गुरुवार, १२ एप्रिल, २०१२

पिढ्यांमध्ये सेतू असावा संवादाचा

-उमाजी म. केळुसकर ⬑ खारावारा ⬉


    आज जागतिक उदारीकरणाच्या काळात ज्येष्ठांबाबत अलगतेची भावना वाढत आहे आणि तरूण पिढीकडून त्यांच्यावर अन्याय केला जात आहे. आपल्या देशात प्राचीन काळापासूनच ज्येष्ठांचा आदर करण्याची गौरवास्पद परंपरा असल्यामुळे ही परिस्थिती कुटुंब, समाज आणि देशासाठी शुभसंकेत नाहीत.
      आपल्या देशात ज्येष्ठांची संख्या जवळजवळ नऊ कोटी आहे. ८४ टक्के ज्येष्ठांना एकच अपत्य आहे, परंतु ३२ टक्केच आपल्या अपत्याबरोबर राहत आहेत. ही अतिशय निराशाजनक परिस्थिती आहे. गेले ३० वर्षे ज्येष्ठांसाठी काम करणार्या हेल्प एज नावाच्या एका संघटनेने नुकतंच एक सर्वेक्षण केलं होतं. सर्वेक्षणानुसार ६९ टक्के सुना आणि ४० टक्के मुलं घरातील ज्येष्ठांशी असभ्य वर्तन करतात. ५२ टक्के ज्येष्ठ अशिक्षित आहेत, ६६ टक्के आर्थिक रूपाने इतरांवर अवलंबून आहेत. अहवालानुसार ८५ टक्के ज्येष्ठ वैद्यकीय खर्चासाठी इतरांवर अवलंबून आहेत. अहवालात म्हटले आहे की, ९८ टक्के ज्येष्ठ आपल्याबरोबर होणार्या गैरवर्तनाची अधिकाधिक तक्रार करीत नाहीत आणि बिचारे ज्येष्ठ गुपचूप आपल्यावरील अन्याय सहन करीत राहतात. आपल्या देशात ज्येष्ठांची अवस्था कशी आहे, हे समजण्यासाठी हा अहवाल पुरेसा आहे. 
    ज्येष्ठावर होणार्या या गैरवर्तनापाठीमागे अनेक कारणे असू शकतात. यात तरूण पिढीची स्वकेंद्रीत विचारसरणी, महिलांचा अनावश्यक हस्तक्षेप आणि सदोष शिक्षण, घरातील संस्काराचा अभाव इत्यादी कारणे प्रमुख मानता येतील. या कारणांमुळे देशातील संयुक्त कुटुंबे आधीच विखुरली आहेत. संयुक्त चुली विझल्या आहेत. घरांपुढील अंगण छोटं होत गेलं आहे. अशा परिस्थितीत ज्येष्ठ एकाकी पडू लागले आहेत. घरात असूनही ते घरात असल्यासारखे वाटत नाहीत. कित्येक घरांमध्ये तर त्यांना जुन्या सामानाप्रमाणे वेगळ्या खोलीत टाकले जाते, कारण तरूणांना म्हणजेच पती-पत्नीला त्यांची उपस्थिती देखील एक समस्याच वाटते. ज्या ज्येष्ठांनी आपल्या अपत्यांना बोट धरून चालायला शिकवलं, त्यांनी आपल्यापेक्षाही मोठं व्हावं, अशी स्वप्न पाहिली. पण आयुष्याच्या सायंकाळी आपल्या अपत्यांच्या आधाराची गरज भासली, तेव्हा त्यांनी पाठ दाखवली हे कसले दुर्दैव आहे? 
      महानगरे, शहरे यांबरोबरच गावांतही आता ज्येष्ठांची दशा खूपच दयनीय झाली आहे. जेथे एक पिता चार पुत्रांचे पालनपोषण करतो, तेथेच चार पूत्र एकत्रितपणे आपल्या आई-वडिलांची योग्य देखभाल करू शकत नाहीत. पुत्रांकडून त्यांची काळवेळेच्या हिशोबाने विभागणी केली जाते. या तरूण पिढीने ज्येष्ठांच्या उपजीविकेची अशी विचित्र व्यवस्था केली आहे, ही लज्जास्पद गोष्ट आहे. परंतु ज्येष्ठ नाईलाजाने सर्वकाही सहन करण्यास तयार असतात, मग त्यांना घराबाहेर का हाकललं जाईना, ते आपलं दु:ख सहजपणे व्यक्त करीत नाहीत. कधी कधी त्यांच्या डोळ्यांतून वाहणारे अश्रू त्यांचे दु:ख व्यक्त करतात. कणखर मनाचे ज्येष्ठ आपलं दु:ख हसण्याआड लपवतात.
       ज्येष्ठांना वृद्धाश्रमातही टाकले जाते किंवा त्यांना स्वत:हून ‘वृद्धाश्रमांचा मार्ग पत्करावा लागतो. ज्यांना तोही आधार नाही, त्याला रस्त्यावरच निर्वासितांसारखे जगावे लागते. टाकून दिलेल्या जेष्ठांना संबंधित कुटुंबांकडून पोटगी देण्यासाठीही नियम-कायदे बनवण्यात आले आहेत, परंतु जीवनाच्या सायंकाळी ज्येष्ठांना प्रेम, आपलेपणा आणि आधाराची सर्वाधिक गरज असते, ती गरज केवळ कुटुंबच पूर्ण करू शकते. म्हणूनच या सामाजिक समस्येवर उपाय सामाजिक पातळीवरच शोधावा लागेल. यासाठी तरूण पिढीला आपला दृष्टीकोन बदलावा लागेल. त्यांना सांगितलं जावं की, ज्येष्ठांकडे अनुभवांचा खजिना असतो. ते सुखाचा राजमार्ग असू शकतात. त्यांच्याकडे व्यावहारिक ज्ञानाबरोबरच प्रत्येक संकटाशी तोंड देण्याचा शहाणपणा असतो. त्यांच्या अनुभवांना फायदा घेतला तर तरूण पिढी आपलं जीवन अधिक समृद्ध बनवू शकेल. 
      तरूण पिढीने हे देखील लक्षात घेतले पाहिजे की, पैशाचं महत्त्व असलं तरी ते सर्वकाही नाही. म्हणूनच आपल्या तरूणांनी नाती तोडून केवळ पैशाच्या मागे धावू नये. जगण्यासाठी किती पैशांची गरज असते? याशिवाय शिक्षणालाही संस्कारित बनवण्याची गरज आहे, कारण त्याचा स्तर खालावत आहे. सामाजिक आणि नैतिक मूल्यांचा र्हास होत आहे. जर मुलांना नैतिकतेचे धडे दिलेच गेले नाही तर त्यांच्याकडे ज्येष्ठांचा आदर करण्याची आणि सदाचाराने वागण्याची अपेक्षा तरी कशी करता येईल?ज्येष्ठ आणि तरूण ही एका कुटुंबाची दोन चाकं असतात. ही दोन चाकं शाबूत असली, तर ते घर कोणत्याही संकटांना ताठ मानेने सामोरे जाऊ शकते. असे कुटुंब स्वत:ला आणि समाजालाही शक्ती पुरवत असते. त्यामुळे ज्येष्ठांमध्ये आणि तरूण पिढीमधील विसंवादी सूर दूर होऊन संवादास सुरूवात झाली, तर त्यांच्यापुरते तरी हे जग सुंदर होईल.

