शुक्रवार, २० मार्च, २०१५

विलास समेळ घडवताहेत छंदातून पर्यावरणाचा जागर

-उमाजी म. केळुसकर ⬑ वलयांकित ⬉


    अलिबागकरांना विलास समेळ माहीत आहेत ते चोंढीचे एक उद्योजक, कवी म्हणून. वृत्तपत्र विक्री, जनरल स्टोअर्स, मेडिकल स्टोअर्स, गिफ्टशॉप, अशा सर्व क्षेत्रात त्यांनी झोकून काम केले. मात्र चोंढीहून निवृत्तीचे जिणे जगण्यासाठी ते घणसोलीत गेले आणि त्यांना नवी ओळख मिळाली. संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या छंदातून निर्माण झालेल्या कलेने ते ओळखले जावू लागले आहेत.
      १३,१४,१५ मार्च असे तीन दिवस अलिबागेतील सार्वजनिक वाचनालय व जिल्हा ग्रंथालयाच्या पाठिमागील भागात महाराष्ट्र खादी व ग्रामोद्योग मंडळाने भरवलेल्या प्रदर्शन व विक्री महोत्सवात विलास समेळ यांच्या पर्यावरण पुरक पेपर बॅग्जचा स्टॉल सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. त्या पेपर बॅग्जवरील त्यांच्या हस्ताक्षरातील सुविचार, कविता वाचन संस्कृतीला उत्तेजन देणार्‍या होत्या, याबरोबरच वाढदिवस, विवाह, इतर विविध समारंभात देता येण्याजोगी त्यांनी बनविलेली ग्रिटीेग्ज, प्रेझेंट पॉकिटस्, तसेच पोस्टकार्डवरील लिखाण ह्रदयाला हात घालणारे असल्यामुळे या स्टॉलवर ग्राहकांची गर्दी होणे साहजिकच होते. तथापि विलास समेळ यांचा यामागे पैसा मिळवणे हा उद्देश नाही, आपले छंद जोपासणे हा त्यांचा उद्देश आहे.
     आपल्या वयाच्या साठीनंतर निवृत्तीचे जीवन छंदांमध्ये ‘आनंद द्या, आनंद घ्या’ या पद्धतीने जगत आपण वाचलेले मराठी सुविचार, लेखन  लोकांपर्यत पोहोचवावे या हेतूने  त्यांनी आपले पोस्टकार्डवरील विविध प्रकारचे लिखाण, हस्ताक्षर, हस्ताक्षरातील कविता, कॅलिग्राफी याचे पहिले प्रदर्शन वाशी येथील विष्णूदास भावे नाट्यगृहाच्या सभागृहात भरविले होते. त्यानंतर अलिबागेतील राममंदिरात भरविण्यात आले होते. या प्रदर्शनानंतर ९ ते १६ फेब्रुवारी २०१५ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या सिडको हॉल, नवी मुंबईतील कोकणसरस महोत्सवात त्यांच्या कलाकृती असलेल्या सुनीता आमले यांच्या नव निर्मिती बचत गट-चोंढीच्या प्रदर्शन व विक्री स्टॉलला दुसरा क्रमांक मिळाला. यामुळे त्यांचा उत्साह अधिक दुणावला आणि त्यांनी ठाणे येथील ‘ती’ महोत्सवात सहभाग घेतला. शिवाजी मैदान, जांभळी नाका, नौपाडा, ठाणे येथील ६ मार्च ते ९ मार्च २०१५ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ‘ती’ महोत्सवात ८० स्टॉलमधून त्यांच्या नव निर्मिती बचत गट-चोंढीची उत्कृष्ट सजावट, मांडणी आणि पर्यावरण पुरक वस्तूंची विक्री केल्याबद्दल प्रथम क्रमांक म्हणून निवड झाली.
     प्लास्टिकमुळे पर्यावरणाचे प्रचंड  नुकसान होत आहे, हे पाहूनच त्यानी पर्यावरण पुरक पेपर बॅग्जची निर्मिती करणे सुरु केले आणि त्यासाठी त्यांनी केलेल्या ‘पर्यावरणाचा टळेल र्‍हास, सोडता प्लास्टिकचा हव्यास, यावर आता एकच उपाय, पेपर बॅग हाच पर्याय’ या स्लोगनचाही ते मुक्तपणे प्रचार आणि प्रसार करीत आहेत. त्यांचे सुलेखन असलेल्या एक हजारांहून अधिक पेपर बॅग्जची आतापर्यंत विक्री झाली आहे, यातून समाजात पर्यावरण विषयक जागृती वाढत आहे हे लक्षात येते. याबरोबरच विविध प्रकारचे लेखन असलेली पोस्टकार्ड, ग्रिटींग्ज यांचीही विक्री दोन हजारांहून अधिक झाली आहे.
     विलास समेळ यांना वृत्तपत्र वाचनाबरोबर कथा, कादंबर्‍या वाचनाचाही नाद आहे. त्यांचे स्वत:चे घरात वाचनालय असून त्यात सुमारे १२०० पुस्तके असून ती त्यांनी वाचलेली आहेत. १९९० पासूनचे अनेक दिवाळी अंक त्यांच्या संग्रही आहेत. आवडलेल्या विषयांवरील वृत्तपत्र कात्रणे त्यांच्या संग्रही असून स्वत:सह नामवंत कवींच्या सुमारे तीन हजार कविता त्यांनी स्वत:च्या सुंदर अक्षरात लिहून ठेवलेल्या आहेत. त्यांच्या छंदाला त्यांच्या पत्नी सौ. शिल्पा समेळ, तसेच मुले परेश व मृगेश, सुना सुरभी व माधुरी यांचे उत्तेजन असल्यामुळे आज वयाच्या ६३ व्या वर्षातही आपले जीवन मनस्वीपणे जगत आहेत. विलास समेळ यांचा मो. ८८७९००५८५८

