बुधवार, १ नोव्हेंबर, २०१७

जत्रांचा पर्यटनाच्या दृष्टीने जिल्हा प्रशासन केव्हा विचार करणार?

 -उमाजी म. केळुसकर ⬑ रायगडचा डंका ⬉


    रायगड जिल्ह्यात पर्यटनाच्या विविध शाखा आहेत, त्यात विविध देवस्थानातील जत्रा ही एक विशेष शाखा आहे. पण या शाखेकडे शासनाचे, पर्यटन मंत्रालयाचे अजिबात लक्ष नाही. कोणत्याही सरकारी मदतीविना परंपरेने चालू असलेल्या या जत्रा येथील ग्रामीण जीवनाचा एक अविभाज्य भाग आहेत. या जत्रांपासून प्रेरणा घेऊन हल्ली शहरांत विविध फेस्टिवल आयोजित केले जातात, पण खरी मजा या जत्रांमध्येच आहे. १८८२ च्या सुमारास रायगड जिल्ह्यात (तत्कालीन कुलाबा जिल्ह्यात) ३१ ठिकाणी जत्रा भरत, असा रायगड गॅझेटिअरमध्ये उल्लेख सापडतो. काळाच्या ओघात काही जत्रा बंद पडल्या, तर काही नव्याने सुरु झाल्या असल्या तरी आजही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जत्रा भरतात, पण या जत्रांपैकी काही जत्रांनाच अधिक प्रसिद्धी मिळाली आहे. त्यामुळे इतरही जत्रांना वलय प्राप्त करुन देणे गरजेचे आहे. ग्रामीण जीवनात चैतन्य फुलविणार्‍या या जत्रोत्सवांचा पर्यटनाच्या दृष्टीनेही विचार केला गेला पाहिजे. शासनाने तसा विचार केला तर ग्रामीण जीवनाचे हे विशेष अंग अधिक समृद्ध होईल.
     मंगळवार, ३१ ऑक्टोबरपासून खालापूर तालुक्यातील साजगाव-ताकई येथील बोंबल्या विठोबाची जत्रा सुरु झाली आहे. ती मंगळवार, १४ नोव्हेंबर रोजी संपणार आहे. आजपासून दोन दिवस अलिबाग तालुक्यातील आवासची नागेश्‍वराची जत्रा गुरुवार, २ नोव्हेंबर ते शुक्रवार ३ नोव्हेंबर अशी भरत आहेत. ही जत्रा आटोपताच दुसर्‍या दिवशी कनकेश्‍वराची जत्रा शनिवार, ४ नोव्हेंबर ते रविवार ५ नोव्हेंबर असे दोन दिवस भरणार आहे. त्यानंतर वरसोली येथील आंग्रेकालीन विठोबाची जत्रा मंगळवार, १४ नोव्हेंबर ते शनिवार, १८ नोव्हेंबर असे पाच दिवस भरणार आहे. रविवार, ३ डिसेंबर रोजी थळ टेकडी, शहाबाज टेकडी, रसानी टेकडी अशा अनेक ठिकाणी श्रीदत्त जयंतीच्या जत्रा भरणार आहेत. त्यात चौल-भोवाळे येथील जत्रा रविवार, ३ डिसेंबर ते गुरुवार, ७ डिसेंबर असे पाच दिवस असणार आहे. त्यानंतरही नव्या वर्षांत २०१८ ला जिल्ह्यात इतर देवस्थानांच्याही छोट्यामोठ्या जत्रा उत्साहात भरणार आहेत. तसं पहाता या जत्रा पावसाळा सोडल्यास वर्षभर विविध ठिकाणी आयोजित केल्या जातात. ग्रामीण जीवनात चैतन्याचे रंग भरणार्‍या या जत्रांचे अनन्यसाधारण महत्व आहे. 
