सोमवार, १९ सप्टेंबर, २०११

पोटाचा प्रश्‍न

-उमाजी म. केळुसकर ⬑ ठसा आणि ठोसा ⬉


     काय जमाना आहे हा? लोकांचं पोलिसांच्या पोटाकडे लक्ष असते, इतकेच नव्हे तर केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी देखील आपल्या पोलिसांच्या पोटाकडे गांभीर्याने पाहायला सुरुवात केली आहे. मुळात सुशीलकुमार शिंदे हे एकेकाळी स्वत: पोलिस उपनिरीक्षक होते. त्यांनी नुकतेच आपल्याला पोट वाढलेले पोलिस अजिबात पसंत नाहीत, असे सांगितले. पण सुशीलकुमार शिंदे यांनी राजकारण्यांच्या पोटाबद्दल काही नाराजी व्यक्त केली नाही. तसे सर्वांचेच राजकारण्यांच्या पोटाकडे दुर्लक्ष असते. ते कितीही फुगलेले असले तरी त्याबद्दल कोणाला काही वाटत नाही. उलट त्यांच्याबद्दल विश्वासच लोकांच्या मनात असतो. एखाद्या बुवा- महाराजांवर असावी तशी ही श्रद्धा चिवट असते, त्यामुळे या राजकारण्यांनी कितीही पक्षांतरे केली, तरी जनता त्यांना अंतर देत नाही. नेत्यापाठोपाठ मुकाट जाण्यात तिला धन्य वाटते. 
      हीच जनता नंतर गृहित धरली जाते आणि एकदा जनता गृहित धरली गेली की, तिच्या हाती आश्वासनांशिवाय काहीही उरत नाही. नेत्यांची पोटे फुगत जातात, नशिबाने ती फुटत नाहीत आणि फुटली तर त्यातून काय बाहेर पडेल हे सांगता येणार नाही. नेत्यांवर त्यांच्या समर्थक जनतेचा इतका विश्वास असतो, परंतु पोलिसांचे समर्थक नसल्यामुळे त्यांची फुगलेली पोटे नजरेस भरतात. या पोटांकडे अविश्वासाने पाहिले जाते. या पोटांत काय दडले आहे, याचा अंदाज घेतला जातो. लोकांनी पोलिसांना टार्गेट ठरविले असले, तरी विनोदी लेखकांचे टार्गेट तुंदीलतनू राजकारणीच राहिले आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे. त्यांनी वारंवार लिहिले आहे की, नेतागण किती सिमेंट खातात, किती चारा खातात; पण कधी ढेकरही देत नाहीत. याचा अर्थ, ते सतत अतृप्तच असतात. एक मात्र खरे आहे की, नेत्यांच्या पोटावरील या भाष्याला राजकारण्यांच्या आताच्या पिढीने खूपच गांभीर्याने घेतले आहे. आजकाल सर्वांनी जीम जॉईन केली आहे अथवा एखाद्या योगगुरुला शरण गेले आहेत.
      यात त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे, आपले पंतप्रधान आणि दुसरे भावी पंतप्रधान सपाट पोटवाले आहेत. याचा अर्थ, पोटाबाबत आता खूपच जागृती झाली आहे. त्यामुळे पुढे सगळेच राजकारणी, नेते सपाट पोटांचे दिसले तर नवल नाही. पण, प्रश्न असा आहे की, सपाट पोटे होऊन भ्रष्टाचार, घोटाळे थांबणार आहेत काय? हे पोटपुराण इतपतच मर्यादित नाही. पुरुषांचे पोट परमनंट ङ्गुगते. महिलांचे पोट अल्पकाळासाठी फुगू शकते. भारताच्या बहुसंख्य लोकसंख्येचे पोट आणि गाल दोन्ही पिचलेले आहेत. त्यांच्या पोटातील वेदनेचं कारण आहारातील गडबड नाही, तर भूक, कुपोषण आहे.
लोकसंख्येच्या एका लहानशा भागाला पोट वाढविण्याची सुविधा आहे. त्यांना खाण्यासाठी मेवा-मिठाई, चिकन- बिर्याणी, तूप-लोणी सहजपणे उपलब्ध आहे. या लठ्ठांमुळे योगगुरु, जिमगुरु, डाएटेशियन, सडपातळ करणारं तेल, औषध आणि चहा विकणार्यांची दुकाने धूमधडाक्यात चालतात. टीव्हीवर जाहिरातदार सांगतात की, तुमच्या पोटावर चरबीचे थराच्या थर चढले आहेत.
      वय वाढण्याबरोबरच चरबी जमा होणे साहजिकच आहे. चरबीचा हा अभेद्य दुर्ग भेदणे कठीण आहे. मग आपण जीममध्ये जाऊन घाम गाळा, नाहीतर वेगाने धावा किंवा कपालभाती करा, पोट सपाट होणार नाही. आमचं जादूई तेल किंवा करामती चहाच आपल्याला या लठ्ठपणापासून मुक्ती देऊ शकेल. पंतप्रधान मनमोहन सिंग आणि युवराज गांधी यांचं स्लिम राहण्याचं रहस्य आहे, तेच जाणोत, परंतु हे मात्र खरे आहे की, विवाहापूर्वी अधिकांश पुरुष काडी पेहेलवान असतात. पत्नीचं प्रेम आणि तिच्या हातचं अन्न त्याला ढेरपोट्या बनवतं. या जगात आईच्या प्रेमापेक्षा मोठं दुसरं काही नाही. विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आईचे प्रेम आणि तिच्या हातचं अन्न ज्याला ढेरपोट्या बनवू शकत नाही, त्याला पत्नीच्या हातचं अन्न कसं ढेरपोट्या बनवतं? वयाच्या तीस-बत्तीसाव्या वर्षी जन्म घेणारी ही तुंदीलतनू व्यक्तीला अगदी स्मशानापर्यंत साथ देते. मैत्री, संबंध जरी सुटले तरी हा लठ्ठपणा साथ सोडत नाही. जितका लठ्ठपणावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला जातो, तितका लठ्ठपणा वाढतोच, अशी लठ्ठपणाची ख्याती आहे. त्यामुळे लठ्ठ माणसाला लठ्ठपणासारखा सोबती नाही असे म्हटले तर लठ्ठ माणूस आणि लठ्ठपणा यांचा गौरव केल्यासारखेच आहे. ढेरपोटाबाबत अधिक तणावग्रस्त होण्याची आवश्यकता नाही. लठ्ठपणा असेल तर हार्ट ऍटॅक येईल, मधुमेह होईल. हे होईल ते होईल, असा तणाव मनात निर्माण करु नये.
       जितका तणाव बाळगला जाईल, तितकाच अधिक आहार केला जातो. अतिरिक्त आहार आणि ङ्गुगलेले पोट. ङ्गुगलेले पोट इतकी वाईट गोष्ट नाही. पोलिसवाले जेव्हा गुन्हेगारांबाबत पुरावे शोधत असतात, तेव्हा वाहिन्यांवर दाखवले जाणारे त्यांचे पोट किती सुंदर दिसते. त्यासमोर बिकीनीवालीचं सौंदर्यही ङ्गिकं पडतं. ढेरपोट्या माणूस जेव्हा हसतो, तेव्हा त्याचे हिंदकळणारे पोट पाहून उदास, निराश व्यक्तीही हसण्याची उबळ दाबू शकत नाही. त्याची नाराजी, निराशा छु-मंतर होते. त्यामुळे पोट नाही त्यांनी कुत्सिक हसायचं नाही आणि पोट आहे त्यांनी रुसायचं नाही. ज्यांनी त्यांनी आपापली पोटं सांभाळावी, तेच बरे.

