मंगळवार, २८ नोव्हेंबर, २०१७

घारापुरीची अंधाराच्या कारावासातून मुक्तता होणार, पण...

  -उमाजी म. केळुसकर ⬑ रायगडचा डंका ⬉


        जागतिक पर्यटनस्थळ म्हणून ओळखल्या जाणार्‍या, युनेस्कोने जागतिक ठेवा म्हणून घोषित केलेल्या घारापुरी बेटाला दरवर्षी १०-१२ लाखांहून अधिक देशी-परदेशी पर्यटक भेट देतात. पर्यटनातून देशाला लाखो रुपयांचे परदेशी चलन मिळवून देणारे घारापुरी मात्र स्वातंत्र्य मिळाल्यापासून गेली ७० वर्षे कायमस्वरुपी विजेपासून वंचित राहिले आहे. घारापुरी बेटाला सभोवार जेएनपीटी, बुचर आयलँड, चेंबूर रिङ्गायनरी, भाभा अणुशक्ती केंद्र, नौदल असे विविध शासकीय प्रकल्प ८५० मीटरपासून पाच किमी अंतरापर्यंत आहेत. या प्रकल्पांवर रात्री विजेचा झगमगाट असताना घारापुरी बेटावरील तीन गावे मात्र अंधारात चाचपडत राहिली आहेत. नाही म्हणायला तेथे महाराष्ट्र पर्यटन विभागाकडून गेले काही वर्षे जनरेटरद्वारे वीज पुरवठा केला जातो. पण तोही गेले महिनाभर जनरेटरमध्ये बिघाड झाल्याने बंद आहे, याकडे कोणीही गांभीर्याने पहायला तयार नाही. रायगडच्या पालकमंत्र्यांना जिल्ह्यात घारापुरी नावाचे बेट आहे, त्यावरील तीन गावातील नागरिकांच्या जगणे अंधाराच्या काळडोहाचा एक भाग बनले आहे, हे माहीत  नसेल, पण त्यांचे सरकार मात्र या बेटाबाबत सजग आहे. ऊर्जामत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मनावर घेतल्याने हे बेट विजेच्या प्रकाशाने लखलखणार आहे. पण याला विलंब होत आहे. या विलंबाची कारणे दूर करुन राज्य सरकारने तेथील जनजीवनाला प्रकाशाचे दान दिले, तर तेथील जनतेची निश्‍चितच अंधाराच्या कारावासातून शाश्‍वत सुटका होईल. 
        मुंबईच्या सागरी किनार्‍यावरून म्हणजेच गेट वे ऑफ इंडियापासून नऊ सागरी मैलांवर असणारं घारापुरी हे ठिकाण प्राचीन लेण्यांसाठी प्रसिद्ध आहे. अभिजात कलाकृतींचा उत्तम नमुना म्हणजे या घरापुरीच्या लेण्या. वेरूळच्या तुलनेत यांची संख्या कमी असली तरी कलेच्या दृष्टीने त्यांची गुणवत्ता तेवढीच आहे. पोर्तुगीजांनी या प्रदेशाचा ताबा घेतल्यानंतर येथे असलेल्या विशाल हत्तीशिल्पांमुळे त्याला इल्हा द एलिफंट असं नाव दिलं आहे. हे ठिकाण मुंबईपासून जवळ असलं तरीही सीमारेषेच्या दृष्टीने ते रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात आहे आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या बेटाच्या नशिबी अंधाराचा कारावास पूर्वीपासून आहे. या जगप्रसिद्ध घारापुरी बेटवासीयांना प्रतीक्षा आहे ती कायमस्वरूपी विजेची. पण स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे उलटली तरी परिस्थितीत काहीही बदल झाला नाही. यातून या जिल्ह्याचे आतापर्यंतचे खासदार, आमदार, पालकमंत्री यांचा या बेटाबातचा उदासिन दृष्टीकोन दिसून आला. कायमस्वरूपी वीज मिळावी यासाठी तेथील ग्रामपंचायत, ग्रामस्थांचे आटोकाट प्रयत्न सुरू राहिले तरी सरकारी दरबारी अद्याप तरी फारशी दखल घेतली न गेल्यानेे १९९७-९८  पासून महाराष्ट्र पर्यटन विभागाकडून जनरेटरद्वारे मिळणार्‍या अपुर्‍या साडेतीन तासांच्या वीजपुरवठ्यानंतरही बेटवासीयांचा प्रवास पुन्हा अंधाराकडेच होत राहिला, ही जिल्ह्याच्या दृष्टीने अतिशय लाजीरवाणी बाब ठरली आहे. ही अंधार यात्रा गेल्या महिन्यात जनरेटरमध्ये बिघाड झाल्याने आणि त्याच्या दुरुस्तीबाबत गांभीर्याने पावले उचलली न गेल्यामुळे अधिक ठळक झाली आहे. 
         कोरीव अद्भुत लेण्यांमुळे घारापुरीचे बेट जागतिक नकाशावर झळकत आहे. या बेटावर शेतबंदर, मोराबंदर, राजबंदर अशी तीन गावे आहेत. या तिन्ही गावांचे मिळून लोकसंख्या १२०० च्या आसपास आहे. शैक्षणिक, आरोग्य आणि विकासाच्या दृष्टिकोनातून कोसो दूर असलेल्या बेटावर कायमस्वरूपी वीज नसल्यामुळे गेल्या दोन दशकात सरकारांकडून केल्या जाणार्‍या विकासाच्या आणि पर्यटनवाढीच्या गप्पा, या बाजार गप्पा होत्या हे दिसून आले. मधल्या काळात शरद पवार, सुधाकरराव नाईक, विलासराव देशमुख, विनय कोरे, सुनील तटकरे आदी तत्कालीन मंत्र्यांनी बेटाला कायमस्वरूपी वीजपुरवठा करण्याच्या घोषणा केल्या होत्या. कोरे यांनी तर विजेच्या लाटांवर वीज प्रकल्प उभारून बेटाला वीजपुरवठा करण्याची घोषणा केली होती, मात्र वेळोवेळी विविध मंत्र्यांनी केलेल्या घोषणा