सोमवार, ९ एप्रिल, २०१२

नवे अनर्थ जन्माला येण्यापूर्वी...

-उमाजी म. केळुसकर ⬑ खारावारा ⬉


     काही विषय छोटे असतात, परंतु त्यातील गांभीर्य मोठं असतं. विचारवंत कदाचित या छोट्या विषयांकडे आकर्षित होणार नाहीत, परंतु समाजशास्त्रज्ञांना समाजातील छोट्यात छोट्या विषयांकडे गांभीर्याने पहावे लागते. म्हणूनच अशा विषयांचे विविध पैलू समाजासमोर येतात व चिंतनाला आणि चिंतेलाही सुरुवात होते. भारतातील बदलत्या काळातील मुलांच्या अवस्थेचा छोटा विषयही असाच चिंतनाचा आणि चिंतेचा आहे, त्यामुळे त्याकडे समाज आणि समाजधुरिणांनी गांभीर्याने पाहिले पाहिजे.
       तसे पहाता आजच्या युगातील मुलांच्या पालन-पोषणाबाबत त्यांच्या आई-वडिलांची मनस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न एसी निल्सन या संघटने केला आहे. तिचं आकलन असं आहे की, आपल्या देशात अधिकांश मध्यमवर्गीय पालक आपल्या मुलांना पुरेसा वेळ देऊ शकत नाहीत, यामुळे पालकांच्या मनात बोच असते, परंतु असे असले तरी मुलांच्या पालन पोषणावरही याचा वाईट परिणाम होतो. देशातील सर्वात मोठी महानगरे दिल्ली, मुंबई, कोलकाता, बंगळुरु, चेन्नई आणि हैदराबादमध्ये सरासरी १८ हजार रुपये प्रति महिना उत्पन्न असणार्‍या कुटुंबामध्ये करण्यात आलेल्या या सर्वेक्षणात ७० टक्के लोकांनी मान्य केले की, कामधंद्यात अधिक काळ गुंतल्यामुळे त्यांना आपल्या मुलांकडे पूर्णपणे लक्ष देता येणे शक्य होत नाही.
      २६ ते ४५ वर्षांच्या वयोगटातील लोकांमध्ये केलेल्या या सर्वेक्षणात महिला आणि पुरुषांची संख्या सारखीच ठेवण्यात आली होती, परंतु कामावर जाणार्‍या महिलांची टक्केवारी यात केवळ २० होती. म्हणजेच या वयोगटाच्या पाच महिलांमधील केवळ एकच महिला कामावर जाते. परंतु मुलांना वेळ न देता येण्याची समस्या कमाऊ पुरुष आणि कामकाजी महिलांपुरतीच मर्यादित नाही. विभक्त कुटुंबात राहणार्‍या गृहिणींच्या जबाबदार्‍यांच्या इतक्या वाढल्या आहेत की, त्यातील अधिकांश आपल्या मुलांना पुरेसा वेळ देऊ शकत नाहीत. या सर्वेक्षणातून असा निष्कर्ष काढणे अतिशय सोपे आहे की, आतापेक्षा तो जुना काळ चांगला होता, जेव्हा मुलांचे आजी-आजोबा, काका-काकी, आत्या यांच्या देखरेखीखाली पालनपोषण होत असे तेव्हा आई-वडिलांच्या मनात कोणतीही बोच असणे तर दूरच, मुलांची चिंताच करावी लागत नसे, परंतु हा निष्कर्ष इतिहासाला पाठीमागे ढकलण्याच्या विचारावर आधारीत आहे.
       एका अशा काळात जेव्हा महिला आपल्या उपजीविकेसाठी बाहेर पडल्या आहेत आणि आपली स्वतंत्र ओळख तयार करण्यास बाहेर जुटल्या आहेत, तेव्हा गरज संयुक्त कुटुंबाचे सोनेरी दिवस आठवण्याची नाही, तर विभक्त कुटुंबाच्या नव्या पायाला आत्मसात करण्याची आणि त्याला सुरळीत बनवण्याची आहे. कामावर जाणार्‍या महिलांसाठी आपल्या लहान मुलांना घरी सोडून कामात मन गुंतवणे अतिशय कठीण होते, परंतु समाजात त्यांच्याबद्दल जर थोडीशीही सहानुभूती असेल, तर त्याने जुन्या काळाच्या आठवणीत अश्रू ढाळण्याऐवजी कंपन्या-कामाच्या ठिकाणी अशी व्यवस्था केली पाहिजे की, जेथे महिला आपल्या मुलांबरोबरही नोकरी करु शकतील. कमीत कमी इतकं तर करता येऊ शकतं की, कामकाजी महिलांच्या मुलांच्या देखभालीच्या व्यवस्थेची एक वेगळी यंत्रणा विकसित केली जावी.
      ही यंत्रणा जर केली गेली तर पालकांचा सहवास न मिळाल्यामुळे मुलांचं जे नुकसान होत आहे, त्यावरही प्रतिबंध असू शकतो. पाळणाघरांची व्यवस्था कामाच्या ठिकाणी आणि घराच्या आसपासच असावी आणि ही व्यवस्था समाजानेच केली पाहिजे, कारण आपण सर्व कामासाठी सरकारच्या तोंडाकडे पहात बसणे योग्य नाही. अनेक महानगरात पाळणाघरे आहेत, परंतु ते पाश्‍चात्य देशांइतके लोकप्रिय बनू शकलेले नाहीत. याचं एक कारण म्हणजे आपल्या येथे या क्षेत्रात कुशल लोकांचा नितांत अभाव आहे, तर दुसरीकडे असेही आहे की आपण अजूनही सद्यकाळाचे वास्तव मान्य करु शकलेले नाहीत. हे खरे आहे की, संयुक्त कुटुंबाची भारतीय अवधारणा अतिशय बेजोड आहे, परंतु वास्तव हेही आहे की, संयुक्त कुटुंब विस्कळीत झाली आहेत आणि ही प्रक्रिया रोखता येण्याजोगी नाही. त्यामुळे मुलांच्या पालनपोषणाच्या व्यवस्थेचा एक नवा पाया रचणे आवश्यक आहे. समाज धुरिणांनी या बाबीकडे गांभीर्याने पाहिले पाहिजेच परंतु विचारवंतांनीही यामुळे नवे अनर्थ जन्माला येण्यापूर्वी या विषयांकडे गांभीर्याने पाहून एका नव्या समाजरचनेचा सुलभ पाया रचण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याला समाज आणि सरकारने सहकार्य केले तर ही समस्या थोडीफार आवाक्यात येऊ शकेल.