      कोणतीही जाहिरातबाजी न करता या जत्रा भरत असतात आणि त्यात लोकसहभाग मोठा असतो. जत्रेचं जटील व्यवस्थापनही स्थानिक गावकरीच कुशलतेने पार पाडत असतात. ग्रामपंचायत, देवस्थान आणि ग्रामस्थ यांच्या सहकार्यातून जत्रांचं नेत्रदीपक असं स्वरुप हल्ली पहायला मिळते. जत्रेच्या ह्या प्रधान धार्मिक अंगासोबतच तिला सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक अशीही अंगे आहेत. जत्रेत आजूबाजूच्या खेडोपाडी तयार होणार्‍या वस्तूंचा व्यापार मोठ्या प्रमाणावर होऊन, त्यांवर खेड्यांतील कारागिरांचा चरितार्थ चालतो. जत्रेत आबाल-वृद्ध, स्त्रीपुरुष सणाप्रमाणे यथाशक्ती वेशभूषा करून मोठ्या सख्येने सहभागी होऊन सामाजिक जीवनाचा उत्साहपूर्ण अनुभव घेतात. प्राचीन काळी दळणवळणाची साधने कमीच असल्यामुळे जत्रांमधून त्या त्या परिसरात तयार होणार्‍या वस्तूंना व मालाला चांगलीच मागणी असे. म्हणूनच जत्रेलाही एक उत्कृष्ट बाजारपेठ म्हणून महत्त्व होते आणि आजही काही प्रमाणात ते आहे. कापड, भांडी कुंडी, खाद्यपदार्थ, मिठाई, बैलगाड्या व दमण्या, जनावरे, खेळणी इ. वस्तूंचा व्यापार जत्रांमधून विशेष प्रमाणावर चालतो. महाराष्ट्रातील काही जत्रा तर विशिष्ट जनावरांच्या व्यापारांसाठीच प्रसिद्ध आहेत. उदा., नगर जिल्ह्यातील कानिङ्गनाथाची जत्रा गाढवांच्या व खेचरांच्या व्यापारांसाठी, तर नांदेड जिल्ह्यातील मालेगाव येथील खंडोबाची जत्रा घोड्यांच्या व्यापारांसाठी प्रसिद्ध आहे. या जत्रेला खंडोबाची जत्रा म्हणण्याऐवजी लोक ‘घोड्याची जत्रा’ म्हणूनच ओळखतात. रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील साजगाव-ताकई येथील बोंबल्या विठोबाची जत्रा बैल बाजार, घोंगडी आणि सुकी मच्छी यासाठी प्रसिद्ध आहे. सुमारे साडेतीनशे वर्षांपूर्वी संत तुकाराम महाराज हे मिरचीचा व्यवसाय करीत असताना साजगाव येथील डोंगरावर येऊन पैशांची वसूली करण्यासाठी बोंब (हाक) मारीत असत, म्हणून या जत्रेला बोंबल्या विठोबाची जत्रा म्हणून ओळखले जाते, अशी एक आख्यायिका आहे. तेथे सुके बोंबिल मोठ्या प्रमाणात विकले जातात म्हणून येथील विठुरायाला चक्क बोंबल्या विठोबा नाव पडले, अशीही दुसरी गमतीशीर आख्यायिका सांगितली जाते. काहीही असो येथील विठल्ल बोंबल्या विठल्ल म्हणून प्रसिद्ध आहे, हे वास्तव आहे.