हवेतच विरल्या. त्यामुळे या  आमदार, खासदार, मंत्र्यांमध्ये घारापुरी बेटावर कायमस्वरुपी वीज आणण्यासाठी काहीच पॉवर नाही काय? असा प्रश्‍न उपस्थित झाला. नाही म्हणायला तेथील मोराबंदर गावासाठी तत्कालिन सरकारने सुमारे साडेपाच कोटी रुपये खर्च करुन वीजपुरवठा करण्यासाठी सौरऊर्जा प्रकल्पाचीही उभारणी केली होती. मात्र हा प्रकल्प अल्पजीवी ठरला. त्यामुळे मोरा बंदरगाव आजतागायत अंधारातच आहे. तर राजबंदर व शेतबंदर  या दोन गावांना वीज पुरवठा करणार्‍या दोन जनरेटरपैकी १६० केव्ही क्षमतेचे जनरेटर २९ ऑक्टोबरपासून बंद पडल्यामुळे गेल्या २८ दिवसांपासून १०० केवी विद्युतक्षमतेच्या जनरेटरवरुन सदर दोन गावांना आलटून पालटून वीजपुरवठा केला जात आहे, त्यामुळे ही दोन गावेही अंधारातच चाचपडत आहेत. मुळात स्वातंत्र्यापासून आतापर्यंत एखादी आदिवासी वाडी, एखादं गाव, एखाद रहिवासी बेट विजेपासून वंचित असणे ही शोभादायक बाब नाही. ज्या गोष्टी सनदशीरपणे योग्य वेळी व्हायला हव्यात, त्या गोष्टी तेव्हा झाल्याच पाहिजेत. त्या होत नव्हत्या याचे कारण तत्कालिन शासनाची, नोकरशाही आणि लोकप्रतिनिधींची उदासिनता हेच होते. घारापुरी बेट तर जागतिक पातळीवर ओळखले जाणारे ठिकाण आहे. जागतिक पातळीवरील पर्यटकांचा येथे राबता असतो. ते जाताना घारपुरीच्या अभिजात कलाकृती आणि अंधाराच्या आठवणी घेवून जातात. पण येथे जीवंत गावे आहेत, त्या गावांचा मात्र कोणालाच मागमूस नाही, त्यांची दु:ख कोणाला ठाऊक नाही, तेथील पाण्याचं दुर्भीक्ष, तेथे आरोग्य सुविधांचा अभाव, तेथे माणसं जगताहेत कशी याचे कोणाला काही पडले नाही, हेच चित्र आतापर्यंत होते. घारापुरी बेट हे काही आङ्ग्रिकेत नाही, याचे भान जिल्हा प्रशासनानेही ठेवून आपल्यापरीने पुढाकार घेवून घारापुरीवासियांचा विजेचा प्रश्‍न धसास लावायला हवा होता, पण जिल्हा प्रशासनाने कधीही त्यासाठी प्रयत्न केल्याचे दिसून आले नाही.
     राज्यात कॉंग्रेसचे, शिवसेना-भाजप युतीचे, राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस आघाडीचे सरकार असताना घारापुरीचा अंधार दूर करण्याची संधी होती, पण त्यांनी ती घेतली नाही. विद्यमान भाजप सरकारने घारापुरीचा विकास करण्याचा आणि घारापुरीमध्ये वीज आणण्याचा विडा उचलला आहे. त्याचे सुतोवाच राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची रायगड जिल्ह्याच्या राजधानीत अलिबाग येथे येऊन ४ डिसेंबर २०१५ रोजी केले. तेव्हा त्यांनी सहा महिन्यात हे बेट दिव्यांनी उजळेल अशी ग्वाही दिली. भाजपने अर्थसंकल्पात घारापुरीच्या विकासासाठी ७५ कोटी रुपयांची तरतूद आपल्या अर्थसंकल्पात केलीे. यामध्ये वीजपुरवठ्यासाठी २४ कोटी रुपयांची तरतूद केली. पण दुर्दैवाने हे काम सहा महिन्यात काय, २०१६ व २०१७ मध्येही झाले नाही. महावितरणमार्फत न्हावा येथील टी.एस. रेहमान या सबस्टेशनमधून चारही बाजूने समुद्राने वेढलेल्या या बेटास ‘मरीन केबल’द्वारे (समुद्राखालून) वीज पुरवण्यात येणार आहे. या करिता समुद्राखालून सात किमी लांबीच्या चार वीज वाहिन्या टाकण्यात येत आहेत. या वीज वाहिन्यांतून २२ केव्हीचा वीज पुरवठा घारापुरी बेटास करण्यात येणार आहे. या परिसरात वीज यंत्रणेचे जाळे टाकण्याचे ९० टक्के काम पूर्ण करण्यात आले आहे; परंतु वन विभागाच्या क्षेत्रातील कामासाठी वन विभागाने हरकत घेतली असल्यामुळे या ठिकाणी विजेचे काम अपूर्ण राहिले. वन विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) मिळाल्यानंतर काही दिवसांमध्ये हे काम पूर्ण होईल, असे महावितरणचे म्हणणे आहे. याचा अर्थ निदान २०१८ मध्ये घारापुरी बेटाची अंधाराच्या कारावासातून सुटका होणार आहे आणि तेथे विकासाची किरणे झिरपणार आहेत. पण त्यापूर्वी जो जनरेटरने तेथे वीज पुरवठा होतो आहे, तो सुरळीत राहावा या दृष्टीने जनरेटरची तब्बेत सुधारणे आवश्यक आहे. तसेच या बेटावर वीज येण्याआधीपासूनच श्रेयाची लढाई सुरु होणार आहे. सरकार म्हणून भाजपला त्याचे श्रेय द्यायलाच हवे. खरे तर तेथे वीज आणणे प्रत्येक सरकारांचे कर्तव्य होते, ते कर्तव्य यापूर्वीच्या सरकारांनी बजावले नाही. भाजप सरकारने बजावले आहे. आता व्यक्तीगत पातळीवर हे श्रेय घेण्याचा कोणी हास्यास्पद प्रयत्न करुन नये. ते योग्यही होणार नाही. इतकेच.

शनिवार, २५ नोव्हेंबर, २०१७

ग्रंथोत्सवाचा शासकीय तमाशा फ्लॉप

-उमाजी म. केळुसकर ⬑ दादागिरी ⬉


         मराठी भाषा, मराठी साहित्य याविषयी शासन फार काही सकारात्मक करते आहे, असे पूर्वीपासून दाखवले जात आहे. परंतु याबाबतची केवळ औपचारिकताच पार पाडली जात असल्याने महाराष्ट्रात मराठी दीनवाणी आहे आणि मराठी ग्रंथचळवळ प्रश्‍नांकीत बनली आहे. म्हणूनच राज्यात जिल्हा ग्रंथोत्सव चटावरचे श्राद्ध ज्याप्रमाणे उरकले जाते, त्यापद्धतीने उरकले जात आहेत. त्यामुळे हे ग्रंथोत्सव लोकोत्सव ठरु शकलेले नाही. रायगड जिल्ह्यात तर अलिबागेत जेएसएम कॉलेजच्या जयंतराव केळुसकर सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या २०१७ च्या जिल्हा ग्रंथोत्सवात कल्पनादारिद्ˆयाचेच प्रदर्शन पहायला मिळाले. या ग्रंथोत्सवात ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर सोडता कोणताही बाहेरचा वा जिल्ह्यातला कवी, साहित्यिक पहायला मिळाला नाही की ग्रंथचळवळ वाहून नेणार्‍या वाचकांचा मेळा तेथे सळसळताना दिसला नाही. उदास बुकस्टॉल, उदास वातावरण अशी या ग्रंथोत्सवाची साठा उत्तराची कहाणी ठरली.
        ग्रामीण व शहरी भागातील लोकांमध्ये वाचनसंस्कृतीची वाढ व्हावी या हेतूने राज्य सरकारच्या ‘सांस्कृतिक धोरण २०१०’ नुसार प्रत्येक जिल्ह्यात २०११ पासून ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात येते. ग्रंथप्रेमींना एकाच ठिकाणी विविध ग्रंथ प्राप्त व्हावेत, प्रकाशक व ग्रंथविक्रेता यांना ग्रंथविक्रीसाठी एकाच ठिकाणी आवश्यक ती सुविधा उपलब्ध व्हावी, साहित्यिक, कवी यांना व्यासपीठ मिळावे हा ग्रंथोत्सव आयोजनाचा मुख्य उद्देश आहे. ग्रंथोत्सव यापूर्वी महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्या सहकार्याने, जिल्हा माहिती कार्यालयांच्या वतीने राबविण्यात येत होता. परंतु ग्रंथोत्सवाची योग्य अंमलबजावणी होत नसल्याच्या कारणावरुन २०१६ पासून हा ग्रंथोत्सव उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे हस्तांतरीत करण्यात आला आणि त्याची अंमलबाजवणी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयामार्फत होऊ लागली आहे. या दोन्ही परिवर्तनादरम्यान ग्रंथोत्सव समितीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारीच आहेत. पण आता जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयांकडे ग्रंथोत्सव येऊनही ते ग्रंथोत्सव घेण्यात कुचकामी ठरत असल्याचे दिसून येते आहे.
         आपल्या रायगड जिल्ह्याचंच उदाहरण पुरेसं आहे. रायगड जिल्ह्यात पहिला ग्रंथोत्सव  २०११ साली १८,१९, २० डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्या सहकार्याने, रायगड जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने अलिबाग येथील जा.र.ह कन्याशाळेच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. तत्कालिन जिल्हाधिकारी विजय पवार व कर्मचारीवर्गाने चांगली मेहनत घेऊन तो यशस्वी केला. त्यासाठी महाराष्ट्रातील चांगले साहित्यिक, कवी तर आलेच, पण स्थानिक कवी, साहित्यिक, पत्रकार यांना व्यासपीठ दिले गेले. या संयोजनासाठी त्यांनी विविध संघटनांचे सहकार्य घेतले. त्यानंतर प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी सुहास नेवासकर यांच्या कारकीर्दीत रोहा, पनवेल येथे ग्रंथोत्सव आयोजित करण्यात आले. पण तेव्हापासून या ग्रंथोत्सवास घसरण लागली, कारण ग्रंथोत्सवाची औपचारिकता पार पाडली जावू लागली होती. त्यात साहित्यिकांपेक्षा राजकारण्यांना महत्व आले. २०१५ साली जिल्हा माहिती अधिकारी राजू पाटोडकर यांच्या कारकीर्दीत त्यांनी स्थानिक उद्योगांचा प्रायोजत्वाखाली डोंगरे हॉलच्या आवारात झालेल्या ग्रंथोत्सवाला भव्यता आणायचा प्रयत्न केला. त्यांनी ग्रंथदिडीत चक्क टीव्ही स्टार आणून गर्दी खेचण्याचा प्रयत्न केला, पण या प्रयत्नात प्रेक्षक मिळाला आणि वाचक हरवला अशी परिस्थिती झाली. त्यानंतर २०१६ साली जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाकडे ग्रंथोत्सवाचे आयोजन गेल्यावर जिल्ह्यातील या ग्रंथोत्सवाची अधोगती सुरु झाली. जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्रतिभा ताटे यांनी २७,२८,२९ जानेवारी रोजी डोंगरे हॉलच्या आवारात आयोजित केलेल्या ग्रंथोत्सवाच्या निमित्ताने जिल्ह्यातील साहित्यिक,  ग्रंथरसिक, तसेच विविध साहित्य संघटनांना विचारात न घेण्याची मनमानी सुरु केली. हे मनमानीचे सूत्र त्यांनी नवे जिल्हा ग्रंथालय अधिकारी ध.बा. वळवी यांच्याकडे दिले असावे. त्यामुळे २०१७ च्या २२ व २३ नोव्हेंबर रोजी झालेल्या ग्रंथोत्सवात साहित्यिक, कवी यांच्यापेक्षा प्रशासकीय अधिकारी आणि मोजक्या पत्रकारांना उजवे माप दिले गेले आणि या आयोजनात जिल्ह्यातील पत्रकारांना, साहित्यिक, कवींना, साहित्यसंस्थाना (कोमसाप वगळता), सामाजिक-सांस्कृतिक संस्था आणि अगदी वाचकांनासुद्धा विश्‍वासात घेतले गेले नाही. या सर्व प्रक्रियेत ग्रंथोत्सव समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांची ‘याला घ्या, त्याला घ्या, हा नको, तो नको’ असे सांगून संबंधितांनी दिशाभूल केली असावी. पण त्याचा परिणाम या ग्रंथोत्सवावर झाला आणि हा ग्रंथोत्सव अपयशी ठरला.
