मंगळवार, २६ जुलै, २०१६

जमावबंदी करायला पर्यटक काही दंगलखोर नाहीत

-उमाजी म. केळुसकर ⬑ खारावारा ⬉


     कर्जत तालुक्यातील सोलनपाडा या बंधारावजा धरणात रविवार, १७ जुलै रोजी तिघा पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाने या धरणासह पाली-भूतिवली, पळसदरी, डोंगरपाडा, साळोख, अवसरे, पाषाणे, खांडपे, कशेळे या धबधब्यांवर पुढील ३ महिने फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ लावून जमावबंदी आदेश लागू केला आहे. धरणे संरक्षित क्षेत्र असतात. तिथे एकवेळ बंदी समजू शकते आणि या सोलपाडा धरणाच्या मुख्य जलाशयात जाण्यास आधीपासूनच परवानगी नाही, पण धबधब्यांवर जाण्यास  १४४ कलम लावणे म्हणजे अतिरेक आहे. या धरण आणि धबधब्यांवर पाचपेक्षा जास्त पर्यटकांना एकत्र जाता येणार नाही. याचा अर्थ पर्यटक म्हणजे प्रशासनाला दंगेखोर वाटले की काय? कलम १४४ प्राणघातक हत्त्यारासह बेकायदेशीर जमावात सामील होणे, याकरीता वापरतात. तेथे पर्यटकांची झालेली गर्दी हा बेकायदेशीर जमाव आहे, असा जर प्रशासन अर्थ काढत असेल तर ते भयानक आहे. यातून रायगड जिल्ह्याच्या पर्यटनाचीच बदनामी होत आहे.
     रायगड जिल्हा पर्यटकांसाठी आकर्षण केंद्र बनले आहे. पावसाळा, उन्हाळा, हिवाळा या तीनही ऋतूंत या जिल्ह्याचे रुप विलोभनीय असते. येथील धरणे, येथील धबधबे, येथील समुद्र, येथील किल्ले, येथील डोंगर, येथील लेणी हे या जिल्ह्याचे अलंकार आहेत आणि या अलंकारांची अनुभुती घेण्यासाठी पर्यटक मोठ्याप्रमाणात येथे येत आहेत. शनिवार, रविवारी तर रायगड जिल्ह्याच्या पर्यटनाला भरती आलेली असते. पावसाळ्यात या जिल्ह्याला निसर्ग कवितेचेच रुप येते. धरणं भरलेली असतात, समुद्राचं अंतरंग क्षणाक्षणाला बदलत असतं, हिरवे डोंगर, हिरवी शेती, हिरवी कुरणे, फेसाळते धबधबे, असा रुबाब रायगड जिल्ह्याचा असतो. या रुबाबाचा रायगडकरांना अभिमान आहे आणि पर्यटकांना आकर्षण आहे. म्हणूनच पावसाळी पर्यटनासाठी, वर्षासहलींसाठी पर्यटक रायगडला पसंती देतात. 
      रायगड जिल्हा पुणे, ठाणे, मुंबई या जिल्ह्यांच्या हाकेच्या अंतरावर असल्यामुळे एक-दोन दिवसाच्या सहलीचेही हे आवडते ठिकाण आहे. पण जिल्हा प्रशासनाच्या उदासिनतेमुळे रायगडच्या पर्यटनावरच प्रश्‍नचिन्ह उमटण्याची चिन्हे दिसत आहेत. त्याचे ताजे उदाहरण कर्जत तालुक्यातील सोलनपाडा या बंधारावजा धरणाचे आहे. आठवड्याला किमान दहा हजार पर्यटक धरणावर येतात. या धरणावर येणार्‍या पर्यटकांच्या अतिरेकी उत्साहामुळे, गैरवर्तनामुळे, मद्यपींच्या हुल्लडबाजीमुळेही स्थानिकांना मनस्ताप होत आहे. त्यामुळे या परिसरातील धरण व धबधब्यांवर पर्यटकांना बंदीची मागणी स्थानिक रहिवाशी आणि आ. सुरेश लाड यांनी केली होती. याच दरम्यान सोलनपाडा धरणात रविवार, १७ जुलै रोजी तिघा पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाने या धरणासह पाली-भूतिवली, पळसदरी, डोंगरपाडा, साळोख, अवसरे, पाषाणे, खांडपे, कशेळे या धबधब्यांवर पुढील ३ महिने ङ्गौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ लावून जमावबंदी आदेश लागू केला आहे. धरणे संरक्षित क्षेत्र असतात. तिथे एकवेळ बंदी समजू शकते आणि या सोलपाडा धरणाच्या मुख्य जलाशयात जाण्यास आधीपासूनच परवानगी नाही, पण धबधब्यांवर जाण्यास १४४ कलम लावणे म्हणजे अतिरेक आहे. या धरण आणि धबधब्यांवर पाचपेक्षा जास्त पर्यटकांना एकत्र जाता येणार नाही. याचा अर्थ पर्यटक म्हणजे प्रशासनाला दंगेखोर वाटले की काय? कलम १४४ प्राणघातक हत्त्यारासह बेकायदेशीर जमावात सामील होणे, याकरीता वापरतात. तेथे पर्यटकांची झालेली गर्दी हा बेकायदेशीर जमाव आहे, असा जर प्रशासन अर्थ काढत असेल तर ते भयानक आहे. उद्या सर्वांच्याच संचार स्वातंत्र्यावर प्रत्येक ठिकाणी अशी बंधने घातली गेली तर वावरणे कठीण होईल. मुळात पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांवर कलम १४४ लावणे त्यांच्यावर अन्यायच नाही, तर यात रायगडची बदनामी सुद्धा आहे. सारेच पर्यटक हुल्लडबाज, मद्यपी नसतात. बरेच पर्यटक सहकुटुंब, सहपरिवार आलेले असतात. त्यांनाही या हुल्लडबाजीचा, मद्यपींचा त्रास होतो. पाचपेक्षा अधिक पर्यटकांना तेथे एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे. या बंदीमुळे प्रशासनाचे डोके ठिकाणावर आहे का असा प्रश्‍न उपस्थित होतो. छोट्या-मोठ्या वाहनांतून ग्रुपने पर्यटक येत असतात. पाचचा नियम लावून त्या ग्रुप्सना विस्कळीत करुन कोणती शिस्त जोपासली जाणार आहे? मुळात बेशिस्त पर्यटक हाताच्या बोटावर मोजता येणारे असतात. दारु पिऊन हुल्लडबाजी करणारे लपून राहू शकत नाहीत, त्यांच्यावर कायद्याच्या चौकटीत राहून कारवाई करता येऊ शकते. पण त्याऐवजी सरसकट पर्यटकांवर १४४ कलमाचे शस्त्र परजून प्रशासनाने त्यांची मुस्कटदाबी चालवली आहे. या मुस्कटदाबीविरुद्ध एखादा पर्यटक न्यायालयात गेला तर प्रशासनाच्या थोबाडात बसू शकते.
      पर्यटकांबाबत स्थानिकांचे गंभीर आक्षेप आहेत आणि ते चुकीचेही नाहीत. या ठिकाणी येणारे पर्यटक ङ्गार मोठ्या प्रमाणावर मद्य प्राशन करून धिंगाणा घालतात, मद्यधुंद पर्यटक आपल्या रिकाम्या दारुच्या बाटल्या आजुबाजूच्या शेतात ङ्गेकून देतात, दर आठवड्याला हजारो रिकाम्या बाटल्या या परिसरात ङ्गोडून ङ्गेकल्या जातात. त्यामुळे माळरानावर गुराख्यांना म्हशी चारणे देखील अवघड झाले आहे. शेतांमधे सर्वत्र पसरलेल्या या बाटल्यांमुळे शेतात कामे करणारे शेतकरी जखमी होत आहेत. शनिवार, रविवार या दोन दिवसात आजारी माणसांना प्रचंड वाहतुक गर्दीतून रुग्णालयात नेता येत नाही.  शाळा-कॉलेजमधील अनेक अल्पवयीन मुले, मुली आणि पर्यटक अतिशय तोकड्या कपड्यात सभ्यपणाच्या सर्व मर्यादा ओलांडून धरणाच्या पाण्यात किंवा आजुबाजूच्या झुडपात नको ते चाळे करीत असतात. या विभागातील लहान मुले आणि मुलींवर पर्यटकांमुळे दुष्परिणाम होऊ नयेत म्हणून सदर पर्यटकांना हटकले तर ते आपल्यालाच धमक्या देतात, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. ग्रामस्थांचे दुखणे ग्रामस्थांनाच चांगल्याप्रकारे ठाऊक असणार, पण त्यांच्या समस्येवर पर्यटकांना बंदी हे उत्तर असू शकत नाही. 