       जत्रांतून तमाशा, दशावतारी नाटके, कुस्त्यांचे ङ्गड, बैलगाड्यांच्या शर्यती, सर्कस, चित्रपट, आकाशपाळणे, ङ्गिरते लाकडी घोडे, जादूचे खेळ इ. करमणुकीच्या कार्यक्रमांचा प्रामुख्याने अंतर्भाव असतो. कीर्तन, भजन, प्रवचन तसेच विविध स्तरांतील लोक एकत्र जमल्यामुळे त्यांच्यात होणारी विचारांची व कल्पनांची देवाणघेवाण यांमुळे त्यांचे सांस्कृतिक उद्बोधनही जत्रेत होते व सामाजिक एकात्मता दृढ होण्यास मदत होते. असे असतानाही या जत्रांकडे राज्याच्या पर्यटन विभागाचे आणि जिल्हा प्रशासनांचे पाहिजे तेवढे लक्ष नाही. या जत्रांची प्रसिद्धी इतर शहरांत आणि राज्यांत होईल अशी यंत्रणा राज्य शासनाने उभारणे गरजेचे आहे. तसे झाले तर या जत्रांचा आस्वाद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात परजिल्ह्यातून, परराज्यांतून, अगदी परदेशातूनही पर्यटक मोठ्या प्रमाणात येतील. हल्ली विविध संस्था शहरात भव्य फेस्टिवल भरवतात. मंत्र्यासंत्र्यांच्या हस्ते त्यांचं उद्घाटन होतं, या फेस्टिवलना मोठमोठ्या कंपन्या प्रायोजक असतात, त्यामुळे त्यांना निधीची चणचण भागत नाही. बर्‍याच ठिकाणी या फेस्टिवलमध्ये प्रवेश शुल्क भरावे लागते. त्यात लावण्यात येणारे स्टॉल्सही महागडे असतात. पण जत्रांचा उद्देश हा निव्वळ व्यापारी नसल्यामुळे सामान्य ते असामान्य सर्वांसाठी त्या आनंददायी असतात. येथील स्टॉल्स विक्रेत्यांना आणि त्यातील माल जत्रेकरुंच्या खिशाला परवडणारा असतो. असे असूनही या पारंपरिक जत्रांच्या नशिबी उपेक्षाच पडते. या जत्रांना कुठल्याही स्थानिक कंपन्या मदत करीत नाहीत की शासन सहकार्य करीत नाही. तरीही जत्रा टिकून आहेत. काळानुरुप त्यात काही बदल झाले. पिढ्या बदलल्या पण उत्साहात बदल झाला नाही. 
       या जत्रांमध्ये केवळ पोलीस बंदोबस्त देऊन उपयोगाचे नाही तर जत्रांमध्ये आलेल्यांना विविध सुविधांची पूर्तता केली जाणे गरजचे आहे. स्थानिक पातळीवर शक्य त्या सुविधा उभारल्या जातात, पण या सुविधांना मर्यादा पडतात. शासनाच्या वतीने पर्यटनवृद्धीसाठी या जत्रांसंदर्भात मास्टर प्लॅन आखणे गरचे आहे. राज्यपातळीवर हे व्हायचे तेव्हा होईल, पण रायगड जिल्हा पातळीवर जिल्हा प्रशासनाच्या वतीने जत्रांबाबत ठोस उपक्रम राबविता येणे शक्य आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने पर्यटन वाढीबाबत प्रयत्न होत आहेत. रायगड जिल्ह्यात असणार्‍या विविध ऐतिहासिक स्थळांना जसे प्राचीन गावे, वीर पुरुषांची गावे, खिंडी यांना जोडून ऐतिहासिक पर्यटनाचे एक जाळे विकसित करुन पर्यटकांना आपल्या जिल्ह्याकडे मोठ्याप्रमाणात आकर्षित करुन घेण्याचा जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न आहे.  या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून त्यात १५ तालुक्यांतील या जत्रांचा समावेश केला तर ते निश्‍चितच रायगड जिल्ह्याच्या सांस्कृतिक वैभवात भर टाकणारे ठरेल. रायगड जिल्ह्याचे पर्यटन वाढते आहे. फक्त येथील वैशिष्ट्यांची प्रसिद्धी पद्धतशीर होणे गरजेचे आहे. जत्रा हे रायगड जिल्ह्यातील अनेक वैशिष्ट्यांपैकी एक वैशिष्ट्य आहे, त्या वैशिष्ट्याचा प्रचार आणि प्रसार जिल्हा पातळीवर झाला पाहिजे. जिल्हा प्रशासनाने आपल्या पातळीवरुन हे केले पाहिजे. जिल्हा प्रशासन काय काय करणार हा मुद्दा नाही, तर प्रशासनाची तशी मानसिकता पाहिजे. इतकेच.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा