सोमवार, १ जुलै, २०१३

रायगडातील घुसखोरी

-उमाजी म. केळुसकर ⬑ दादागिरी ⬉


       रायगड जिल्ह्याला बांग्लादेशी, नेपाळी व पाकिस्तानी, घुसखोरांचा पाश पडला आहे, परंतु तो प्रकर्षाने कोणाला जाणवत नाही. फक्त अशा घुसखोरांवर पोलिसांनी कारवाई केल्यावर लक्षात येते की, ‘अरेच्चा! हे तर घुसखोर आहेत.’ दुर्दैवाची गोष्ट म्हणजे सामान्य लोकांना या घुसखोरीचे गांभीर्य नाही आणि लोकप्रतिनिधींनाही याचे गांभीर्य नाही. त्यामुळे रायगड जिल्ह्यात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत आणि या प्रश्नांचा संबंध गुन्हेगारी, घातपातांशीही आहे. 
      पोलिसांची अधूनमधून कारवाई सुरुच असते. संशयीत बांग्लादेशींना ताब्यात घेतले जाते. यावेळीही माणगाव, विळे, भागाड, औद्योगिक वसाहतीत घुसखोेर बांग्लादेशी असल्याची माहिती बांग्लादेशी घुसखोर शोध पथकाला मिळाल्यावरुन माणगाव पोलिसांनी तेथील सिंटेक्स इंजिनिअरिंग कंपनीवर छापा टाकला व या छाप्यात इतर संशयीत बांग्लादेशींना पकडले. सर्व संशयीत बांग्लादेशींना चेन्नई येथील ठेकेदाराने सिंटेक्स इंजिनिअरिंग कंपनीत कामाला आणले होते. तो ठेकेदार आता फरारी झाला आहे. या घटनेने बांग्लादेशी घुसखोरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तसेच रायगडसारख्या जिल्ह्यापर्यंत या बांग्लादेशींना कसे आणले जाते, याचेही या घटनेतून उत्तर मिळते. सर्वच घुसखोर बांग्लादेशी पोटापाण्यासाठी आलेले नसतात, तर त्यांच्यात अतिरेकी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीची मंडळीही असतात. यांना स्थानिक मंडळींचे सहकार्य मिळत गेल्यामुळे घातपातासारख्या गोष्टी ते सहजपणे पार पाडतात. रायगड जिल्ह्यात विविध कंपन्या आहेत. त्यांना कमी मोबदल्यात मनुष्यशक्ती आवश्यक असते, त्यांना हे घुसखोर सहज उपलब्ध होतात, तसेच जिल्ह्यात बांधकामाचा व्यवसाय भरभराटीस आला आहे, या क्षेत्रात मजूर म्हणून परप्रांतियांचा भरणा आहे अणि ते आपल्या कामात कुशल आहेत आणि त्यांच्याबद्दल फारसे आक्षेप घेता येणार नाहीत, पण या मजुरांमध्ये कोणी बांग्लादेशी, नेपाळी, पाकिस्तानी घुसखोर नाही, अशी कोणी हमी देऊ शकत नाही. त्यामुळे बांधकाम क्षेत्रातील मजुंराकडे गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. 
     हे घुसखोर मुळात देशाची सीमा ओलांडून येथे येतात तरी कसे हा मोठा प्रश्न आहे. देशाची सीमा ओलांडणे ही सोपी बाब आहे का? असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण होतो. भारतात बेकायदेशीर घुसखोरी, करुन येथेच कायमचे स्थानिक झालेल्या बांग्लादेशी नागरिकांची नेमकी मोजदाद कधीही केली गेलेली नाही. परंतु ताज्या अंदाजानुसार ही संख्या ३.५ ते ४ कोटींच्या घरात आहे. आपली जी सीमा बांग्लादेशला लागून आहे त्या ठिकाणांहून घुसखोरी करणं सोपं पडतं. त्या ठिकाणी सुरक्षा यंत्रणा फारशी कडक नसल्याने घुसखोरांचं फावतं. बांग्लादेशमधून केवळ दहशतवादीच नाहीत तर सामान्य माणसंही सहज भारतात येतात. बांग्लादेशच्या आजूबाजूला असलेल्या राज्यांवर केंद्राची फारशी पकड नाही हे चित्र तर वारंवार स्पष्ट झालेले आहे. तिथे अराजकाची स्थिती आहे. दारिद्य्रही मोठ्या प्रमाणात आहे. या सगळ्यांचा फायदा घुसखोर घेतात. म्हणूनच आज भारतात ३.५ ते ४ कोटी बांग्लादेशी घुसखोर आपलं बस्तान बसवून आहेत. त्यांच्याकडे पॅनकार्ड, रेशनकार्ड, व्होटर्सकार्ड ही अधिकृत कागदपत्रे सहज उपलब्ध असतात. आज काश्मीरमध्येही घुसखोरी होते, पण बांग्लादेश सीमेच्या तुलनेत या सीमेवरुन होणारी घुसखोरी खूपच नियंत्रणात आलेली आहे. मग बांग्लादेशी घुसखोरांना भारतात येण्याची मिळालेली ही संधी कोणामुळे आहे, असा प्रश्न नक्कीच निर्माण होतो. यामध्ये स्थानिक लोक, सरकार, राजकारणी, पोलिस, बीएसएफ अशा विविध स्तरांवर घुसखोरांना मदत होते, हे सिद्ध न करता येणारं तरीही उघड वास्तव आहे. 
     गेली २५ वर्षे सीमेवर बीएसएफ आहे तरी घुसखोरीवर नियंत्रण कसं आलेलं नाही, हा सामान्यांना पडणारा प्रश्न आहे. अशा पद्धतीने मिळणार्‍या पैशांच्या मोबदल्यात मग देशभक्तीची भावना सहज बासनात गुंडाळून ठेवता येते का, याचं उत्तर मात्र मिळत नाही. रात्रीच्या वेळी या घुसखोरांना सीमापार यायला मदत केली की, घुसखोराीला मदत करणार्‍यांचं काम संपतं, त्यांचे अनेक एजण्ट्स इथे बसलेले असतात, ते त्यांची पुढची सोय बघतात आणि त्यांचं भारतातलं आयुष्य सुरु होतं. माणगाव येथील सिंटेक्स इंजिनिअरींग कंपनीत संशयीत बांग्लादेशींना ज्या चेन्नई येथील ठेकेदारांनी कामास लावले, त्या ठेकेदाराशी अशा एजंटचे संधान असणार हे तर उघड आहे. असे इजंट आणि असे ठेकेदार या बांग्लादेशींचा भारतातील विविध राज्यांत, विविध जिल्ह्यांत प्रसार करीत आहेत. कॉंग्रेस आणि डाव्या पक्षांनी पतपेटीचे राजकारण मोठ्या प्रमाणात केल्यामुळेही देशात बांग्लादेशी घुसखोरीचा प्रश्न उग्र बनला आहे, हेही वास्तव आहे. रायगड जिल्ह्यात असे होऊ नये याची काळजी घेणे आवश्यक आहे. या घुसखोरांकडे पॅनकार्ड, रेशनकार्ड, मतदारकार्ड आढळल्यास हे उपल्बध करुन देणार्‍या प्रशासनातील देशद्रोह्यांवरही कठोर कारवाई होणे गरजेेचे आहे. जिल्ह्यात बांग्लादेशी घुसखोर शोध पथकाचे जे काम सुरु आहे, ते कौतुकास्पद आहेच, पण या घुसखोरांना ज्यांनी आश्रय दिला आहे, त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे, तरच या मोहिमेला अर्थ असणार आहे. जसे बांग्लादेशी घुसखोर आहेत, तसेच पाकिस्तानी घुसखोर जिल्ह्यात आहेत, त्यांचाही शोध घेऊन त्यांना जेरबंद करण्याची गरज आहे. बांग्लादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांना जेरबंद केल्यास भविष्यात जिल्ह्यात होणारे भीषण अनर्थ टळणार आहेत, जिल्हा पोलिसांनी व प्रशासनाने याची दखल घ्यावी, इतकेच.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा