकुंतलांना आपल्या नवजात अर्भकांना उकिरड्यावर टाकावे लागत आहे. हे आधुनिक भरत दुष्यंताच्या भरताप्रमाणे नशिबवान नसल्यामुळे त्यांना स्वतंत्र भारतात अनाथ म्हणून लहानाचे मोठे व्हावे लागते. येथे लग्न करुन शकुंतला आणि दुष्यंत स्वत:चे पप्रंच वाढवत राहतात आणि भरत मात्र ‘लावारिस’पणाचं जीणं जगत राहतात. आधुनिक विस्मरणाचं हे जळजळीत उदाहरण. 
     प्रेमात ‘कुचूक्कू’ करणार्यांनाच विस्मरण होते असे नाही, तर राजकारणातल्या लोकांना तर विस्मरण ही देणगी वाटते. घोटाळे करणार्यांना विस्मरण हे एक प्रकारचे वरदानच असते, त्यामुळे तिहारमध्ये आराम करणारे सुरेश कलमाडी आपल्याला विस्मरण झाल्याचे सांगू शकतात. अर्थात, हा त्यांचा दोष नाही, हा दोष कोणाचाच नाही. कारण विस्मरणाचा जो शाप दुष्यंताला होता, तो आपल्या येथील प्रियकरांना, राजकारण्यांना, सर्वसामान्यांनाही आहे. त्यामुळे प्रसंग येताच ‘मला काही आठवत नाही’ असं म्हणायला उशीर केला जात नाही. हा विस्मरणाचा शाप मोठ्या प्रमाणात नेत्यांमागे आहे. कोणत्या नेत्याला निवडणुकीत विजयी झाल्यावर आपण जाहीरनाम्यात दिलेली आश्वासने आठवतात? शपथविधी समारंभानंतर त्यांना आपण निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांचे विस्मरण होते. ‘घर कसे भरावे आणि घोटाळे कसे करावे’ या शीर्षकाची पुस्तके त्यांना चांगली वाटू लागतात. जनताही अशा नेत्यांना वर्ष-दोन वर्ष सहन केल्यावर निश्चय करते की, सार्वत्रिक किंवा मध्यावधी निवडणुकीत त्यांना आपला चांगलाच इंगा दाखवू. जनता त्यांना आपला इंगा दाखवते, परंतु आपल्या विसराळूपणामुळे ती त्यांना पुन्हा निवडून आणते, ज्यांना गेल्या निवडणुकीत आपला इंगा दाखवला होता. 
     यापूर्वी लोक कुठे गेले की, आपला चष्मा, छत्री अथवा सायकल तेथेच विसरुन येत. एका महात्म्याची सायकल चोरीस गेली. शिष्याने सुचवले, ‘महाराज, आज आपण चोरीच्या दुर्गुणावर प्रवचन द्या. चोराने जर ते ऐकले, तर निश्चितच पश्चातापाने तो आश्रमात सायकल सोडून जाईल.’ महात्मा चोरीच्या दुर्गुणावर बोलू लागले तेव्हा ते अचानक व्यभिचारावर आले आणि ताबडतोब आपलं प्रवचन समाप्त केलं. शिष्य चकीत झाले आणि म्हणाले, ‘महाराज, हे काय केलं?’ महात्मा म्हणाले, ‘जेव्हा मी चोरीवरुन व्यभिचाराकडे वळलो, तेव्हा मला आठवलं की, मी सायकल कुठे विसरुन आलो आहे.’ ही एक स्मरण-विस्मरणाची गंमत होती, परंतु हल्ली मात्र लोक वरील तीन वस्तूंबरोबरच आपला मोबाइल, डेबिट-क्रेडिट कार्डही विसरुन येतात. आजकाल मोबाइल देवाच्या कृपेने लोक इतरांचे नंबर डोक्यात ठेवण्याचा त्रास घेत नाहीत. लँडलाईनच्या काळात हे नंबर पाढ्यांप्रमाणे पाठ करावे लागत असत. परंतु मोबाइलमुळे नंबर डोक्यात ठेवण्याची गरज नसली, तरी मोबाइलची बॅटरी उतरल्यावर मात्र माणसाची गोची होते. अगदी शकुंतलेच्या दुष्यंतासारखी त्याची अवस्था होते. त्यावेळी शकुंतलेच्या बोटात घातलेली अंगठी हरवल्यामुळे त्याला तिचे विस्मरण झाले, इकडे मोबाइलची बॅटरी उतरल्यामुळे माणसाला विस्मरण होते. यंत्राच्या आहारी गेलेल्याचे विस्मरण एक वेळ समजू शकतो, पण रोज बदाम तेलाने डोक्याची मालिश करणारे दुसर्याकडून उधार घेतलेले त्याला परत करण्यास विसरतात. बोलल्याप्रमाणे करण्यास विसरतात. दुर्व्यवहार लक्षात ठेवतात, उपकार विसरतात. तक्रार शेवटच्या श्वासापर्यंत लक्षात राहते, सत्काराचे विस्मरण होते. या सर्वाला काय म्हणावे? भरताच्या भारतात विस्मरणाचे पीक असले, तरी जगही याला अपवाद नाही, हेही खरे आहे.