शुक्रवार, १३ डिसेंबर, २०१३

पक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात

-उमाजी म. केळुसकर ⬑ दादागिरी ⬉


       वाढत्या शहरीकरणामुळे भारतातील पंधरा पक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात आले असल्याचा इंटरनॅशनल युनियन फाॅर कन्झेर्वेशन ऑफ नेचर अर्थात आययुसीएन या संस्थेच्या वतीने एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. स्वत:पुरताच विचार करणार्‍या मनुष्यामुळे या पक्ष्यांची जमातच नष्ट होण्याची भिती संघटनेने व्यक्त करुन देखिल याचा कोणावर काहीही परिणाम होणार नाही, ही आजची वस्तुस्थिती आहे. असे का होते? याचा गांभिर्याने विचार करण्याची गरज आहे. 
      आपल्या सुखासाठी आपण निसर्गचक्रात सहभागी असणार्‍या पक्ष्यांकडे दुर्लक्ष करतोच कसे? परंतु चलता है यार! असे यावर अनेकांचे उत्तर असेल हे वेगळे सांगायलाच नको! महाराष्ट्राचा विचार करीत असताना वेगवेगळया भागांकडे बघितल्यावर लक्षात येते, की उत्तरेकडील सातपुडा पर्वतात बेसुमार जंगलतोडीचं प्रमाण वाढलं आहे. त्या भागात घुबडासारखा दिसणारा ङ्गॉरेस्ट ऑवलेट म्हणजेच रानपिंगळा नावाचा छोटा पक्षी आढळतो. स्थानिक बोलीत त्याला डुडा असं म्हटलं जातं. मात्र गेल्या काही वर्षांत जंगलतोडीचं प्रमाण वाढल्याने आज हा डुडा दुर्मीळ प्रजातीत गणला जात आहे. डुडाप्रमाणे आणखी एक पक्ष्याची प्रजाती मोठ्या प्रमाणावर कमी होत आहे, तो म्हणजे, माळरानावर सापडणारा माळढोक. त्याला इंग्रजीत ग्रेट इंडियन बस्टर्ड म्हणतात. महाराष्ट्रात याचं प्रमाण फारच कमी झालं आहे. गवताळ प्रदेशांवरील वाढतं अतिक्रमण हा या पक्ष्यांसाठी सर्वात मोठा धोका आहे. ज्यावेळी या पक्ष्यांचा अधिवास नष्ट होऊ लागतो तेव्हा मोठे पक्षी उडून जाऊ शकतात, पण त्यांची अंडी मात्र जमिनीवरच राहतात. त्यामुळे या प्रजातीचं संवर्धन करायचं असेल, तर त्यांच्या अंड्यांचं संरक्षण झालं पाहिजे. 
      फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात ज्या पक्ष्याचं प्रमाण वेगाने कमी होत आहे तो पक्षी म्हणजे गिधाड. गिधाडांच्या तीन जाती आहेत. पांढर्‍या जातीचं गिधाड, लांब चोचीचं गिधाड आणि पातळ चोचीचं गिधाड. या तिन्ही जाती जवळजवळ ९९ टक्के संपल्या आहेत. गुरांना दिल्या जाणार्‍या वेदनाशामक (पेनकिलर) औषधात डायक्लोङ्गिनॅक नावाचा घटक असतो. गुरांसाठी जरी हे वेदनाशामक असलं, तरी गिधाडांसाठी मात्र ते विष आहे. डायक्लोङ्गिनॅक टोचलेले गाय-बैल मेल्यानंतर दोन दिवसांच्या आत ते गिधाडांनी खाल्लं, तर ती गिधाडं मूत्रपिंड बिघाडाने मरतात. महाराष्ट्रात बरीचशी गिधाडं अशाच प्रकारे मेल्याची नोंद आहे. महाराष्ट्रात अजूनही कोकणात रोहा, फणसाड अभयारण्य, दापोली, मंडणगड तालुका या भागात, तसंच नाशिक, विदर्भ परिसरात थोड्याङ्गार प्रमाणात गिधाडांचं अस्तित्व आढळतं. 
      याव्यतिरिक्त शहरीकरणामुळे पाणथळी जागा कमी झाल्या आहेत, खारफुटी कमी होत आहेत, खाड्या प्रदूषित होत आहेत, खाडयांची पात्रं कमी होत आहेत. खाड्यांच्या कडेला चिखलाची मैदानं असतात ती कमी होत आहेत, त्याच्या आसपास असलेली पक्ष्यांच्या विसाव्याची हक्काची जागा असलेली दाट जंगलं कमी होत आहेत. पक्ष्यांच्या प्रजाती नष्ट होण्यामागे या सर्व गोष्टी कारणीभूत आहेत. वेगवेगळ्या प्रकारची बदकं, फ्लेमिंगो, समुद्रपक्षी, सुरय नावाचा पक्षी, वंचक (हेरॉन), पाणकावळे, विविध प्रकारचे खंड्या, शराटी अशा पक्ष्यांचं जगणं या पाणथळीवर अवलंबून असतं. मात्र तीच नष्ट झाल्याने त्यांचं अस्तित्वच धोक्यात येत आहे. पाणथळी जागा कमी झाल्या मुळे काही पक्ष्यांवर जसा परिणाम झाला, तसाच घनदाट जंगलांचं प्रमाण कमी झाल्यानेही अनेक पक्ष्यांवर परिणाम होत आहे. उदाहरण सांगायचं तर जंगलांचं प्रमाण कमी झाल्याचा सर्वात मोठा फटका हॉर्नबिल म्हणजेच धनेश नावाच्या पक्ष्याला बसला आहे. कारण धनेश पक्षी आपलं घरटं मोठमोठ्या झाडांच्या ढोलीतच बांधतो. आणि मोठमोठी झाडंच नष्ट होत असल्याने त्याचं प्रजनन कसं होणार? शिवाय वेगवेगळ्या झाडांची फळं हेच त्याचं अन्न असतं. त्यामुळे जंगलं नष्ट होऊ लागल्याने त्याचा अधिवासच नष्ट होऊ शकतो. एखाद्या ठिकाणी धनेश पक्षी असणं हे जंगल चांगलं असण्याचं लक्षण मानलं जातं. याशिवाय स्थानिक पातळीवरची शिकार, बेसुमार जंगलतोड, विविध प्रकल्प, अवैध खाणकाम ही पक्ष्यांच्या प्रजाती नष्ट होण्यामागची कारणं सांगता येतील. 
      शहरातील सिमेंटच्या वाढत्या जंगलांमुळे कुठेही माती उरलेली नाही. त्यामुळे मातीत उगवणार्‍या छोट्या झुडपांचा प्रश्नच राहत नाही. छोट्या पक्ष्यांचं खाद्य या झुडपांवरच अवलंबून असतं. खाद्य कमी झाल्यामुळे हे पक्षी कमी होत आहेत. लहानपणापासून आपल्या सोबतीला असलेल्या चिऊताईचं प्रमाण कमी व्हायला याच गोष्टी कारणीभूत झाल्या आहेत. त्याचे कुणाला सोयरसुतक आहे का? आजकालच्या पिढीने चिऊ काऊची गोष्ट ही ऐकली नाही. आणि प्रत्यक्षही कधी त्या पाहिलेल्या नाहीत. पूर्वी ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातही चिमण्या- कावळे दिसायचे. आता केवळ पुस्तकातच त्यांची चित्रे पहावयास मिळतात. मानवाने स्वत:च्या निवासासाठी पशु-पक्ष्यांची निवासस्थान असलेले जंगलच नष्ट करण्याचा विडा उचल्यावर दुसरे काय होणार? आपल्याला सुखासमाधानात रहायला पाहिजे म्हणून दुसर्‍यांचे काहीही झाले तरी चालेल ही वृत्ती सध्या वाढत चालली आहे. याचा प्रत्यय आपल्याला रोजच्या जीवनातही येतो. 
       बेसुमार जंगलतोडीमुळे पर्जन्यमानाचे वेळापत्रकच बदलून गेले आहे. जंगलेच नसल्याने जमिनीची धूप मोठ्या प्रमाणात होते. तसेच ढगाला रोखण्यासाठी झाडेच अस्तित्वात नाहीत. याचे मानवाला काहीच वाटत नाही. लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्याला आळा घालण्याकरिता कोणतीही ठोस पावले उचलली जात नाहीत. परिणामी वाढत्या लोकसंख्येला राहण्याकरीता जागा नाही. मग काय करायचे? तर बिनधास्तपणे जंगले तोडून तेथे अतिक्रमण करायचे. हिंसक प्राणी नागरी वस्तीत येऊन निदान अतिक्रमण केलेल्या मानवावर हल्ला तरी करु शकतात. पण त्यांचाही शेवट हा बंदूकीच्या गोळीवरच लिहिलेला असतो. पक्षी तर काय बिचारे! ज्या घरांवर घरटी बांधतात ती झाडेच तोडली गेल्यावर एक तर दुसर्‍या जंगलाचा आसरा घ्यायचा नाहीतर कालांतराने नष्ट व्हायचे हे दोनच पर्याय त्यांच्यासमोर असतात. आता देखिल ज्या प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे, त्यामध्ये रानपिंगळा, गिधाड, पाणमोर, माळढोक, पांढर्‍या चोचीचा बगळा आदिंचा समावेश आहे. एकीकडे पशु-पक्ष्यांची घरे बेधडकपणे दिवसा ढवळ्या उद्ध्वस्त करायची आणि एवढे होऊनही मनुष्य बिनधास्तपणे उजळमाथ्याने ङ्गिरायला मोकळा. पशु-पक्षी कोणत्याही न्यायालयात दाद मागू शकत नाहीत म्हणून वाट्टेल तसे वागायचा परवाना मनुष्याला मिळाला आहे का? असाच प्रश्‍न मनात उपस्थित होतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा