शुक्रवार, १७ एप्रिल, २०१५

पोयनाडच्या भैरवनाथ रसवंतीगृहाचे बंडू विठ्ठल इंगुळकर

-उमाजी म. केळुसकर ⬑ वलयांकित ⬉


    पोयनाड ही अलिबाग तालुक्यातीलच नाही, तर जिल्ह्यातील मोठी बाजारपेठ. येथे मिरची खरेदी करण्यासाठी अगदी मुंबईसह जिल्हाभरातून मोठ्याप्रमाणात ग्राहक येतात. इथल्या व्यापार्‍यांची मिरची जशी बोलते, तसा इथे भैरवनाथ रसवंतीगृहाचे बंडू विठ्ठल इंगुळकर यांचा ऊसाचा रस बोलतो. गेली ४२ वर्षे बंडू इंगुळकर ऊसाच्या रसाचा व्यवसाय करीत असले तरी प्रत्यक्षात पोयनाड पंचक्रोशीची ही त्यांनी व्रतस्थपणे केलेली सेवा आहे.  
      बंडू विठ्ठल इंगुळकर मूळचे पुणे जिल्ह्यातील आडवली येथील. वडील शेतकरी त्यामुळे शेती हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय. परंतु आपण स्वत:च्या पायावर उभे राहून काहीतरी वेगळे करावे या हेतूने त्यांनी वयाच्या विसाव्या वर्षी १९५८ साली पेणला येऊन मडक्यातील भेंडीच्या पानावरच्या कुल्फी विक्रीचा व्यवसाय सुरु केला. त्यावेळी आजच्यासारखी वाहनांची सोय नव्हती, पण बंडू इंगुळकर कष्टाला भिणारे नव्हते, त्यांनी अगदी पायाला चाकं लावून पेण, नागोठणे, पाली, पोयनाड इत्यादी गावे फिरुन आपला कुल्फी विक्रीचा व्यवसाय केला. परंतु त्याकाळी स्वस्ताई असल्यामुळे कुल्फी विक्रीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने त्यांच्या मनात ऊसाच्या रसाचा व्यवसाय करावा असा विचार आला आणि त्यासाठी ठिकाण निवडले पोयनाड. १३ वर्षांचा कुल्फी विक्रीचा व्यवसाय जड मनाने बंद करुन ते १९७३ साली पोयनाडला आले. रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रभाकर पाटील यांच्या पोयनाड येथील जागेत (तेथे नंतर पोयनाड ग्रामपंचायतीचे कार्यालयही होते.) प्रथम ऊसाच्या रसाचा भैरवनाथ रसवंतीगृह या नावाने व्यवसाय सुरु केला. हाताने फिरवायच्या  चरका, त्याला लावलेली घुंगरं आणि त्याचा येणारा छुन्नुकछुन्नक आवाज, त्याचबरोबर बंडू इंगुळकर यांची ‘ताई, माई, अक्का, दादा, भाऊ, काका ऊसाचा रस तरी पिऊन बघा’ ही त्यांनी ग्राहकांसाठी मारलेली हाळी ऊसाच्या रसाइतकीच तेव्हा गोड वाटायची. चरक्याचा दांडा फिरवताना त्यांनी म्हटलेली पुणेरी थाटाची गाणीही विसरता येणार नाही.
    काळानुरुप विजेवर चालणारा चरका आला, पण ऊसाच्या रसाचा आणि बंडू इंगुळकर यांच्या स्वभावातील मिठ्ठासपणा कायम राहिला. पोयनाड हे बाजारपेठेचे आणि सोमवारच्या आठवडा बाजाराचे गाव असल्यामुळे थकला-भागल्या ग्राहकांचे बंडू इंगुळकरांचे ऊसाच्या रसाचे दुकान तनमन शांत करण्याचे एक ठिकाणच होते. आजही पोयनाड नाक्यावरील त्यांच्या रसवंतीगृहात तेच काम चालू आहे.
     स्व. प्रभाकर पाटील, विजयकुमार मधुकर पाटील, आ. पंडितशेठ पाटील, कै. मदन रघुनाथ केळुसकर यांच्या आशीर्वादाने पोयनाड येथे आपण ऊसाच्या रसाचा व्यवसाय उत्तमरित्या करु शकलो, अशी कृतज्ञता बंडू इंगुळकर व्यक्त करतात.
      आज त्यांच्या या व्यवसायाला त्यांचे पुत्र अनंता बंडू इंगुळकर यांचे हात लाभले आहेत. अनंता आणि सौ. अनिता अनंता इंगुळकर यांना तीन मुली एक मुलगा आहे. बंडू इंगुळकर यांना त्यांच्या व्यवसायात अनुकुल आणि प्रतिकुल परिस्थितीतही त्यांच्या पत्नी सौ. ताराबाई बंडू इंगुळकर यांची चांगली साथ लाभली. आज बंडू इंगुळकर ७८ वर्षांचे असले तरीही ग्राहकांना मारलेली त्यांची हाळी अजूनही खणखणीतच आहे आणि त्याला ऊसासारखाच गोडवा आहे.

शुक्रवार, १० एप्रिल, २०१५

योगेश पवार नावाचा रंगभूमीवरील बहुरुपी

-उमाजी म. केळुसकर ⬑ नाट्य-चित्ररंग ⬉


      अलिबाग तालुक्यात अनेक गुणी कलाकार आहेत. या गुणी कलाकारांत किहीम-साईनगरच्या योगेश पवार यांचे नाव घ्यावे लागेल. योगेश पवार यांना रंगभूमीवरील बहुरुपीच म्हटले पाहिजे, इतके त्यांच्या भूमिकांत वैविध्य आहे. या वैविध्यानेच त्यांच्यातील कलाकाराला सातत्याने एक आव्हान मिळत आले आहे आणि हे आव्हान त्यांनी सतत लिलया पेलले आहे.  त्यामुळेच योगेश पवार रंगभूमीवरील खणखणीत नाणे आहे. 
       योगेश भिकाजी पवार यांची नाट्यआवड ही शालेय जीवनातली. चोंढी-किहीमच्या स.म. वडके विद्यालयाचे ते विद्यार्थी. खोडकर असले असले तरी ते शिक्षकांचे लाडके होते. आज मात्र त्यावेळचा खोडकर मुलगा अवखळ कलाकार म्हणून संपूर्ण नाट्यरसिकांचा लाडका बनला आहे. २००२ साल हे योगेश पवार यांच्या जीवनाला कलाटणी देणारे ठरले. याच वर्षी योगेश पवार हे विजय बारसे या परिसाच्या सहवासात आले आणि त्यांचे सोने झाले.  त्यावर्षी विजय बारसे यांच्या प्रयास सांस्कृतिक मंडळाने हिंदी राज्य नाट्यस्पर्धेसाठी सादर केलेल्या ‘ढलती छॉव’ या नाटकातून ‘रामू’ या नोकराची भूमिका करुन रंगभूमीवर खर्‍या अर्थाने वाटचाल सुरु केली. २००४ साली प्रयासच्याच ‘होऊन जाऊ दे एकदाच’ या राज्यनाट्य स्पर्धेसाठी केलेल्या नाटकात त्यांनी भूमिका केली.  त्याचे विविध ठिकाणी प्रयोगही झाले. त्याच वर्षी प्रयासच्याच ‘आन महाराष्ट्राची’ या लोकनाट्यात भूमिका केली. प्रयासच्या ‘अंध कोलाहल’साठी त्यांनी प्रकाश योजनाही केली. २००५ साली हजारीबाग येथील पर्यटन महोत्सवात प्रयासने सादर केलेल्या ‘एक खोज दमकते सुरज की और’ या हिंदी पथनाट्यातही योगेश पवार यांच्या भूमिकेचे  कौतुक झाले.
      २००३ साली किशोर म्हात्रे यांच्या रंगसेवा नाट्यसंस्थेने राज्यनाट्य स्पर्धेत सादर केलेल्या ‘रंग माझा तुला’ या नाटकात छोटी भूमिका केली. या छोट्या भूमिकांतून त्यांनी कधी मोठ्या भूमिका करणे सुरु केली हे कळलेच नाही आणि कळले तेव्हा योगेश पवार नावाचं रंगभूमीवरील नाणं खणखणीतपणे वाजायला लागलं होतं. २००४ या वर्षी प्रकल्प वाणी यांच्या प्रवीणकुमार मित्रमंडळ फोफेरी यांच्या ‘अरुणोदय झाला’ या लोकनाट्यात योगेश पवार यांनी ‘महाराज’  ही प्रमुख भूमिका केली. हे त्यांचे पहिले लोकनाट्य. २००५ साली त्याच संस्थेच्या ‘द्रोपदी वस्त्रहरण’ या लोकनाट्यात त्यांनी ‘टेंशन’ आणि ‘रावण’ या भूमिका केल्या.
      नंतर २००६ साली प्रकल्प वाणी यांनी कलारंग सामाजिक, सास्कृतिक संस्थेची स्थापना केल्यावर योगेश पवार यांना आपल्या कलेचे रंग दाखवायला जणू काही मोकळे आकाश भेटले. त्याच वर्षीच्या ‘च्या मायला एकदम टाप’ या कलारंगने सादर केलेल्या नाटकात हवालदार आणि यमाची त्यांनी धमाल भूमिका केली. २००८ साली कलारंगने ‘गजा आला रे’ हे नाटक राज्यनाट्य स्पर्धेसाठी नेले आणि त्याचे मोठ्याप्रमाणात प्रयोगही केले. त्यात मावळा आणि इन्स्पेक्टर या दोन भूमिका करुन रसिकांचे कौतुक मिळवले.
     २००९ साली योगेश पवार यांनी भूमिका कलेलेल्या कलारंगच्या ‘समझ जाव’ या एकांकिकेला मुंबईतील अमृतकुंभ एकांकिका स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळाला आणि त्याच सालच्या बीड येथील अखिल भारतीय नाट्यसंमेलनासाठीही त्याची निवड झाली.
      २०१० साली ‘फूल २ धमाल’ या कलारंगच्या नृत्य-नाट्य प्रयोगात अभिनेते गणेश रेवडेकर आणि विकास सामुद्रे यांच्या सोबत विनोदी स्किट्सही केले. याचीही वाहव्वा झाली. २०११ साली कलारंगच्या ‘बिन भाड्याची खोली’ या नाटकात योगेश पवार यांनी घर मालकाची भूमिका केली. या नाटकाचे राज्य नाट्य स्पर्धा आणि कल्याणच्या आचार्य अत्रे नाट्यगृह येथे व्यावसायिक प्रयोगही झाले. त्यातील त्यांच्या भूमिकेचे आणि नाटकाचे खुप कौतुक झाले.
       २०१२ सालच्या कलारंगने सादर केलेल्या ‘सदा आनंदी युगे युगे’ या नाटकात त्यांनी सरपंच ही भूमिका केली. २०१३ साली कलारंगच्या ‘कट्टी बट्टी’ या नाटकात बाबाची भूमिका केली. २०१४ साली कलारंगच्या ‘कबड्डी कबड्डी’ या नाटकाचा प्रयोग पंढरपूर येथील अखिल भारतीय नाट्य संमेलनात झाला. या नाटकातही योगेश पवार यांची महत्वाची भूमिका होती.
      संदेश गायकवाड यांच्या सम्यक सांस्कृतिक संस्थेच्या माध्यमातूनही योगेश पवार यांना आपले नाट्य गुण दाखवायला मिळाले. सम्यकच्या २००७ च्या ‘नो टेंशन’ या लोकनाट्यात त्यांनी यमाची भूमिका केली. याच संस्थेच्या २००८ सालच्या ‘अधूनमधून अफलातून’ या लोकनाट्यात त्यांनी महाराजांची भूमिका केली. २०१४ ला सम्यकच्या ‘लगनडाव’ या नाटकात वशा ही भूमिका केली.
       योगेश पवार यांनी खेळ, चोराच्या उलट्या बोंबा, चल रे भोपळ्या टुनुक टुनुक इत्यादी एकांकिकांत  भूमिका केल्या आणि त्या एकांकिका स्पर्धांतही गाजल्या. तसेच वेगवेगळ्या विषयांवर प्रयास आणि कलारंग मार्फत सादर केलेल्या ५०० हून अधिक जनजागृतीपर पथनाट्यात त्यांनी भूमिका केल्या आहेत. प्रयासच्या ‘नवसाला पावणारा अलिबागचा सिद्धिविनायक’ या माहितीपटात त्यांनी भूमिका केली आहे. तसेच निषाद निर्मित ‘धुमार’ या लघुचित्रपटातही त्यांची भूमिका आहे. अक्षय केबल निर्मित ‘बोला मुग्धा जिंदाबाद’ या सुप्रसिद्ध व्हिडीअर गीतात कलाकार म्हणूनही त्यांनी काम केले आहे. शर्मिला सानकर दिग्दर्शित ‘धोबी की दुल्हन बडी प्यारी है’ या हिंदी चित्रपटात त्यांनी भूमिका केली आहे. तसेच ‘गुलमोहर’ या चित्रपटातही त्यांची भूमिका आहे. स्वरमधुर म्युशिकच्या ‘कावळा काव काव करतय’ या ऑडिओ-व्हिडिओ अल्बममध्ये त्यांच्या नृत्याची धमाल आहे. रोहित पाटील यांच्या ऑर्केस्ट्रात निवदन व विनोदी स्किटचे ते सादरी करण करतात.
       त्यांना कुलाबा जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. तसेच ज्या शाळेत ते शिकले त्याच शाळेत त्यांना सांस्कृतिक कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून त्यांना सन्मानाने बोलावले जाते. घरचा पाठिंबाही त्यांना नेहमी बळ देत आला आहे. पत्नी सौ. पायल आणि मुलगा शौर्य तर त्यांचा प्रेरणास्त्रोत आहे.
        स्व. विजय बारसे, प्रकल्प वाणी, संदेश गायकवाड, सचिन शिंदे, किरण साष्टे, मनीष अनसुरकर, विक्रांत वार्डे, रणजीत घरत, सागर नार्वेकर, किशोर म्हात्रे आदि कलाकार, दिग्दर्शकांचे मार्गदर्शन आपल्याला लाभले आणि या सगळ्यांसोबत आपल्याला काम करायला मिळाले यांचा नम्रपणे उल्लेख योगेश पवार करतात. योगेश पवार रंगभूमीवरील बहुरुपी असले तरी नम्रतेचे खरे रुप त्यांच्याकडे कायम आहे.
योगेश पवार यांचा मो. ९८२३४७११००

शुक्रवार, ३ एप्रिल, २०१५

अवधूत संप्रदायाचा झेंडा फडकवत ठेवणारे दिगंबर राणे

-उमाजी म. केळुसकर ⬑ वलयांकित ⬉



       पेझारी हे गाव दोन मोठ्या पंत-संतांसाठी प्रसिद्ध आहे. एक राजकारणातील पंत तर दुसरे अध्यात्मातील संत. होय, शेकापचा लाल बावटा जिल्ह्यात फडकत ठेवणारे प्रभाकर नारायण पाटील आणि अवधूत संप्रदायाचा प्रेमध्वज फडकवणारे गुरुवर्य सुभानराव तथा अण्णा राणे यांच्या बाबतचेच हे वर्णन आहे. पेझारी या गावात गुरुवर्य सुभानराव तथा अण्णा राणे यांनी साबाजीदादा शेडगे यांच्या आशीर्वादाने १९५८ मध्ये  श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांच्या अवधूत संप्रदायाचे रोपटे लावले. आज त्यांनी लावलेल्या रोपट्याचा वटवृक्ष झाला आहे आणि त्यांचे पुत्र दिगंबर राणे अवधूत संप्रदायाचा झेंडा खांद्यावर घेऊन अध्यात्मातून समाजकारण करत आहेत.
       गुरुवर्य सुभानराव तथा अण्णा राणे यांचा पुण्यतिथी उत्सव बुधवार, ८ एप्रिल २०१५ रोजी साजरा होत आहे. त्यानिमित्त त्यांचे पुत्र दिगंबर राणे यांच्या कार्याचा एक आढावा घ्यावासा वाटतो. तीन बहिणींनंतर दिगंबर राणे राणे यांचा जन्म १९ फेब्रुवारी १९५९ ला झाला. त्याचे औचित्य साधून त्याच वर्षी गुरुवर्य सुभानराव तथा अण्णा राणे यांनी श्रीपंत भक्त मंडळ, पेझारीची स्थापना केली तर १९७४ ला श्रीदत्त मंदिराची बांधणी केली. त्यांनी १९८२ पर्यंत संप्रदाय चालवला, चांगला वाढवला.
      चैत्र संकष्टी, ११ एप्रिल १९८२ रोजी त्यांनी देह ठेवला. अकरा महिन्यांनी त्यांच्या पत्नी सुनंदाताई राणे यांनीही देह ठेवला. त्यानंतर अवधूत संप्रदायाची धुरा त्यांचे पुत्र दिगंबर राणे यांच्याकडे आली.
गुरुवर्य सुभानराव तथा अण्णा राणे यांचे पुत्र दिगंबर राणे वडिलांसारखेच प्रेमळ, निगर्वी, सर्वांशी मिळून मिसळून वागणारे आहेच. जन्मापासूनच अवधूत कार्याचे बाळकडू मिळालेल्या दिगंबर राणे यांनी आपल्या सहकारी गुरुबंधूंना घेऊन अनेक उपक्रम सुरु केले. स्वच्छता शिबीर, रक्तदान शिबीर. आरोग्य शिबीर, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, गायन स्पर्धा तसेच विविध क्षेत्रांमध्ये नैपुण्य मिळवणार्‍यांचा सत्कार, हुशार  व होतकरु विद्यार्थ्यांचा सत्कार, दहावीच्या विद्यार्थांसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन शिबीर असे अनेक उपक्रम श्रीपंत भक्त मंडळातर्फे वर्षभर राबविले जातात.
       गुरुवर्य सुभानराव तथा अण्णा राणे यांच्या पुण्यतिथीला श्रींच्या मूर्तीस अभिषेक, भजन इत्यादी कार्यक्रमासह गुणवंत विद्यार्थी व खेळाडू, विविध क्षेत्रातील गुणवंतांचा कौतुक सोहळ्या बरोबरच या दिवशी सामाजिक सेवा करणार्‍या मंडळाला किंवा व्यक्तीला गुरुवर्य सुभानराव राणे पुरस्कार दिला जातो.
गुरुवर्य साबाजीदादा शेडगे पुण्यतिथी उत्सवप्रसंगी मान्यवरांचे परिसंवाद, विद्यार्थांना शालेय वस्तूंचे वाटप इत्यादी कार्यक्रम होतात. श्रावण वद्य अष्टमीला श्रीपंत जन्मसोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सुनंदाताई राणे पुण्यतिथीला इतर धार्मिक कार्याबरोबरच महिला मंडळाच्या विविध स्पर्धा घेतल्या जावून श्रीपंत वाङ्मयावरील प्रश्‍नमंजुषा हा कार्यक्रम होतो. श्रीदत्त जयंतीचा कार्यक्रम तीन दिवस साजरा होतो. हे सर्व कार्यक्रम दिगंबर राणे यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजनबद्धरित्या शिस्तबद्धपणे पार पडतात. या त्यांच्या अवधूत कार्यात त्यांच्या पत्नी सौ. दिप्ती राणे यांची खंबीर साथ आहे. त्याचा हा अध्यात्माचा वारसा त्यांचा पुत्र व विवाहित कन्या यांनीही प्रगल्भतेने चालवला आहे.