      मुळात आपल्या येथे प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधींना पर्यटन हा विषय म्हणजे नक्की काय हे माहीत नाही. लोकप्रतिनिधी एकीकडे पर्यटनवाढीबाबतच्या गमजा मारत असतात, पण याबाबत ठोस पावले उचलण्यास मात्र त्यांची तयारी नाही. तसे नसते तर पर्यटन स्थळांचा विकास आणि चांगले रस्ते यांचे जाळे जिल्ह्यात विणले गेले असते. पर्यटनस्थळांची सुरक्षा, पर्यटकांची सुरक्षा, त्यांचे प्रबोधन, दारुवरील निर्बंध, वाहन तपासणी, वाहतुक नियंत्रण याच्याबाबत जिल्हा प्रशासन दक्ष असते तर सोलनपाड्यासारखे प्रश्‍न उपस्थितच झाले नसते. तसेही सरकार धबधबे, धरणे यांना पर्यटन स्थळे मानत नाही, म्हणून जिल्हा प्रशासनला येथे बंदी घालताना काही वाटत नाही. या जिल्ह्यातील ही पहिलीच बंदी नाही. खारघर इथल्या पांडवकडा धबधब्यावर आणि पनवेल तालुक्यातील गाढेश्वर धरणावर जाण्यासही बंदी आहे. काही महिन्यापूर्वी मुरुड किनारी १४ पर्यटक विद्यार्थ्यांचा झालेला मृत्यू झाल्यानंतर समुद्र किनारे, नदीनाले, डोंगरी किल्ले येथील शालेय सहलीस शिक्षण विभागाने बंदी आणण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न मोडीत काढला असला तरी पर्यटनावरची टांगती तलवार काही दूर झालेली नाही.
    पर्यटन आले की पर्यटनसंबंधी व्यवसायही आले. त्यामुळे जिल्ह्यात पर्यटनस्थळांवर बेरोजगारांना कायमस्वरुपी रोजगारही उपलब्ध झाला आहे. पर्यटनपुरक व्यवसायांनी स्थानिकांना बरकत आली आहे, हे विसरुन चालणार नाही. त्यामुळे स्थानिकांनी पर्यटकांच्या बेजबाबदारपणाबाबत अतिरेकी भूमिका घेऊन जमणार नाही. जिल्ह्यातील कुठल्याही पर्यटनस्थळी जा, तेथे दारुच्या बाटल्यांचा, काचांचा खच पडलेला दिसून येईल, याचा त्रास स्थानिकांना जसा होतो तसाच पर्यटकांनाही होतो. धुडगुस घालणार्‍या, मद्यपी पर्यटकांचा त्रास स्थानिकांना जसा होतो, तसाच पर्यटन हाच हेतू ठेवून आलेल्या पर्यटकांनाही होतो. काही पर्यटकांच्या अश्‍लील चाळ्यांचा त्रास स्थानिकांना जसा होतो तसाच बहुसंख्य पर्यटकांनाही होतो. त्यामुळे याबाबत एकांगी विचार करुन जमणार नाही. या समस्येवरचा उपाय बंदी नसून हुल्लडबाज, मद्यपी, अतिरेकी पर्यटकांवर अंकुश ठेवला गेला पाहिजे, हेच पर्यटक दुर्घटनांचे कारण ठरतात. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. पण याबाबत जिल्हा प्रशासन कमी पडते आहे. आम्ही कुठे कुठे पहाणार असे तुणतुणे जिल्हा प्रशासन वाजवू शकते, पण जिथे गर्दी जमते, ती ठिकाणे तर लपून राहू शकत नाहीत. त्या ठिकाणी बंदोबस्त केला जाऊ शकतो. पण काहीच करायचे नसल्यामुळे बंदी, जमावबंदी असे तकलादू उपाय केले जात आहेत. जबाबदारी टाळण्यासाठी सोलनपाडा येथील हुल्लडबाजी व दुर्घटना यामुळे प्रशासनाने जमावबंदी लादली आहे. दुर्घटना या सावध करण्याचे काम करत असतात. पुढे तसे घडू नये यासाठी उपाययोजना करता येतात. पण स्थानिक स्वराज्य संस्था, महसूल विभाग, पर्यटन विभाग, पोलीस यंत्रणा यांच्यातील समन्वयाअभावी येथे उफराटे उपचार केले जात आहेत. खोकला झाल्यावर मूळव्याधीचे औषध कोणी पिणार का? पण तसा प्रकार प्रशासन करत आहे. रायगड जिल्ह्यातील पर्यटनाला नख लावल्याने प्रशासनातील अधिकार्‍यांचे काहीच जात नाही, त्यांचं ‘तीर्थ’ आणि त्यांचं ‘अर्थ’ सुरुच असतं, पण या सार्‍याचा अनर्थ या जिल्ह्याला परवडणारा नाही. इतकेच.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा