शनिवार, २० फेब्रुवारी, २०१०

अष्टपैलू अभिनेत्री : पूजा जे.

-उमाजी म. केळुसकर ⬑ रायगडचे रंगकर्मी ⬉



     पाण्याविना मासा नाही आणि नृत्याविना वीज नाही, असं म्हणतात. माझीही काय वेगळी परिस्थिती आहे? बालपण ते तारुण्य या मार्गादरम्यान नृत्य आणि नृत्य हाच मी विचार केला. नृत्याशिवाय मी नाही आणि नृत्य माझ्याशिवाय नाही, या जाणीवेने माझी जबाबदारी सतत वाढत राहिली. नृत्याची वीज माझ्या अंगात मुक्तपणे खेळतेय. म्हणूनच ती वीजच बनलेय माझ्या जीवनातील नितांतसुंदर कविता. ती आहे गंगेसारखी निर्मळ आणि हिमालयाइतकी उत्तुंग. नृत्याने केले माझे जीवन समृद्ध आणि अभिनयाने आणले त्यात वैविध्य. याच नृत्याभिनयाने मी चढले एक-एक पायरी यशाची. त्यामुळे आज बनले आहे मी अभिनेत्री ‘रॅगिंग’ एक विकृती’ या मराठी चित्रपटाची, असे मनोगत नृत्यांगना, टीव्ही-चित्रपट अभिनेत्री पूजा जे. व्यक्त करते तेव्हा तिच्यातील कलाक्षेत्राची अभ्यासूवृत्ती आणि त्याबाबतची निष्ठा प्रकर्षाने दिसून येेते. 
     पूजा जे. पनवेल येथील खांदा कॉलनीत राहणारी सुशील युवती. सौंदर्य आणि विनय या आभूषणांनी अलंकृत पूजा जे. हिने बालपणापासून नृत्याचा ध्यास घेतला आणि त्यातून आपली वाटचाल सुरु ठेवली. तिचे जन्मगाव मुरुड-नांदगाव. आजोळ हे तिचे आवडते ठिकाण. टीव्ही वाहिन्यांवरील नृत्याच्या स्पर्धात्मक कार्यक्रमांतून तिने सातत्याने आपली चमक दाखवली, इतकेच नव्हे, तर काही टीव्ही मालिकांत आणि चित्रपटांतही भूमिका केल्या. अशा या पूजा जे. हिची नायिकेची भूमिका असलेला ‘रॅगिंग एक विकृती’ हा मराठी चित्रपट मार्चमध्ये महाराष्ट्रातील चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे, त्यानिमित्त तिच्याशी मारलेल्या या गप्पा.
     पूजा, रॅगिंग एक विकृती’ या मराठी चित्रपटाद्वारे अभिनेत्री म्हणून दमदार पदार्पण करत आहेस, तुला कसं वाटतंय आणि या चित्रपटाच्या कथेची कशी बांधणी केली आहे, याबद्दल सांग?
     - या चित्रपटाद्वारे मी अभिनेत्री म्हणून पदार्पण केलं आहे, त्याबद्दल मला छान-छान वाटतंय. या चित्रपटाचा कथाविषय कॉलेजविश्‍व आणि तेथील रॅगिंग याभोवती फिरणारा आहे. समाजाच्या मूळ प्रवाहापासून दूर असलेल्या एका गावात शिंदे कुटुंब राहतेय. या कुटुंबातील ओंकार शिंदे आणि ऋषीकेश शिंदे हे दोन हुशार भाऊ आहेत. शिकून मोठं व्हायचं. आई-वडिलांना सुखी ठेवायचं. इंजिनिअर व्हायचं हे स्वप्न त्यांनी उराशी बाळगलेलं आहे. परंतु परिस्थितीमुळे वडील एका भावाला शिकवण्याचा विचार करतात. ऋषीकेश शिंदे (हर्ष कुलकर्णी) हा मोठा भाऊ स्वत:च्या स्वप्नाचा विचार न करता आपला छोटा भाऊ ओंकार शिंदे (किरण साष्टे- अलिबाग) याला शहरातल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकण्यासाठी पाठवतो. पण तोच ओंकार शिंदे कॉलेजमधील ‘रॅगिंग’ या विकृतीचा बळी ठरतो. म्हणूनच आपल्या भावाचं अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी व रॅगिंग या विकृतीला मुळापासून संपविण्यासाठी ऋषीकेश शिंदे इंजिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतो आणि ऋषीकेशच्या या सार्‍या रॅगिंग विरोधी लढ्यात जी प्रेमाची, धीराची साथ मिळते ती संचिता हिची. ही संचिताची भूमिका मी साकारली आहे. रॅगिंगमुळे एका मुलीचा बळी जातो तेव्हासुद्धा संचिता म्हणजे मी तीव्र संताप व्यक्त करते. मुलींची रॅगिंग करणार्‍या मोना (पूजा खंडारे- अलिबाग) या सिनिअर विद्यार्थिनीस जाब विचारते व मोनाचं मानसिक परिवर्तन घडवून आणते. थोडक्यात म्हणजे संचिता ही मी साकारलेली भूमिका नायक ऋषीकेश शिंदे याची प्रेयसी म्हणून एक नाजूक प्रेमाचा धागा पुढे घेऊन जाते व वेळोवेळी नायकाला वास्तवाची जाणीव करुन देते. नायक ऋषीकेश शिंदे खलनायक इशांत (ऋषीकेश करमळकर) याला त्याच्या गुन्ह्याबद्दल सरळ मार्गावर आणून पोलिसांच्या हवाली करतो आणि इंजिनिअरिंगची पदवी मिळवून आपल्या भावाचं स्वप्न पूर्ण करतो.
      पूजा, हा चित्रपट तुला कसा मिळाला?
     - २००९ साली या चित्रपटाचे दिग्दर्शक विजय शिंदे यांच्याबरोबर एका मोबाईल फोनच्या जाहिरातीत काम केले होते, त्यांनी या चित्रपटातील मुख्य नायिकेसाठी माझी निवड केली. अनुज क्रिएशन्स/प्रेम एंटरटेन्मेंटची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे निर्माता आहेत अजित काकडे. या चित्रपटाची कथा, पटकथा- संवाद सचिन औटी यांचे आहेत, तर अलिबागच्या अनुराग गोडबोले यांचे संगीत आहे व त्यांनी पार्श्‍वगायनही केले आहे. अलिबाग-थळ येथील मनिष अनसूरकर यांची गीते आहेत तर प्रकल्प वाणी, किरण साष्टे, पूजा खंडारे, संदेश गायकवाड, रणजीत घरत या अलिबागच्या तसेच हर्ष कुलकर्णी (कोल्हापूर), श्रद्धा कांबळी (मुंबई), ऋषीकेश करमळकर (नगर) या कलाकारांच्या या चित्रपटात भूमिका आहेत.
     पूजा, या चित्रपटासाठी तुला माझ्या खूप खूप शुभेच्छा! या क्षेत्रातील तुझा प्रवास सुखाचा होवो, पण तुला कलाक्षेत्राची आवड कशी निर्माण झाली?
     - लहानपणीच कळत नकळत मला नृत्याची आवड निर्माण झाली. ही आवड जोपासली माझ्या मम्मीनी. ती सतत लहानपणापासून माझ्या बरोबर प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित राहायची. तसेच माझ्या यशात पप्पांचाही मोठा वाटा आहे. मम्मी-पप्पांच्या प्रेरणेमुळेच माझी कलाक्षेत्रातील वाटचाल सुकर झाली. ज्युनिअर केजीमध्ये असताना वयाच्या तिसर्‍या वर्षी मी ‘मेंदी लगा के रखना, डोली सजा के रखना’ या गीतावर नृत्य केले आणि उपस्थित पालक- प्रेक्षकवर्गाची वाहव्वा मिळवली. त्यानंतर डोंबिवलीच्या मंजिरी क्लासमध्ये कथ्थकचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. वेस्टर्न डान्सची आवड असल्याने वयाच्या सहाव्या वर्षी डोंबिवली येथील पेसमेकर डान्स ऍकॅडमीत नृत्याचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली. तेथे कोरिओग्राफर योगेश पाटकर यांचे मला मार्गदर्शन मिळाले. त्यानंतर खर्‍या अर्थाने माझा नृत्यप्रवास सुरु झाला. पहिलीपासून नववीपर्यंत शालेय पातळीवरच्या राज्यस्तरीय नृत्यांजली स्पर्धात मी सोलो आणि ग्रुपमध्ये नृत्य सादर करुन पहिल्या आणि दुसर्‍या क्रमाकांची बक्षिसे सोडली नाहीत. त्यामुळे १० वीला असताना माझ्या डोंबिवली येथील मॉडेल इंग्लिश स्कूलने माझा सांस्कृतिक क्षेत्रातील भरीव कामगिरीबद्दल सत्कार केला. या वयात माझा सत्कार केल्याने मला प्रोत्साहन मिळाले आणि जबाबदारीही वाढली.
      पूजा, तू टीव्हीचा छोटा पडदाही आपल्या नृत्याने भारुन टाकलास, त्याबद्दल सांग?
      - मी वयाच्या आठव्या वर्षी सोनी टीव्हीवरील ‘बुगीबुगी’ या नृत्याच्या कार्यक्रमात सहभाग घेतला. प्रथम सोलो आणि आणि दोन वेळा ग्रुपमध्ये असं तीनवेळा मी नृत्याचं सादरीकरण केलं, तेव्हा सोसोला दुसरं आणि ग्रुपला पहिलं बक्षीस मिळालं. जावेद जाङ्गरी, प्रीती झांगियांनी व मिथुन चक्रवर्ती यांच्यासारख्या दिग्गज परीक्षकांनी माझं मोकळेपणानं कौतुक केलं. त्याच वर्षी सह्याद्री वाहिनीवरील ‘दमदमादम’ या नृत्याच्या कार्यक्रमात मी सहभागी झाले. प्रथम सोलो आणि चारवेळा ग्रुपमध्ये नृत्य केले. तेथे मी सोलोमध्ये प्रथम आणि ग्रुपमध्येही प्रथम क्रमांकाची बक्षिसे मिळविली.
वयाच्या ९ व्या वर्षी इ टीव्हीवरील ‘नुपूर’ या नृत्याच्या कार्यक्रमात मी सोलो आणि ग्रुपमध्ये नृत्य सादर केली. तेथे मेगा फायनलला मी प्रथम क्रमांक मिळविला. १० वर्षाची असताना झारखंड येथे राष्ट्रीय पातळीवरील नृत्य स्पर्धेत मी सोलोमधील लावणीनृत्य आणि चित्रपटगीतावर नृत्य केले, तेथे मला पहिल्या क्रमांकाने गौरवण्यात आले. त्याचवर्षी स्टार प्लस टीव्हीवरील ‘क्या मस्ती, क्या धूम’ या कार्यक्रमात ग्रुप डान्स केला. तेथे पहिला क्रमांक मिळाला. तेव्हा परीक्षकांनी माझे तोंडभरुन कौतुक केले. या सुमारास नृत्य दिग्दर्शिका सरोज खान यांचे असिस्टंट महेश दवंडे यांच्याकडे नृत्याचे प्रशिक्षण सुरु केले. मी परिपूर्ण आहे असा कधी दावा केला नाही, म्हणून जिथून जिथून मला नृत्य शिकता आले, तेथून ते मी शिकत गेले. या माझ्या शिकण्याच्या वृत्तीचा फायदा झाला. पनवेल-खांदा कॉलनी येथील महात्मा महाविद्यालयात १२ वीत असताना नॅशनल चॅनेलवरील ‘क्रेझी किया रे’ या कार्यक्रमाच्या पहिल्या पर्वात टॉप फायनल लिस्टमध्ये गेले. परंतु त्यास सुमारास बारावीची परीक्षा आल्यामुळे मला ती स्पर्धा सोडावी लागली. या स्पर्धेच्या परीक्षक म्हणून सुधा चंद्रन, बख्तियार आणि कृष्णा अभिषेक यांनी काम पाहिले होते. त्यांनी बर्‍याचवेळा मला उभी राहून विशेष दाद दिली. दहा पैकी दहा गुणांची बरसात करुन माझे कौतुक केले तेव्हा सागर म्हांडोळकर हे माझे कोरिओग्राफर होते.
      पूजा, तू कर्नाळा स्पोर्टस् ऍकॅडमीमध्येही आपल्या नृत्यकलेची छाप उमटवलीस त्याबद्दल सांग?
      - होय, कर्नाळा स्पोर्टस् ऍकॅडमी माझ्या नृत्यकलेसाठी एक उत्तम व्यासपीठ ठरली. तेथे २००० ते २००६ या सहा वर्षांदरम्यान मी सतत लावणीनृत्य आणि चित्रपटगीत नृत्य या दोन्ही नृत्य प्रकारात प्रथम क्रमांक मिळवला आहे. याच ऍकॅडमीमध्ये सादर करण्यात आलेल्या ‘संभवामी युगे युगे’ या महानाट्यातही मी नृत्य करुन रसिकांना मंत्रमुग्ध केले आहे. तसेच कर्नाळा स्पोर्टस् ऍकॅडमीतील विश्‍वचषक कबड्डी स्पर्धेच्या समारंभात ‘मराठमोळ गाणं, लाखमोलाचं सोनं’ या ‘माहेरची साडी’ या चित्रपटातील गीतावर मी सोलो नृत्य केलं होतं तेव्हा परदेशातील कबड्डीपटू, त्यांचे प्रशिक्षक व त्यांच्याबरोबर अधिकारी यांनी माझे प्रचंड कौतुक केले. माझ्याबरोबर आपले फोटो काढून घेतले, तसेच मला भेटवस्तूही दिल्या.
      पूजा, तू टीव्ही मालिकांत, तसेच चित्रपटात बालकलाकार म्हणूनही काम केले आहेस, त्याबद्दल सांग?
      - मी प्रथम कथ्थक नृत्य शिकले आहे. कथक म्हणजे कथाकथन करणारे नृत्य. त्यात भावभावना, अभिनय या सर्व बाबी अधोरेखित केल्या जातात. या नृत्याचे संस्कार माझ्यावर झाले आणि माझे कुठल्याही प्रकारचे नृत्य अभिनयप्रधान बनले. मी जेव्हा विविध नृत्य स्पर्धात सहभागी होत गेले तेव्हा परीक्षकांनी विशेषत: माझ्या नृत्याभिनयाचे कौतुक केले. या कौतुकामुळे मला प्रेरणा मिळाली आणि मुळात अभिनयाची आवड असल्यामुळे पनवेल येथील मल्हार ऍकॅडमीत मंदार शिंदे वगैरेंकडून अभिनयाचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर एका लघुचित्रपटात प्रमुख भूमिका केली. ‘शक्तीमान’ या मालिकेतील एका मुलाच्या वाढदिवसाच्या समारंभात मी नृत्य केले आहे. त्याप्रसंगी मुकेश खन्ना, वैष्णवी यांचा संस्मरणीय असा सहवास लाभला.
मी दहा वर्षाची असताना ‘छत्रपती शिवाजी’ या मालिकेत भूमिका केली, तसेच बाराव्या वर्षी ‘तोबा- तोबा’ हा हिंदी चित्रपट केला. त्यात जुगल हंसराज यांच्याबरोबर शालेय गणवेशात नृत्य केले आहे. त्यानंतर ११ वीत असताना ‘दोष कुणाचा’? हा मराठी चित्रपट केला. त्यातही माझे नृत्य होते. २०१० च्या अखेरीस सोनी टीव्हीवरील सीआयडी मालिकेत काही भागात मी काम केले आहे. आता मी डान्स इंडिया डान्सफेम टेरेन्स लुईस यांच्याकडे कंटेपरी नृत्यप्रकार शिकते आहे.
       पूजा, पुढे चित्रपट क्षेत्रातच कार्यरत रहायचे आहे काय?
     - सध्या मी एसआयएस कॉलेज, नेरुळ येथे आयटीमध्ये दुसर्‍या वर्षाला आहे. त्यामुळे शिक्षण हे माझे प्रथम ध्येय आहे, तथापि, चांगल्या चित्रपटात, चांगल्या भूमिका मिळाल्या तर त्या मी निश्‍चित करीन.
      पूजा, रॅगिंग एक विकृती’ या चित्रपटापासून तुझ्या काय अपेक्षा आहेत?
      - महाविद्यालयीन जीवनात युवक-युवतींना कमी जास्त प्रमाणात ‘रॅगिंग’ला सामोरे जावे लागते. वैद्यकीय व अभियांत्रिकीसह अन्य उच्च शिक्षणाच्या विद्यार्थ्यांमध्ये रॅगिंगचे प्रकार चालतात. रॅगिंगची चेष्टामस्करी कोणाच्या जीवावर बेतली, तर त्याचे कोणते कौटुंबिक गंभीर परिणाम होतात याची मांडणी या चित्रपटात आहे, या चित्रपटापासून बोध घेऊन रॅगिंग करणार्‍यांनी रॅगिंगपासून परावृत्त व्हावे अशी अपेक्षा आहे. तसेच हा चित्रपट पाहण्यासाठी मोठ्या संख्येने चित्रपट रसिकांनी थिएटर्समध्ये जावे असे मी विनम्र आवाहन करते.
       खरोखरच, पूजा जे. हिच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन ‘रॅगिंग...एक विकृती’ या चित्रपटाला चित्रपट रसिकांनी चांगला प्रतिसाद द्यावा. ती तिच्या शाळेची, कॉलेजचीच नाही, तर संपूर्ण जिल्ह्याची लाडकी आहे. आ. विवेक पाटील यांचा वरदहस्त सतत तिच्या मस्तकावर असतो. तसेच जे.एम. म्हात्रे, बाळाराम पाटील, रवीशेठ पाटील, काशिनाथ पाटील, सईद उस्मानी, सदाशिव साबळे ही मान्यवर मंडळी तिच्यामागे पहाडासारखी उभी आहेत, त्यामुळे निश्‍चितच तिचा प्रवास सुकर झाला आहे. तिच्या पुढील वाटचालीसाठी आणि ‘रॅगिंग... एक विकृती’ चित्रपटास माझ्या शुभेच्छा!

शनिवार, ६ फेब्रुवारी, २०१०

सेलिब्रेटी भटजी : अतुल वीरकर

-उमाजी म. केळुसकर ⬑ रायगडचे रंगकर्मी ⬉



    बालपण! बालपणी सर्वच स्वप्न रंगवतात की, मी ड्रायव्हर, कंडक्टर होणार, परंतु कळायला लागल्यावर मात्र पायलट, डॉक्टर, इंजिनिअर बनण्याची धडपड केली जाते. माझंही स्वप्न होतं, परंतु ते ड्रायव्हर, कंडक्टर किंवा डॉक्टर, इंजिनियर बनण्याचं नाही तर जगावेगळं काहीतरी करण्याचं. या माझ्या स्वप्नाला माझ्या नृत्याच्या आवडीने खतपाणी घातले. ही माझी नृत्याची आवड मला अभिनयापर्यंत घेऊन गेली आणि माझ्या जीवनाला एक वळण मिळाले. आज मी अभिनय आणि पौरोहित्य या दोन्हीही गोष्टी करतो, त्यामुळे निश्‍चितच मला जगावेगळं काहीतरी केल्याचा आनंद मिळतो, असे आपल्या माणगावचे चित्रपट मालिका कलाकार अतुल अशोक वीरकर म्हणतात तेव्हा त्यांच्या मनातील संतुष्टीसह त्यांच्यातील जिद्द, चिकाटी, परीश्रम करण्याची वृत्ती या सकारात्मक गोष्टी समोर येतात. त्यामुळेच त्यांची प्रगतीकडे वाटचाल चालली आहे. सध्या त्यांची ‘मन उधाण वार्‍याची’ ही स्टार प्रवाह टीव्हीवर चित्रमालिका सुरु आहे, त्यानिमित्त त्याच्याबरोबर गप्पांचा जमवलेला हा फड.
     अतुलजी, तुमचं मुळगाव रत्नागिरी जिल्ह्यातील वीरपुरे. तुमचं जन्मगाव आणि शालेय शिक्षण रायगडातील माणगावचे. घरात कोणतीही नृत्याभिनयाची पार्श्वभूमी नसताना तुम्ही त्याकडे कसे वळलात?
     - घरी नृत्य-नाट्य याची पार्श्वभूमी नसली तरी शालेय जीवनात नृत्याची आवड निर्माण झाली. विविध चित्रपट गीतांवर मी नृत्य करायला शिकलो. विनोदी नृत्यप्रकार हे माझे वैशिष्ट्य आहे आणि आजपर्यंत ते मी निष्ठेने जपले आहे.
    अतुलजी, तुम्ही प्रतिकूल परिस्थितीत अनेकानेक नृत्यस्पर्धात सहभागी होऊन यश मिळवले आहे. त्याबद्दल सांना ना?
    - माझी नृत्याची आवड मी जिद्दीने जोपासली. घरची गरिबी, त्यामुळे माझ्या आवडीला घरुन प्रोत्साहन मिळण्याची शक्यताच नव्हती. नृत्य स्पर्धांत सहभागी होण्यासाठीचे शुल्क भरण्याइतपतही माझ्याकडे पैसे नसायचे. यातून मी मार्ग काढला. मी पापड, उद्बत्त्या, कॅलेडर्स घरोघरी जाऊन विकले. घरोघरी पेपर टाकले. त्यातून मिळणार्‍या पैशातून मी जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय नृत्यस्पर्धांत सहभागी झालो आणि यश मिळवत गेलो. ‘एक चतुर नार’ या मेहमुद, सुनीलदत्त अभिनीत गीतनृत्याचे मी साडेचारशेहून अधिक प्रयोग महाराष्ट्रात केले आहेत. इतरही नृत्य त्याच ताकदीने मी केली आहेत, त्यामुळे अतुल वीरकर आणि विनोदी नृत्य हे समीकरण महाराष्ट्रात निर्माण झाले. या नृत्यामुळे मला प्रचंड प्रसिद्धी आणि पुरस्कारही मिळाले आहेत.
      अतुलजी, तुम्ही नृत्याकडून एकदम अभिनयाकडे कसे वळलात, या क्षेत्रातील तुमचे गॉडफादर कोण आहेत?
     - मुंबईमध्ये माझे नृत्याचे कार्यक्रम सुरु असताना सुप्रसिद्ध विनोदी अभिनेते अरुण कदम यांनी मला पाहिले. माझी विनोदी देहबोली पाहून ते प्रभावित झाले. त्यांनी मला सांगितले की, तू अभिनयासाठी प्रयत्न कर. इतके बोलून ते थांबले नाहीत, तर त्यांनी दिग्दर्शक राजू देशपांडे यांना माझे नाव सुचवले, त्यामुळे ‘ई टीव्हीवरील ‘गंगूबाई नॉन मॅट्रिक‘ ही मालिका मला मिळाली. या मालिकेत निर्मिती सावंत आणि पंढरीनाथ कांबळी यांच्याबरोबर काम करायला मला संधी मिळाली. ही माझी पहिली टीव्ही मालिका. त्यामुळे ही मालिका मिळवून देणारे अरुण कदम हे माझे गॉडफादर आहेत, असे म्हणायला अजिबात संकोच वाटत नाही.
     अतुलजी, त्यानंतर पुन्हा तुम्ही निर्मिती सावंत आणि पंढरीनाथ कांबळी यांच्याबरोबर भूमिका केली त्याबद्दल सांगा?
     - ‘गंगूबाई नॉन मॅट्रिक’ नंतर मी झी मराठीवरील ‘वहिनीसाहेब’ या मालिकेत चारशे वर्षांपूर्वीच्या पहिल्या सेनापतीची भूमिका केली. त्यानंतर ‘साम’ मराठीवरील ‘नानीच्या नानाची’ या मालिकेत डॉक्टर आणि स्मशानातील भटजीची भूमिका केली. या मालिकेत निर्मिती सावंत, पंढरीनाथ कांबळी, मी असे तिघेही असल्यामुळे निर्मिती सावंत, पंढरीनाथ कांबळी आणि मी असे आम्ही पुन्हा एकत्र आलो असे म्हटले तर त्यात काहीही वावगे नाही.
     अतुलजी, त्यानंतर तुम्ही कोणकोणत्या मालिकांत तुमच्या अभिनयाचे दर्शन घडवलेत?
     - झी मराठीवरील ‘मालवणी डेज’ या मालिकेत किरवंत ब्राह्मणाची भूमिका केली. ‘साम’ मराठीवर ‘गंगा सिंधूच यमुना’ या मालिकेत वॉर्डबॉयची भूमिका केली. या मालिकेत लीना भागवत, माधवी निमकर, किशोर नांदोस्कर, आशीष पवार, इत्यादी कलाकार होते. इ टीव्हीच्या ‘गोजिरवाण्या घरात’ या मालिकेत डॉ. गिरीश ओक यांच्यासोबत काम केले. छोटीशी असलेली भिकार्‍याची भूमिकाही माझ्या वैशिष्ट्यपूर्ण अदाकारीने रंगवली.
     अतुलजी, तुम्ही चित्रपटातही झळकलात, त्याबद्दल सांगा ना?
      - ‘स्वप्न’ हा माझा पहिला मराठी चित्रपट. यात मी विद्यार्थ्याची भूमिका केली आहे. इंदापूरचे किरण केळुसकर यांच्यामुळे हा चित्रपट मिळाला. त्यांच्या मार्गदर्शन आणि प्रोत्साहनामुळे चित्रपट क्षेत्रात शिरकाव करु शकलो, त्याबद्दल त्यांचा ऋणी आहे. दिग्दर्शक अशोक बहादुरे यांच्या ‘हरी ओम विठ्ठला’ या चित्रपटात सतीश तारे, अरुण कदम यांच्याबरोबर मी एका बेवड्याची भूमिका केली आहे. ती भूमिका विनोदी अंगाने जाणारी असल्याने तिने रसिकांना खळाळून हसवले ही माझ्या दृष्टीने आनंदाची गोष्ट आहे. मी अजय फणसेकरांच्या ’मुक्ती’ या हिंदी चित्रपटातही भूमिका केली आहे. संजय दत्तच्या भावाचा मित्र म्हणून त्यात झळकलो आहे. त्यातील एका आयटम सॉंगमध्ये माझा सहभाग आहे. या चित्रपटात सुनील शेट्टी, सोनिया मेहरा, विजू खोटे इत्यादी कलाकार आहेत.
      अतुलजी, तुमच्या आगामी चित्रपटांविषयी सविस्तर सांगा?
      - ‘हरहर महादेव’ हा माझा येणारा नवीन चित्रपट असून अरुण नलावडे यांच्या अपोझिट गावच्या मास्तराची माझी भूमिका आहे. आगामी ‘वरात आली घरात’ या चित्रपटात भरत जाधव, अंशुमन विचारे यांच्यासोबत मी एका टपोरीचा सीन केला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत विजय गोखले, तसेच मंदार देवस्थळी यांच्या आगामी ‘धटिंग धिंगाणा’ या चित्रपटात हवालदाराची भूमिका केली आहे.
       अतुलजी, मागे वळून पाहिल्यावर आपल्याला काय वाटत?
      - माझी पहिली मालिका ‘गंगुबाई नॉनमॅट्रिक’ प्रसारित होण्याच्या १ वर्ष आधी म्हणजे २००३ साली माझ्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर आई आणि माझे दोन भाऊ अहमदनगरला स्थायिक झाले. मी मात्र माणगावमध्येच अभिनयाचे करिअर करण्यासाठी थांबलो. तेव्हा मला पाठिंबा, मार्गदर्शन आणि प्रोत्साहन माणगावचे अशोक सुर्वे आणि त्यांचे चिरंजीव अविनाश सुर्वे व त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने दिले. अशोक सुर्वे यांना तीन मुले आहेत, परंतु त्यांनी मला चौथ्या मुलाप्रमाणे प्रेम दिले. माणगावचे दिलीप रातवडकर माझ्या सान्निध्यात आले. त्यांनी ’एक चतुर नार’ या नृत्यासाठी माझा मेकअप केला, नंतर ते माझे मेकअपमनच झाले. त्यांचेही प्रोत्साहन मला सतत मिळते आहे. माणगावमध्ये मला अनेकांचे प्रेम मिळते आहे, त्यामुळे तेथे मी स्वत:ला असुरक्षित आणि एकाकी समजत नाही. या सर्वांमुळे मी आतापर्यंत यशस्वी वाटचाल करु शकलो असे मागे वळून पाहता वाटते.
    अतुलजी, तुम्ही अनेक सेलिब्रेटींकडे पूजा, मुहूर्त इत्यादीचे पौरोहित्य केले आहे, त्याबद्दल सांगा?
    - सचिन पिळगावकर, महेश कोठारे, विजय पाटकर, विजय गोखले, जयवंत वाडकर, अशोक शिंदे, परी तेलंग, मैथिली जावकर, माधुरी जुवेकर, विनय येडेकर, सुदेश बेरी इत्यादी अनेकानेक सेलिब्रेटींकडे गणपती बसवले आहेत. पूजा आणि चित्रपट, मालिकांचे मुहूर्त केले आहेत.
    अतुलजी, साम मराठीवरील ‘नानीच्या नानाची’ या मालिकेसाठी पु.ल. देशपांडे सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता पुरस्कार आणि इतरही अनेकानेक पुरस्कार तुम्हाला मिळाले आहेत, आता तुमचे पुढचे ध्येय कोणते आहे?
     -वेदनेतून विनोदाचा जन्म होतो, हे अनेकानेक नामवंतांच्या जीवनचरित्रांतून दिसून येते. मीही गरिबीची वेदना सहन केली, या वेदनेनेच मला विनोदाची दृष्टी दिली. माझी देहबोलीही विनोदाला पुरक आहे, त्यामुळे उत्तम विनोदी अभिनेता बनणे हे माझे ध्येय आहे. या ध्येयाद्वारे दीनदुबळ्यांना खळखळून हसवू शकलो, तर त्यापेक्षा माझे दुसरे कोणतेही भाग्य नाही. सेलिब्रेटी भटजी आणि विनोदी अभिनेता बनणे हे माझे ध्येय आहेच, पण मला ज्या माणगावने माया दिली, त्या माणगावचेही नाव मला उज्ज्वल करायचे आहे.
      अतुल वीरकर एक साधाभोळा २९ वर्षांचा तरुण. त्यांची स्वप्ने ते आपल्या परिश्रमाने आणि जिद्दीने साकार करतील, परंतु माणगावने जे प्रोत्साहन दिलं, तसे संपूर्ण रायगड आणि महाराष्ट्राने त्यांना द्यावं असं म्हटलं तर त्यात काहीही वावगं नाही.