शुक्रवार, २ सप्टेंबर, २०११

राखीची लगीनघाई

-उमाजी म. केळुसकर ⬑ ठसा आणि ठोसा ⬉

  
   राम... राम... योगगुरु रामदेवबाबांशी राखी सावंतला लग्न करायचेय! एखाद्या वृद्धाला खोकल्याची उबळ यावी तशी सावंताच्या राखीला लग्नाची उबळ येते. पण ठसका लागतो, पळ पळ करणाऱ्या बिचाऱ्या वर मंडळींना. या वर मंडळींत रामदेवबाबा स्वत:हून सामील झाले नाहीत आणि होणारही नाहीत. म्हणून राखीनेच त्यांच्यामागे वरमाला घेऊन धावायचं ठरवलं असावं. आपण म्हणाल, राखी रामदेवबाबांना राखी बांधो नाहीतर लग्न करो, त्यात आमचं काय जातेय? कोणाचंच काही जात नाही; पण एक पेच तर निर्माण झाला ना? राखीने रामदेवबाबांच्या ब्रह्मचर्याला खिंडार पाडायचं ठरवलंय म्हटल्यावर कॉंग्रेसनेही सुटकेचा श्वास टाकला आहे. 
     आपल्याला घाम फोडणार्या रामदेवबाबांना राखी सावंत लग्नाची बेडी घालून माणसाळवणार आहे, याचे काँग्रेसला अप्रूप वाटते आहे आणि समाधानही वाटत आहे. ती विचार करते आहे की, रामलीला मैदानावर रामदेवबाबांच्या उपोषणाचा फियास्को करण्यासाठी दिल्ली पोलिसांना कामाला लावण्यापेक्षा एकट्या राखी सावंतला तेथे पाठवलं असतं, तर कोणतीही जीवित आणि वित्तहानी न करता रामदेवबाबांवर लगाम घालता आला असता. त्यामुळे उपोषण पोलिसी बळाने उधळून लावण्याच्या नाचक्कीपासूनही आपण वाचलो असतो. काँग्रेस चुकीचा विचार करीत नाही, परंतु ती आधीच अविचार करुन बसल्याने चूक सुधारायला तिला वाव नाही. अशा परिस्थितीत राखी सावंतच्या निमित्ताने परस्पर काटा निघतोय म्हटल्याने कॉंग्रेस खुश आहे. ब्रह्मचारी बाबा गृहस्थाश्रमी बनला तर त्याला अनुल्लेखानेच मारता येईल, असा कॉंग्रेसचा तर्क असावा. काहीही असो, राखीच्या सैराट मेंदूत हा रामदेवबाबाशी लग्न करण्याचा विचार कसा आला, हे कळणे सोपे नाही, परंतु याप्रसंगाने पुन्हा एकदा इंद्रदेवाने विश्वामित्राची तपश्चर्या भंग करण्यास पाठविलेली अप्सरा-मेनकेची आठवण आली. काळा पैसा परत आणण्याच्या आणि भ्रष्टाचार संपवण्याच्या मोहिमेत गुंतलेल्या बाबांचं ध्यानभंग करण्यासाठी कोण जाणे कोणत्या आधुनिक इंद्राने राखीकडे हे काम सोपवलं असावं. पूर्वी इंद्र तर एकच होता आणि जगजाहीर होता, परंतु आजच्या अति आधुनिक युगात याचा छडा लावणे सोपं काम नाही. कारण आज आपण ज्याला इंद्र समजत असाल, तोही इंद्राचा डमी असणे शक्य आहे. असंही असू शकतं की, आधी टीव्हीमार्फत स्वत:चं एक स्वयंवर केलेली राखी आताही त्याच मूडमध्ये असावी आणि तिला वाटत असावे की, जो प्रसिद्ध, पण अविवाहित आहे, त्याच्याशी लग्न करुन स्वत:चे एक जग निर्माण करावे. यापूर्वी तिच्या रडारवर आजचे सर्वात हॉट तरुण काँग्रेसी पदयात्री होते. तिने सांगितलं की, आधी ती राहुल गांधी यांच्यावर आसक्त होती आणि त्यांच्याशी लग्न करण्याची स्वप्न पाहात होती. परंतु हे चांगलं झालं की, तिच्या वास्तव लवकरच लक्षात आलं की, राहुलच्या मम्मीबरोबर तिची डाळ शिजणार नाही. यानंतर रामदेवबाबांच्या योगाने राखीच्या जीवनावर असा परिणाम केला की, ती त्यांची दिवानी झाली. रामदेवबाबांचं तिला वेड लागलं. हे एकतर्फी प्रेम असलं तरी प्रेमच आहे ना! तिला स्वत:ला किती योग माहीत आहे, हे ती स्वत:च सांगू शकेल, परंतु तिचं म्हणणं आहे की, लग्नाची माला योगगुरुंच्या गळ्यात टाकते, मग पहा. भारतात सौंदर्यवती प्राचीन काळापासूनच योगी आणि संन्याशाकडे आकर्षित होत आल्या आहेत. राखीनेही रामदेवबाबा यांची निवड अशीच केलेली नाही, ती त्यांना सर्वात हॉट मानते. दुसरीकडे, रामदेवबाबाच जाणो, त्यांना या राखीच्या इच्छेबाबत काय वाटते? आपली इच्छा जाहीर करण्यापूर्वी याबाबत रामदेवबाबांचा काय विचार आहे हे राखीने समजून घेतलंच नाही. राखी नावाची कुणीतरी आयटम गर्ल आहे आणि ती तिची आपल्याबरोबर लग्न करण्याची इच्छा आहे, हे ऐकून रामदेवबाबांनी काही प्रतिक्रिया दिली नसली, तरी ते मनातून धास्तावलेच असतील. मिकाने तिचा मुका घेतला तर तिने आकांडतांडव केला; पण तिच जर आपल्यासमोर तोंडाचा चंबू करुन आली तर आपण काय करणार? बरं आहे, ती महाराष्ट्रात आहे. आपल्याकडे येईपर्यंत आपल्याला पलायन करता येईल. पलायन करण्याचा आपल्याला सरावही आहे, असे रामदेवबाबा मनातल्या मनात म्हणत असतील. तथापि, राखीलाही माहीत असावे की, रामदेवबाबा काही आपल्या गळाला लागणार नाहीत, त्यामुळे तिच्या यादीतलं आणखी एक नाव काही दिवसाने पुढे आलं तर त्यात नवल वाटणार नाही. राखीला अशी प्रसिद्धी मिळत आहे, त्यामुळे त्याचा फायदा ती उठवतच राहणार आहे. त्यामुळे तिच्या बोलण्याचं टेन्शन रामदेवबाबांनी घेऊ नये आणि वाचकांनीही घेऊ नये. राखीची वन साइडेड स्टोरी चाललेय ती चालू द्यावी, दुसरं काय?