        ग्रंथोत्सवाचे उद्घाटन २२ नोव्हेंबर रोजी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश महेता यांच्या हस्ते होणार होते. उद्घाटक म्हणून त्यांचे नाव समोर आल्यावर त्यांचे रायगड जिल्ह्यावरील प्रेम पहाता ते येणार नाही, हे ठरलेलेच होते. त्यामुळे त्यांची अनुपस्थिती हा काही आश्‍चर्याचा भाग नव्हता. पण रायगडचे दोन्ही खासदार, सर्व आमदारांनी या ग्रंथोत्सवाकडे पाठ फिरवली.  राजकारण्यांच्या या भाऊगर्दीत भिंगाने शोधता येणारे एकच कवी, साहित्यिकाचे नाव होते, ते म्हणजे अशोक नायगावकर यांचे. तेच विशेष निमंत्रित पाहुणे होते आणि त्यांच्याच हस्ते योगायोगाने या संमेलनाचे उद्घाटन झाले, ही त्यातल्या त्यात समाधानकारक गोष्ट झाली.  उद्घाटनापूर्वी ग्रंथदिंडीचा सोपस्कार पार पाडण्यात आला. या दिंडीत नायगावकरांशिवाय कोणी कवी वा साहित्यिक नव्हता, किवा रसिक वाचकांचाही सहभाग नव्हता. केवळ विद्यार्थ्यांची गर्दी दाखवण्यात आली. या दिंडीत कवी, साहित्यिक म्हणून नायगावकर आणि अलिबागचे प्रथम नागरिक म्हणून नगराध्यक्ष प्रशांत नाईक उपस्थित राहिले, म्हणून या ग्रंथदिंडीची थोडीफार लाज राखली गेली. 
        या ग्रंथोत्सवात ‘माझे आवडते पुस्तक’ ही विद्यार्थ्यांसाठीची वकृत्वस्पर्धा, ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांची ‘काव्य मिश्किली’, ‘ग्रंथांनी मला काय दिले?’ हा प्रशासकीय अधिकार्‍यांचा परिसंवाद,  ‘माध्यमे आणि वाचनसंस्कृती’  हा प्रशासनातील अधिकारी आणि पत्रकारांचा परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. या परिसंवादामध्ये ग्रंथचळवळ वाहून नेणारे साहित्यिक सहभागी नसल्यामुळे आणि न विचारता परिसंवादात सहभागी केल्यामुळे काही पत्रकारांनी या परिसवादात भाग न घेणेच पसंत केले व जिल्ह्यातील पत्रकार, साहित्यिक, साहित्य संघटना यांना या ग्रंथोत्सवात सहभागी न केल्याबद्दल जिल्हा ग्रंथोत्सव समितीचा निषेध केला. या समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारीच असल्यामुळे हा निषेध त्यांच्यापर्यंत पोहचला. ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांची ‘काव्य मिश्किली’ मूठभर रसिकांच्या उपस्थितीत मोठ्या प्रमाणात रिकाम्या खुर्च्यांच्या साक्षीने सादर झाली. त्यांनी आपल्या शैलीने उपस्थितांना भारावून सोडले, परंतु जर योग्य नियोजन झाले असते तर जिल्ह्यातील रसिकांना मोठ्याप्रमाणात याचा आस्वाद घेता आला असता. या रिकाम्या खुर्च्यांची गोष्ट माध्यमांत पसरल्यानंतर दुसर्‍या दिवशीच्या परिसंवादांत या खुर्च्या रिकाम्या दिसू नये म्हणून कॉलेजच्या विद्यार्थ्यांना वेठिस धरण्यात आले. त्यामुळे खुर्च्या तर भरलेल्या दिसल्या, परंतु खर्‍या रसिकांची डोकी तिथे दिसली नाहीत. समारोपाला तेही विद्यार्थी दिसले नाहीत, कारण हा समारंभ सायंकाळी होता, त्यामुळे बक्षीसपात्र विद्यार्थ्यांखेरीज मूठभर संयोजन समितीचीच माणसे तेव्हा उपस्थित होती. जिल्हाधिकारीही उपस्थित नव्हते. कोणत्याही साहित्यिकाच्या हस्ते येथे बक्षीस वितरण झाले नाही. हे अपयश ग्रंथोत्सव समितीचे आहे, पण आता ते या समितीच्या अध्यक्षांपासून ग्रंथालय अधिकार्‍यांपर्यंत कोणी मान्य करणार नाही.
         या ग्रथोत्सवातील पुस्तक प्रदर्शनातील चार-पाच पुस्तकांचे स्टॉल दोन दिवस वाचक आणि पुस्कप्रेमी नागरिकांची वाट पहात होते. या प्रदर्शनात पुस्तकांचे स्टॉल लावून आम्ही फसलो, अशीच स्टॉल मालकांची भावना होती. जिल्ह्यातले पुस्तकप्रेमी नागरिक सोडा, अगदी अलिबागचेही वाचनप्रिय नागरिक सोडा, या कॉलेजचे विद्यार्थीही आमच्या स्टॉलवर फिरकले नाही, त्यांना थेट सभागृहात नेण्यात येत होते, त्यामुळे पुस्तकांची काहीच विक्री झाली नाही, अशी स्टॉल मालकांची खंत होती. याचा अर्थ हा ग्रंथोत्सवाचा फार्सच अलिबागमध्ये घडत होता. मुळात ग्रंथोत्सवातून साहित्यिक, वाचक आणि प्रकाशक यांना एकत्र आणण्याचे कार्य झाले पाहिजे, ग्रंथोत्सव हे मिनी साहित्य संमेलन ठरले पाहिजे, पण आयोजकांच्या आडमुठ्या धोरणांमुळे असे घडू शकले नाही. या जिल्हास्तरिय ग्रंथोत्सवाला गल्लीतल्या उत्सवाचेही स्वरुप नव्हते. गल्लीतला उत्सव आयोजित करण्यासाठीही मेहनत घेतली जाते, पण या जिल्हा ग्रंथोत्सवासाठी फार मेहनत घेतली आहे असे दिसले नाही. ग्रंथोत्सव समितीच्या समन्वय समितीच्या किती बैठका झाल्या, त्यात कोणाकोणाला बोलावण्यात आले हेही गुलदस्त्यात आहे. या ग्रंथोत्सवाचा प्रचारच योग्य प्रकारे करण्यात ही समिती कुचकामी ठरली आहे. अशाने जिल्ह्याच्या ग्रामीण व शहरी भागातील लोकांमध्ये वाचनसंस्कृतीची वाढ कशी होणार? शासकीय ग्रंथोत्सव लोकोत्सव केव्हा होणार? जिल्हा माहिती कार्यालयाने या ग्रंथोत्सवाच्या गोड गोड बातम्या दिल्या असल्या तरी जिल्हा ग्रंथोत्सवात रायगड दिसायला हवा होता, पण अलिबागही दिसला नाही ही शोकांतिका आहे. ही शोकांतिका पुढच्या वर्षीतरी सुखांतिका व्हावी, ग्रंथोत्सव लोकोत्सव व्हावा, लोकांचा सहभाग वाढावा यासाठी या समितीच्या अध्यक्षांनी सजग रहायला हवे. इतकेच.


मंगळवार, २१ नोव्हेंबर, २०१७

कुपोषण... बालमृत्यू... मातामृत्यू... रायगडचा विकास

  -उमाजी म. केळुसकर ⬑ दादागिरी ⬉


       रायगड जिल्हा कण्हतोय... कुथतोय... खड्डे, प्रदूषण, भ्रष्टाचार... एक ना अनेक प्रश्‍नांनी रायगड जिल्हा हाच रुग्ण बनला आहे. जिल्ह्यातील १५ तालुक्यांत बालकांच्या कुपोषणाचा भेडसावणारा प्रश्‍न तसाच आहे. सध्या जिल्ह्यात १ हजार २१ कुपोषित बालके जिल्ह्याच्या तथाकथित विकासाला हसत आहेत. या जिल्ह्याचे पालक, पालकमंत्री प्रकाश महेता या जिल्ह्यातील बालकांचे कुपोषण दूर करु शकत नाही, ते डॉक्टर बनून रायगड जिल्ह्याच्या वेदना तरी दूर कशा करणार? मुळात डॉक्टरला रुग्णांबाबत आस्था हवी आणि रुग्णांच्या मनात डॉक्टरबद्दल श्रद्धा हवी, पण जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या मनात जिल्ह्याबाबत आस्थाच नसल्याने या जिल्ह्यातील जनतेच्या मनात त्यांच्याबद्दल श्रद्धा निर्माण होऊ शकलेली नाही. जनतेच्या लायकीप्रमाणे त्यांना लोकप्रतिनिधी मिळत असतात, पण येथे तर चक्क त्यांच्यावर पालकमंत्री लादला गेला आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या दु:ख, वेदना सतत ठसठसत राहिल्या आहेत. या वेदनेला आता जिल्ह्यातील माता आणि बालकांच्या वाढलेल्या मृत्यूदराने कारुण्याची किनार लागली आहे. २०१६-१७ या वर्षात  जिल्ह्यात ३०५ बालमृत्यू तर २६ मातामृत्यू झाले आहेत. हे अपयश व्यवस्थेचे की व्यवस्थेला खेळवणार्‍या लोकप्रतिनिधींचे, की विकासाच्या नावावर स्वत:चे वस्त्रहरण करु देणार्‍या हतभागी जनतेचे? असा प्रश्‍न पडतो.
       औद्योगिक जिल्हा म्हणून रायगड जिल्ह्याची नवी ओळख आहे. या नव्या ओळखीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील प्रमुख शहरांना नवं रुप मिळालं, प्रमुख गावांना बाळसंही आलं, आर्थिक समृद्धीही आली. तिसरी मुंबईची बीजं या मातीत रोवली जात आहेत. चित्र कसं नितांत सुंदर आहे? पण हे वरवरचं चित्रं आहे. जरा खोलात शिरलं तर या औद्योगिकरणामागचा, या नव्या रुपामागचा, झगमगाटामागचा सेझविरुद्धचा सर्वसामान्य भूमिपुत्रांचा लढा, जिल्ह्याला समृद्धीमुळे आलेल्या बाळशामागे दडलेलं कुपोषण दिसून येईल. स्पष्टच सांगायचं म्हणजे रायगड जिल्ह्यात एकूण १ हजार २१  कुपोषित बालके आहेत. यात आदिवासी बहुलविभागातील कुपोषित बालकांची संख्या मोठ्याप्रमाणात आहे. जिल्ह्याच्या फसव्या विकासाचं वस्त्रहरण करणारी ही आकडेवारी आहे. ही आकडेवारी कोणी ऐर्‍यागैर्‍याने दिली नसून ती खुद्द रायगड जिल्हा परिषदेचा महिला व बाल कल्याण विभाग, आरोग्य विभाग  आणि आदिवासी विकास विभाग यांनी दिली आहे. त्यामुळे या बाबीचे गाभीर्य लक्षात यायला हरकत नसावी.
       रायगड जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये आदिवासींची संख्या मोठी आहे. जनजीवनाच्या किमान म्हणता येतील अशा पाणी, वीज, आरोग्य, रस्ते आणि शिक्षण या सुविधा या भागांत कित्येक वर्षे उपलब्ध नाहीत. कमालीचे दारिद्रय असलेल्या या भागांत कुपोषणाची समस्या निर्माण होणे साहजिकच होते. गेली अनेक वर्षे हे कुपोषणाचे ग्रहण जिल्ह्याला लागले आहे. कुपोषणाचा आकडा कधी खाली तर कधी वर जातो. २०१७ च्या नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यात सॅम (तीव्र कुपोषित) ची १९६ तर मॅम (मध्यम कुपोषित) ची ९०५ कुपोषित बालके आहेत.  ही कुपोषित बालके शोधण्यासाठी ३ हजार २८३ अंगणवाड्यातील १ लाख ५९ हजार १९० बालकांपैकी १ लाख ४६ हजार ५८२ मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यात कर्जत, महाड, श्रीवर्धन,  म्हसळा या तालुक्यांत कुपोषित बालकांचे प्रमाण अधिक असल्याचे आढळून आले. 
         गेल्या वर्षी २०१६ च्या नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यात सॅम (तीव्र कुपोषित) ची २४१ तर मॅम (मध्यम कुपोषित) ची ९५८ कुपोषित बालके आढळली होती.  ही कुपोषित बालके शोधण्यासाठी ३ हजार २८३ अंगणवाड्यातील १ लाख ५५ हजार ७७७ मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यात कर्जत, सुधागड-पाली, पेण, खालापूर या तालुक्यांत कुपोषित बालकांचे प्रमाण अधिक असल्याचे आढळून आले होते. तेव्हा  जिल्ह्यातील आदिवासी बालकांचे हे कुपोषण नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून आदिवासी उपयोजनांतर्गत नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून २५ लाख रुपयांचा तर आदिवासी उपयोजना ५० लाख रुपये असा एकूण ७५ लाखाचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला होता. त्याचे सकारात्मक परिणाम एक वर्षांनंतरही पहायला मिळालेले नाहीत. नाही म्हणायला सुधागड-पाली, पेण, खालापूर तालुक्यातील तीव्र कुपोषण (सॅम) काही प्रमाणात कमी झाले आहे. पण मध्यम कुपोषित (मॅम) बालकांची संख्या लक्षणीय आहेच. गेल्या एक महिन्यात कर्जत तालुक्यात ५३ तीव्र कुपोषित (सॅम), १४६ मध्यम कुपोषित (मॅम) आदिवासी बालके आढळली, हे पहाता कुपोषण रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न होत नाहीत हे लक्षात येते.  कर्जत  तालुक्यात आदिवासींची संख्या मोठी आहे. हा कर्जत तालुका कुपोषणाच्या बाबतीत जिल्ह्यात दरवर्षी चर्चेत असतो. पण जिल्ह्यातील इतर तालुके याला अपवाद नाहीत. मुळात आदिवासी भागातील बालकांना आहार देण्यासाठी अंगणवाड्यांचे माध्यम वापरले जाते. आदिवासी बालकांसाठीच्या पोषक आहार योजनेची सदोष अंमलबजावणी होत राहिल्यामुळेच, तसेच गाव पातळीवरील ‘ग्राम बाल विकास  केंद्रे’ आणि प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालय पातळीवरील ‘बाल उपचार केंद्रे’ अपुर्‍या प्रमाणात असल्यामुळे या भागातील कुपोषित बालकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे, हे वास्तव आहे. 
         विविध राज्य सरकारांनी वेगवेगळ्या योजनांद्वारे आदिवासींना पौष्टिक आहार मिळावा, यासाठी वेगवेगळ्या योजना सुरू केल्या, परंतु झारीतील शुक्राचार्यांच्या साखळीमुळे लाभार्थी आदिवासींच्या पदरात या योजनांचे दान कधीच पडले नाही. ज्या अंगणवाड्यांमधून गरोदर मातांना आणि ५ वर्षांखालील बालकांना पोषण आहार दिला जातो, त्या अंगणवाड्यांसाठी तालुका स्तरावर एकात्मिक बालविकास विभागाकडून प्रकल्प अधिकार्‍याची नेमणूक केली जाते, पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे रायगड जिल्ह्यातील १५ तालुक्यांत प्रकल्प अधिकार्‍यांची १७ पदे आहेत, पण केवळ ६ तालुक्यांना ८ प्रकल्प अधिकारी आहेत, तर उर्वरित ९ तालुक्यात प्रकल्प अधिकार्‍यांची पदे रिक्त आहेत. या तालुक्यांचाही अतिरिक्त पदभार शेजारच्या सदर ८ प्रकल्प अधिकार्‍यांना पहावा लागतो. ही पदे भरण्याबाबत जिल्हा परिषदेकडून वारंवार पाठपुरावा होतो, परंतु काही केल्या ही पदे भरली जात नाहीत. परिणामी जिल्ह्यातील एकात्मिक बालविकास विभागात संबंधित अधिकारी नसल्यामुळे गेली अनेक वर्षे विविध योजनांचा नुसता खेळखंडोबा चालला आहे. कुपोषणाविरुद्ध लढणारी यंत्रणा निर्माण करणे गरजेचे, तेच मुळात केले जात नाही. अर्थात रायगडातच एकात्मिक बालविकास विभागाची अशी परिस्थिती आहे असे नाही, तर संपूर्ण राज्याचा हा प्रश्‍न आहे.
          कुपोषणाच्या बाबतीत यापूर्वीचे आघाडी सरकार व आताचे युती सरकार संवेदनशील आहे, असे दाखवित असले तरी प्रत्यक्षात ते संवेदनशील आहे असे वाटत नाही, तसे नसते तर आज हा प्रश्‍न उभा राहिला नसता.  आदिवासी विभाग, आरोग्य विभाग आणि एकात्मिक बालविकास विभागामध्येही समन्वय नाही. तत्कालिन आघाडी सरकारने ग्रामविकास विभागातून बालविकास विभाग वगळण्याचे ऑगस्ट २०१२ मध्ये ठरविले होते. परंतु तीन वर्षे झाल्यानंतरही त्याची योग्यरित्या अंमलबजावणी झालेली नाही. एकात्मिक बालविकासमधील सर्व निर्णय आजही जिल्हा परिषद प्रशासनाच्या अखत्यारीत होत आहेत. विशेष म्हणजे राज्य सरकारमध्ये महिला बालविकास या विभागाचा स्वतंत्र कारभार असून मंत्रीही स्वतंत्र आहेत. याचा अर्थ व्यवस्थेत सर्व गोंधळ आहे आणि त्याचा फटका संपूर्ण राज्यातील कुपोषित बालकांना बसला आहे, रायगड जिल्ह्यातही हीच परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत रायगड जिल्ह्यातील आदिवासी भागांतील कुपोषणाची समस्या आपोआप नाहीशी होईल, हा आशावाद बाळगला तर तो बाळबोध आशावाद ठरेल.
          एकीकडे रायगड जिल्हा विकासात अग्रेसर असल्याचे आभासी चित्र शासनस्तरावरुन निर्माण केले जात आहे. जिल्ह्यात विविध प्रकल्पांची कामे सुरु आहेत. परंतु या जिल्ह्यात कुपोषण मुक्तीचा ठोस प्रकल्प कधीही उभारण्यात आला नाही. तात्पुरते उपाय अवलंबले गेले, त्यामुळे गेल्या विस वर्षांत विसरता न येण्याजोगी कुपोषणाची प्रकरणे समोर आली. २०१७ सालही कुपोषणाची भीषणता पोटात घेऊन सरणार आहे. पालकमंत्र्यांना या विषयाकडेच काय, जिल्ह्याकडे पहायला वेळ नाही आणि येथील लोकप्रतिनिधींना राजकीय पोषण-कुपोषणाच्या मुद्यापेक्षा आदिवासी बालकांचे कुपोषण, बालकमृत्यू, मातामृत्यू महत्वाचे वाटत नाही. यातून एकूणच मानवी संवेदनेचा मृत्यू झाला आहे, असे म्हटले तर त्यात अयोग्य असे काही नाही. 