शुक्रवार, १३ मार्च, २०१५

रायगडच्या कलाक्षेत्रातील अष्टपैलू मनीष अनसुरकर

-उमाजी म. केळुसकर ⬑ नाट्य-चित्ररंग ⬉


     अलिबाग तालुक्यातील थळ-चाळमळा येथील मनीष शांताराम अनसुरकर हा संपूर्ण रायगड जिल्ह्यातील एकमेव अष्टपैलू व्यक्तीमत्व असलेला तरुण. बाकीच्यांना दोनचार पैलू असू शकतात. पण मनीष अनसुरकर शब्दश: अष्टपैलू आहेत. अभिनय, दिग्दर्शन, निर्मिती, लेखन, पटकथा, संवाद, व्यंगचित्र, चित्रकला, सुलेखन, काव्य, गीत, संगीत या सर्व क्षेत्रांत त्यांनी आपला दबदबा निर्माण केला आहे. लवकरच त्यांचा ‘माझ्या अलिबागचा कुलाबा किल्ला’ या शीर्षकाचा व्हिडिओ अल्बम रसिकांच्या भेटीला येत आहे.
      कलेच्या क्षेत्रातील ‘दादा’ असलेले मनीष अनसुरकर एक मृदू, पण मनस्वी असं व्यक्तिमत्व आहे. ते अभिनेते, दिग्दर्शक, एकांकिकाकार, नाटककार, निर्माते, संवाद-पटकथाकार, लेखक, व्यगंचित्रकार, चित्रकार, सुलेखनकार, कवी, गीतकार, संगीतकार आहेत. त्यांचे गीत-संगीत असलेला ‘माझ्या अलिबागचा कुलाबा किल्ला’ हा व्हिडिओ अल्बम लवकरच प्रकाशित होणार आहेत.त्यांची निर्मिती असलेल्या या अल्बममध्ये दहा गाणी असून ती गोरख गुंजाळ व रेश्मा पाटील या नामवंत गायकांनी गायिली आहेत. अलिबागमध्ये येणार्‍या पर्यटकांना कुलाबा किल्ल्याची माहिती मिळावी, त्याचा इतिहास कळावा, यासाठी या व्हिडिओ अल्बमची निर्मिती करण्यात येत असून त्यातील नादमय, जोशपूर्ण संगीतावर रसिकांना नृत्याची मेजवानी अनुभवता येणार आहे.
     कलेच्या प्रांतात मनीष अनसुरकर यांची २० वर्षांची मुशाफिरी आहे. शाळा, कॉलेजातून त्यांच्या प्रतिभेला जे धुमारे फुटले त्यांनी आज संपूर्ण कलाविश्‍वच व्यापून टाकले आहे. म्हणूनच आज कलाक्षेत्रात मनीष अनसुकर हे नाव परवलीचा शब्द बनला आहे. मनीष अनसुरकर यांनी प्रारंभी एकांकिका, नाटके यातून अभिनयास सुरुवात केली. नंतर ते दिग्दर्शनाकडे वळले. त्यांनी जिहाद, मेहनाज, गोष्ट उद्याची, द मॉर्ग, ज्याचं त्याचं स्वातंत्र्य,  कॉमेडी ऑफ ट्रॅजेडी, यावश्‍चंद्र दिवाकरौ या एकांकिका लिहिल्या, त्याचे दिग्दर्शन आणि सादरीकरणही त्यांनीच केले. एकांकिका लिहून ते थांबले नाहीत, त्यांनी काल आज आणि उद्या, हम बापके है कौन, आईशपथ शॉलेट, च्यामायला एकदम टॉप, पोत्यातून गोत्यात, तो येत आहे, फियास्को ही नाटके लिहिली, त्यांचे दिग्दर्शनही केले. त्यांच्या एकांकिका व  नाट्यसंहिता पुस्तकरुपानेही प्रसिद्ध झाल्या आहेत.
      मनीष अनसुरकर यांनी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीच्या मालिकांसाठीही पटकथा-संवाद लेखन केले आहे. त्यांनी स्वयंप्रभा या मालिकेसाठी पटकथा-संवाद लिहिले, कुंकू टिकली, तुमचं आमचं जमलं या मालिकांचे संवाद लिहिले, तर रानपाखरे या मालिकेचे लेखन-दिग्दर्शन केले. हिंदी कलर्स वाहिनीच्या देशमे निकला होगा चांद या मालिकेसाठीही संवाद लिहिले. त्यांचे लघुचित्रपटही रसिकांवर, समीक्षक, परीक्षकांवर गारुड करणारे ठरले आहेत. माती माय या लघुचित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन, संवादलेखन त्यांनी केले. व्यर्थ, तसेच इट्या या लघुचित्रपटांचे लेखन-दिग्दर्शक त्यांनी केले. दादू या लघुचित्रपटाची कथा संकल्पना त्यांचीच आहे. बिंयॉड लव्ह या लुघचित्रपटाची कथा त्यांनी लिहिली आहे. इट्याला तर आंतरराष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सवात ४३८ लघुचित्रपटांमधून मानांकन मिळाले होते.
      मनीष अनसुरकर यांनी गीत-संगीत दिलेल्या व्हिडिओ अल्बमचीही यादी मोठी आहे. सादावलेल्या रानातून, श्रावणधून, लालबागचा राजा, आईमाऊलीचा उदोउदो, कावला काव काव करतोय, नमन तुला गणराया, लालबागचा राजा या व्हिडिओ अल्बमसाठी त्यांनी गीत-संगीत दिले आहे. सागरिका म्युझिक, निशब्द क्रिएशन व त्यांनी स्वत: या व्हिडिओ अल्बमची निर्मिती केली आहे. युनिव्हर्सल म्युझिकच्या एकदंत तू, सावळ्या विठ्ठला या व्हिडिओ अल्बमसाठी गीतलेखन केले आहे.
      रॅगिंग या मराठी चित्रपटाची सगळी गाणी मनीष अनसुरकर यांनी लिहिली आहेत. स्ट्रगलर चित्रपटाची दोन गाणी, गोष्ट तिच्या प्रेमाची चित्रपटासाठी एक गाणे त्यांनी लिहिले आहे.
      मनीष अनसुकर यांच्यातील व्यंगचित्रकार सतत जागा असतो. त्यांनी सा. कोकणनामा दिवाळी विशेषांकाबरोबरच महाराष्ट्रातील इतरही नामवंत दिवाळी अंकासाठी व्यंगचित्रे, कथाचित्रे, विविध बाजाच्या कथा लिहिल्या आहेत. अमेरिकेतून निघणार्‍या ‘सावली’ या मराठी दिवाळी विशेषांकासाठी त्यांनी काढलेली कथाचित्रे जागतिक पातळीवर गौरवली गेली आहे. तसेच त्यांच्या चित्रांचीही प्रदर्शने सातत्याने भरवली जातात. त्यांनी ओवीबद्ध, चित्रमय शिवचरित्रही लिहिले आहे. लवकरत प्रकाशित होणारा त्यांचा ‘माझ्या अलिबागचा कुलाबा किल्ला’ हा व्हिडिओ अल्बम रसिकांसाठी एक पर्वणी असणार आहे.
    आपल्या या कलाक्षेत्रातील यशस्वी भ्रमंतीबाबत बोलताना मनीष अनसुरकर सागंतात की, ‘माझ्या कलाक्षेत्रातील वाटचालीला वडील शांताराम अनसुरकर व आई सौ. रोहिणी अनसुरकर, तसेच भाऊ राहुल, बहीण सौ. लतिका राहुल परब यांचे प्रोत्साहन आणि माझ्या कलाक्षेत्रातील मित्रांचे सहकार्य असल्यामुळे हा प्रवास सुसह्य झाला आहे. या माझ्या प्रवासात माझ्या अलिबागचा कुलाबा किल्ला हा मी गीत-संगीत दिलेला व्हिडिओ अल्बम लवकरच प्रकाशित होत आहे, याला महाराष्ट्रातील पर्यटक आणि अलिबागचे नागरिक उदंड प्रतिसाद देतील असा मला विश्‍वास वाटतो.’
     मनीष अनसुरकर यांनी कलाक्षेत्रात ज्या ज्या विषयाला हात घातला आहे, त्यात ते यशस्वी झाले आहेत, त्यामुळे ते त्यांच्या या प्रकल्पातही यशस्वी होतील, यात शंका नाही.  शेवटी ते अष्टपैलू आहेत आणि अष्टपैलू राहतील. खरं ना?