गुरुवार, ९ नोव्हेंबर, २०१७

सुरक्षेच्या नावाखाली जलवाहतुकीची अडवणूक

-उमाजी म. केळुसकर ⬑ दादागिरी ⬉



          भारतास ५,५१६ किलोमीटर लांबीची किनारपट्टी नऊ राज्ये आणि चार केंद्रशासित प्रदेशांना स्पर्श करते. त्यातील महाराष्ट्राला ७८० किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे. या  समुद्र किनार्‍याच्या सागरी सुरक्षेची जबाबदारी चार यंत्रणांकडे आहे. किनार्‍यापासून समुद्रात ५ सागरी मैल अंतरापर्यंत सुरक्षेची जबाबदारी कस्टम आणि सागरी पोलीस यांच्यावर आहे. तिथून पुढे १२ सागरी मैलांपर्यंत तटरक्षक दल आणि १२ ते २०० सागरी मैलांपर्यंत सागराच्या सुरक्षेची जबाबदारी भारतीय नौसेनेवर आहे. पण या यंत्रणांतील सुसंवादाच्या अभावामुळे २६ नोव्हेंबर २००८ ला पाकिस्तानी दहशतवाद्यांनी समुद्रमार्गे येऊन मुंबईवर हल्ला केला, तेव्हा देशच नव्हे, तर संपूर्ण जगच हादरले होते. या घटनेनंतर सागरी सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी पावले उचलली गेली, पण ती खर्‍या अर्थाने परिणामकारक नाहीत. त्याचा त्रास वारंवार जलवाहतुकीला होतो आहे. ताज पॅलेस हॉटेलमध्ये उतरणार्‍या देशी व विदेशी अति महत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेच्या नावावर गेट वे ऑफ इंडिया परिसरात संचारबंदी लादली जाते, जलवाहतूक बंद ठेवली जाते, नुकतीच लॅटव्हिया या देशाचे पंतप्रधान मारिस कुसिनस्किस यांच्या जेएनपीटी भेटीसाठी सुरक्षेच्या कारणावरुन जलवाहतूक दोन दिवस बंद ठेवण्यात आली. त्यातून ही सुरक्षा व्यवस्था आहे, की सुव्यवस्थेचे काढलेले धिंडवडे आहेत, असा प्रश्‍न पडतो.
         कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम, टायगर मेमन यांनी १२ मार्च १९९३ ला मुंबई येथे बॉम्बस्ङ्गोट मालिका घडवून आणली. त्यासाठी वापरण्यात आलेली आरडीएक्स स्फोटके पाकिस्तानातून समुद्रीमार्गे रायगड जिल्ह्यामधील श्रीवर्धन तालुक्यातील शेखाडी येथे उतरविण्यात आले आणि ते रस्त्याने मुंबई येथे नेण्यात आले होते. त्यानंतर धरमतर, पेझारी, शीघ्रे, साळाव, तांबडी, मांदाड, इंदापूर, आंबेत, साई, शिरगाव आदी बारा ठिकाणी सागरी तपासणी नाके उभारण्यात आले. या बॉम्बस्ङ्गोट मालिकेनंतर १५ वर्षांनी २००८ साली पाकिस्तानी दहशतवाद्यांनी समुद्रमार्गे येऊन मुंबईवर हल्ला केला. यातील सर्व दहशतवादी मारले गेले असले आणि त्यातील कसाब नावाच्या दहशतवाद्याला जीवंत पकडू फाशी देण्यात आले असले तरी या दहशतवाद्यांनी मुंबईमध्ये प्रचंड जीवितहानी घडवून आणली. या घटनेने पुन्हा एकदा सागरी सुरक्षचे महत्व अधोरेखित झाले. पण सागरी सुरक्षेच्या नावावर नागरी निर्बंध घालण्याचा निर्बुद्धपणा केला जावू लागला लागला. २०१० साली प्रामुख्याने ही बाब समोर आली. त्यावर्षी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा भारत दौर्‍यावर आले होते. जगातील दहशतवाद्यांच्या ’हिट लिस्ट’वर ओबामा यांचा पहिला नंबर होता. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेला सर्वाधिक प्राधान्य देणे आवश्यकच होते. त्यानुसार त्यांच्या मुंबईच्या वास्तव्यात ताज हॉटेलच्या परिसरातील जलवाहतूक पूर्णपणे बंद केली गेली, याबद्दल उघडपणे ङ्गारशी नाराजी व्यक्त केली गेली नाही. मात्र या जलवाहतूक बंदीचा मोठा ङ्गटका मच्छिमारांना आणि मुंबई ते अलिबाग दरम्यान जाणार्‍या-येणार्‍या हजारो जणांना बसला. त्यानंतरही देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान, इतर अतिमहत्वाच्या व्यक्तींमुळे गेट वे ऑफ इंडियावरील जलवाहतूक सुरक्षेच्या कारणावरुन सातत्याने बंद करण्यात आली आहे. ही जलवाहतूक अर्धाएक तासांसाठी नाही तर एक ते दोन दिवस अशी बंद करण्यात आली आहे. यातून आपली सुरक्षा यंत्रणा सुरक्षेच्या बाबतीत किती मागास आहे हे दिसून येते. 
          या मागास सुरक्षा यंत्रणांमुळे दहशतवाद्यांना भय वाटत नाही, पण सर्वसामान्यांना छळ वाटतो, हे काही बरे नव्हे. काही दिवसांपूर्वी गेट वे ऑफ इंडियावर याच घटनेची पुनरावृत्ती झाली. ५ दिवसीय भारत दौर्‍यावर आलेले लॅटव्हिया या देशाचे पंतप्रधान मारिस कुसिनस्किस यांच्या नेतृत्वाखील उच्चस्तरीय शिष्टमंडळाने शनिवार, ४ नोव्हेंबर रोजी गेट वे ऑफ इंडिया येथून समुद्रमार्गे उरण येथील जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) या बंदरास भेट दिली. पण सुरक्षेच्या कारणावरुन गेट वे ऑफ इंडियाचा परिसर आणि जेटी क्र. १,२,३,४ पूर्णपणे बंद ठेवल्यामुळे शनिवार, ४ नोव्हेंबरला ११-३० ते १७-३०, तर रविवार, ५ नोव्हेंबरला ९-३० ते १५ वाजेदरम्यान दोन दिवस सर्व प्रकारच्या बोट वाहतुकीस बंदी घालण्यात आली होती. परदेशी पाहुण्यांची सुरक्षा हा या देशाच्या अस्मिता आणि जबाबदारीचा भाग आहे. त्यामुळे ही जबाबदारी योग्यरित्या बजवायलाच हवी. पण रस्तेवाहतूक किंवा जलवाहतूक बंद ठेवून सुरक्षेची जबाबदारी पार पाडली जाते तेव्हा सुरक्षेसाठी आपण किती आधुनिक तंत्रज्ञान आणि मानवी बुद्धिमत्ता वापरतो, असा प्रश्‍न उपस्थित होतो.
           मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथील देशी-विदेशी अति महत्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षा व्यवस्थेचा मनस्ताप रायगड जिल्ह्याच्या पर्यटनाला आणि पर्यटकांना, प्रवासी जलवाहतुकीला प्रामुख्याने सहन करावा लागतो. एकीकडे रायगड जिल्हा जागतिक पर्यटनाच्या दृष्टीने सक्षम करण्याच्या गप्पा मारल्या जात असताना आणि औद्योगिक जिल्हा म्हणून फुशारक्या मारल्या जात असताना सातत्याने देशी व विदेशी अति महत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेसाठी जलवाहतूक बंद ठेवली जाते, यातून पर्यटन आणि उद्योग, जलवाहतूकदार, मच्छिमार, चाकरमानी यांचे किती नुकसान होते, याची दखल सुरक्षा यंत्रणा, राज्य सरकारला घ्यावीसी वाटत नाही, हे दुर्दैवी आहे.  वास्तविक ‘ताज पॅलेस हॉटेलमध्ये उतरणार्‍या देशी व विदेशी अति महत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेसाठी एलिङ्गंटा, उरण, अलिबाग येथे जाणारी जलवाहतूक बंद ठेवली जाते. वर्षातून साधारण ३० दिवस अशा घटना घडतात. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय तर होतेच पण, अनेकांचा रोजगारही बुडतो, त्यावर कोणता उपाय योजणार?’ असा प्रश्‍न २०१५ ला आ. जयंत पाटील यांनी विधानपरिषदेत उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी ‘मुंबईच्या ताज पॅलेस हॉटेलमध्ये उतरणार्‍या अति महत्त्वाच्या व्यक्तींना वेळप्रसंगी अतिरिक्त सुरक्षाव्यवस्था देऊ, पण जलवाहतूक बंद ठेवली जाणार नाही’, असे आश्वासन दिले होते. पण हे आश्‍वासन पोकळ होते, हे त्या आश्‍वासनानंतरही सातत्याने जलवाहतूक बंद ठेवली गेल्याने दिसून येते. 
           सागरी सुरक्षा हे दोन शब्द भारदस्त वाटत असले तरी यामागचे वास्तव मात्र हास्यास्पद आहे. गेल्या २५ वर्षांत त्यावर खूप लिहिले गेले आहे, बोलले गेले आहे, त्यामुळे त्याबद्दल नव्याने सांगायची गरज नाही. नाही म्हणायला २६ नोव्हेंबर २००८ च्या मुंबईवरील हल्ल्यानंतर सागरी सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आणि त्यानंतर विविध उपाययोजना केल्या जाऊ लागल्या आहेत, पण या उपाययोजना तितक्याच मंदगतीने अमलात येत आहेत. आता तर विद्यमान केंद्र सरकारने तटरक्षक दल मजबूत करण्याचे मनावर घेतले आहे, पण त्यासाठीही २०२२ ते २६ साल उजडावे लागणार आहे. पण तोपर्यंत काय? हा प्रश्‍न उरतोच. सागरी सुरक्षा करताना मच्छिमारांना ओळखपत्रे दिली असली तरी जलप्रवास करणार्‍यांच्या सुरक्षेचे काय? सुविधेचे काय? गेटवे ऑफ इंडियावर त्यांची प्रवासाची सुविधा अति महत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेसाठी काढून घेण्यात येते हा कोणता शहाणपणा आहे? यातून रायगड जिल्ह्याचे पर्यटन कसे वाढणार? एकीकडे कोकण प्रवासी बोटींचे पुन्हा सुवर्णयुग आणण्याची तयारी सुरु असताना जर अशी वारंवार जलवाहतुकीवर सुरक्षेच्या कारणावरुन बंदी आणली जाणार असेल दुखणं पोटाचं आणि उपाय पायाला अशीच परिस्थिती म्हणावी लागेल. या सुरक्षा व्यवस्थेची पण गंमत आहे. गेटवे ऑफ इंडियाची सुरक्षा व्यवस्था कडक आहे. पण मांडवा बंदरात सुरक्षेची बोंब आहे. तेथे कसलीही तपासणी होत नाही. तपासणी आणि अडवणूक यात फरक आहे. सुरक्षेसाठी प्रवाशांची तपासणीला हरकत नसते तर अडवणुकीला हरकत असते. त्यामुळे तेथे तपासणी झालीच पाहिजे. मुंबई आणि रायगडच्या सुरक्षेच्या दृष्टीने मांडवा आणि  गेटवे ऑफ इंडिया येथे पर्यटक, प्रवासी यांची तपासणी झालीच पाहिजे, पण समुद्रावरही ससाण्यासारखी नजर पाहिजे, गुप्तवार्ता दर्जा वाढवला गेला पाहिजे आणि समुद्री पोलीस, तटरक्षक दल व नौदल यांच्यातील समन्वय आणखी सुधारला पाहिजे. खर्‍या अर्थाने असे झाले तर कोणा देशी-विदेशी अति महत्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेसाठी जलवाहतूक बंद ठेवण्याची गरज भासणार नाही आणि समुद्रातील संशयित हालचालींनाही पायबंद बसेल. 


बुधवार, १ नोव्हेंबर, २०१७

जत्रांचा पर्यटनाच्या दृष्टीने जिल्हा प्रशासन केव्हा विचार करणार?

 -उमाजी म. केळुसकर ⬑ रायगडचा डंका ⬉


    रायगड जिल्ह्यात पर्यटनाच्या विविध शाखा आहेत, त्यात विविध देवस्थानातील जत्रा ही एक विशेष शाखा आहे. पण या शाखेकडे शासनाचे, पर्यटन मंत्रालयाचे अजिबात लक्ष नाही. कोणत्याही सरकारी मदतीविना परंपरेने चालू असलेल्या या जत्रा येथील ग्रामीण जीवनाचा एक अविभाज्य भाग आहेत. या जत्रांपासून प्रेरणा घेऊन हल्ली शहरांत विविध फेस्टिवल आयोजित केले जातात, पण खरी मजा या जत्रांमध्येच आहे. १८८२ च्या सुमारास रायगड जिल्ह्यात (तत्कालीन कुलाबा जिल्ह्यात) ३१ ठिकाणी जत्रा भरत, असा रायगड गॅझेटिअरमध्ये उल्लेख सापडतो. काळाच्या ओघात काही जत्रा बंद पडल्या, तर काही नव्याने सुरु झाल्या असल्या तरी आजही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जत्रा भरतात, पण या जत्रांपैकी काही जत्रांनाच अधिक प्रसिद्धी मिळाली आहे. त्यामुळे इतरही जत्रांना वलय प्राप्त करुन देणे गरजेचे आहे. ग्रामीण जीवनात चैतन्य फुलविणार्‍या या जत्रोत्सवांचा पर्यटनाच्या दृष्टीनेही विचार केला गेला पाहिजे. शासनाने तसा विचार केला तर ग्रामीण जीवनाचे हे विशेष अंग अधिक समृद्ध होईल.
     मंगळवार, ३१ ऑक्टोबरपासून खालापूर तालुक्यातील साजगाव-ताकई येथील बोंबल्या विठोबाची जत्रा सुरु झाली आहे. ती मंगळवार, १४ नोव्हेंबर रोजी संपणार आहे. आजपासून दोन दिवस अलिबाग तालुक्यातील आवासची नागेश्‍वराची जत्रा गुरुवार, २ नोव्हेंबर ते शुक्रवार ३ नोव्हेंबर अशी भरत आहेत. ही जत्रा आटोपताच दुसर्‍या दिवशी कनकेश्‍वराची जत्रा शनिवार, ४ नोव्हेंबर ते रविवार ५ नोव्हेंबर असे दोन दिवस भरणार आहे. त्यानंतर वरसोली येथील आंग्रेकालीन विठोबाची जत्रा मंगळवार, १४ नोव्हेंबर ते शनिवार, १८ नोव्हेंबर असे पाच दिवस भरणार आहे. रविवार, ३ डिसेंबर रोजी थळ टेकडी, शहाबाज टेकडी, रसानी टेकडी अशा अनेक ठिकाणी श्रीदत्त जयंतीच्या जत्रा भरणार आहेत. त्यात चौल-भोवाळे येथील जत्रा रविवार, ३ डिसेंबर ते गुरुवार, ७ डिसेंबर असे पाच दिवस असणार आहे. त्यानंतरही नव्या वर्षांत २०१८ ला जिल्ह्यात इतर देवस्थानांच्याही छोट्यामोठ्या जत्रा उत्साहात भरणार आहेत. तसं पहाता या जत्रा पावसाळा सोडल्यास वर्षभर विविध ठिकाणी आयोजित केल्या जातात. ग्रामीण जीवनात चैतन्याचे रंग भरणार्‍या या जत्रांचे अनन्यसाधारण महत्व आहे. 
      कोणतीही जाहिरातबाजी न करता या जत्रा भरत असतात आणि त्यात लोकसहभाग मोठा असतो. जत्रेचं जटील व्यवस्थापनही स्थानिक गावकरीच कुशलतेने पार पाडत असतात. ग्रामपंचायत, देवस्थान आणि ग्रामस्थ यांच्या सहकार्यातून जत्रांचं नेत्रदीपक असं स्वरुप हल्ली पहायला मिळते. जत्रेच्या ह्या प्रधान धार्मिक अंगासोबतच तिला सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक अशीही अंगे आहेत. जत्रेत आजूबाजूच्या खेडोपाडी तयार होणार्‍या वस्तूंचा व्यापार मोठ्या प्रमाणावर होऊन, त्यांवर खेड्यांतील कारागिरांचा चरितार्थ चालतो. जत्रेत आबाल-वृद्ध, स्त्रीपुरुष सणाप्रमाणे यथाशक्ती वेशभूषा करून मोठ्या सख्येने सहभागी होऊन सामाजिक जीवनाचा उत्साहपूर्ण अनुभव घेतात. प्राचीन काळी दळणवळणाची साधने कमीच असल्यामुळे जत्रांमधून त्या त्या परिसरात तयार होणार्‍या वस्तूंना व मालाला चांगलीच मागणी असे. म्हणूनच जत्रेलाही एक उत्कृष्ट बाजारपेठ म्हणून महत्त्व होते आणि आजही काही प्रमाणात ते आहे. कापड, भांडी कुंडी, खाद्यपदार्थ, मिठाई, बैलगाड्या व दमण्या, जनावरे, खेळणी इ. वस्तूंचा व्यापार जत्रांमधून विशेष प्रमाणावर चालतो. महाराष्ट्रातील काही जत्रा तर विशिष्ट जनावरांच्या व्यापारांसाठीच प्रसिद्ध आहेत. उदा., नगर जिल्ह्यातील कानिङ्गनाथाची जत्रा गाढवांच्या व खेचरांच्या व्यापारांसाठी, तर नांदेड जिल्ह्यातील मालेगाव येथील खंडोबाची जत्रा घोड्यांच्या व्यापारांसाठी प्रसिद्ध आहे. या जत्रेला खंडोबाची जत्रा म्हणण्याऐवजी लोक ‘घोड्याची जत्रा’ म्हणूनच ओळखतात. रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील साजगाव-ताकई येथील बोंबल्या विठोबाची जत्रा बैल बाजार, घोंगडी आणि सुकी मच्छी यासाठी प्रसिद्ध आहे. सुमारे साडेतीनशे वर्षांपूर्वी संत तुकाराम महाराज हे मिरचीचा व्यवसाय करीत असताना साजगाव येथील डोंगरावर येऊन पैशांची वसूली करण्यासाठी बोंब (हाक) मारीत असत, म्हणून या जत्रेला बोंबल्या विठोबाची जत्रा म्हणून ओळखले जाते, अशी एक आख्यायिका आहे. तेथे सुके बोंबिल मोठ्या प्रमाणात विकले जातात म्हणून येथील विठुरायाला चक्क बोंबल्या विठोबा नाव पडले, अशीही दुसरी गमतीशीर आख्यायिका सांगितली जाते. काहीही असो येथील विठल्ल बोंबल्या विठल्ल म्हणून प्रसिद्ध आहे, हे वास्तव आहे.
       जत्रांतून तमाशा, दशावतारी नाटके, कुस्त्यांचे ङ्गड, बैलगाड्यांच्या शर्यती, सर्कस, चित्रपट, आकाशपाळणे, ङ्गिरते लाकडी घोडे, जादूचे खेळ इ. करमणुकीच्या कार्यक्रमांचा प्रामुख्याने अंतर्भाव असतो. कीर्तन, भजन, प्रवचन तसेच विविध स्तरांतील लोक एकत्र जमल्यामुळे त्यांच्यात होणारी विचारांची व कल्पनांची देवाणघेवाण यांमुळे त्यांचे सांस्कृतिक उद्बोधनही जत्रेत होते व सामाजिक एकात्मता दृढ होण्यास मदत होते. असे असतानाही या जत्रांकडे राज्याच्या पर्यटन विभागाचे आणि जिल्हा प्रशासनांचे पाहिजे तेवढे लक्ष नाही. या जत्रांची प्रसिद्धी इतर शहरांत आणि राज्यांत होईल अशी यंत्रणा राज्य शासनाने उभारणे गरजेचे आहे. तसे झाले तर या जत्रांचा आस्वाद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात परजिल्ह्यातून, परराज्यांतून, अगदी परदेशातूनही पर्यटक मोठ्या प्रमाणात येतील. हल्ली विविध संस्था शहरात भव्य फेस्टिवल भरवतात. मंत्र्यासंत्र्यांच्या हस्ते त्यांचं उद्घाटन होतं, या फेस्टिवलना मोठमोठ्या कंपन्या प्रायोजक असतात, त्यामुळे त्यांना निधीची चणचण भागत नाही. बर्‍याच ठिकाणी या फेस्टिवलमध्ये प्रवेश शुल्क भरावे लागते. त्यात लावण्यात येणारे स्टॉल्सही महागडे असतात. पण जत्रांचा उद्देश हा निव्वळ व्यापारी नसल्यामुळे सामान्य ते असामान्य सर्वांसाठी त्या आनंददायी असतात. येथील स्टॉल्स विक्रेत्यांना आणि त्यातील माल जत्रेकरुंच्या खिशाला परवडणारा असतो. असे असूनही या पारंपरिक जत्रांच्या नशिबी उपेक्षाच पडते. या जत्रांना कुठल्याही स्थानिक कंपन्या मदत करीत नाहीत की शासन सहकार्य करीत नाही. तरीही जत्रा टिकून आहेत. काळानुरुप त्यात काही बदल झाले. पिढ्या बदलल्या पण उत्साहात बदल झाला नाही. 
       या जत्रांमध्ये केवळ पोलीस बंदोबस्त देऊन उपयोगाचे नाही तर जत्रांमध्ये आलेल्यांना विविध सुविधांची पूर्तता केली जाणे गरजचे आहे. स्थानिक पातळीवर शक्य त्या सुविधा उभारल्या जातात, पण या सुविधांना मर्यादा पडतात. शासनाच्या वतीने पर्यटनवृद्धीसाठी या जत्रांसंदर्भात मास्टर प्लॅन आखणे गरचे आहे. राज्यपातळीवर हे व्हायचे तेव्हा होईल, पण रायगड जिल्हा पातळीवर जिल्हा प्रशासनाच्या वतीने जत्रांबाबत ठोस उपक्रम राबविता येणे शक्य आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने पर्यटन वाढीबाबत प्रयत्न होत आहेत. रायगड जिल्ह्यात असणार्‍या विविध ऐतिहासिक स्थळांना जसे प्राचीन गावे, वीर पुरुषांची गावे, खिंडी यांना जोडून ऐतिहासिक पर्यटनाचे एक जाळे विकसित करुन पर्यटकांना आपल्या जिल्ह्याकडे मोठ्याप्रमाणात आकर्षित करुन घेण्याचा जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न आहे.  या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून त्यात १५ तालुक्यांतील या जत्रांचा समावेश केला तर ते निश्‍चितच रायगड जिल्ह्याच्या सांस्कृतिक वैभवात भर टाकणारे ठरेल. रायगड जिल्ह्याचे पर्यटन वाढते आहे. फक्त येथील वैशिष्ट्यांची प्रसिद्धी पद्धतशीर होणे गरजेचे आहे. जत्रा हे रायगड जिल्ह्यातील अनेक वैशिष्ट्यांपैकी एक वैशिष्ट्य आहे, त्या वैशिष्ट्याचा प्रचार आणि प्रसार जिल्हा पातळीवर झाला पाहिजे. जिल्हा प्रशासनाने आपल्या पातळीवरुन हे केले पाहिजे. जिल्हा प्रशासन काय काय करणार हा मुद्दा नाही, तर प्रशासनाची तशी मानसिकता पाहिजे. इतकेच.