-उमाजी म. केळुसकर ⬑ खारावारा ⬉
जगाला कोरोना महामारीने गेले सहा महिने स्तब्ध केले आहे. भारताचेही कोरोनामुळे अर्थचक्र गाळात रुतले. वित्तहानी झाली, पण कोरोनापुढे जीवितानेही हार पत्करल्यामुळे अनेक सामान्य-असामान्यांना आपणास मुकावे लागले. देशाचा, राज्याचा, जिल्ह्याचा आणि तालुक्याचा विचार केला, तर कोरोना महामारीकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही, हे पक्के लक्षात घ्यायला हवे. कोरोनामुक्त झालेल्यांचा संख्या मोठी असली तरी कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांचा संख्याही काही कमी नाही, हे विसरुन चालणार नाही. अलिबागचे बांधकाम व्यवसायिक, अलिबाग अर्बन बँकेचे संचालक प्रताप गंभीर यांच्या कोरोनामुळे झालेल्या, चटका लावण्याऱ्या मृत्यूने इतरांनी आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे.
तनया इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रताप गंभीर अलिबागेतील बांधकाम व्यवसायातील बडे प्रस्थ. माझा आणि त्यांचा फारसा संपर्क नाही. दोघेही अलिबागेत असल्यामुळे समोरासमोर भेट झाल्यावर स्मितहास्य करुन पुढे जायचे, यापेक्षा वेगळे काही व्हायचे नाही. एक-दोन वेळा त्यांनी कोकणनामासाठी जाहिराती दिल्या, पण त्याहीपेक्षा जास्त संबंध आला नाही. त्यांचे विश्व वेगळे, माझे विश्व वेगळे. ते समांतर जात नव्हते, त्यामुळे एका शहरात असूनही आम्ही दोन टोकाला होतो. नगराध्यक्ष प्रशांत नाईक मित्रमंडळाच्या सामाजिक कार्यात मात्र त्यांचा सिंहाचा वाटा असायचा. त्यांचे सामाजिक कार्य हेच त्यांच्याकडे मी आकर्षित होण्याची बाब होती.
प्रताप गंभीर स्वामी समर्थांचे भक्त. पिंपळभाटच्या स्वामी समर्थ सेवा केंद्रात नेहमी जायचे, तेथील प्रत्येक उपक्रमात त्यांचा सहभाग असायचा, मला वाटते ते त्यांचे जगण्याचे टॉनिक होते. हे टॉनिक मिळत असल्यानेच बांधकाम क्षेत्रात अनेक चढउतार येऊनही ते ठाम राहिले. अनेक प्रकल्पांना त्यांनी साकार केले. त्यांना कोरोना महामारीने घेरणे आणि त्यातच त्यांचा अंत होणे ही, निश्चितच धक्कादायक बाब आहे.
प्रताप गंभीर यांच्यासह आतापर्यंत अलिबाग तालुक्यात ४३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, त्यामुळे कोरोना महामारी कोणाच्या उंबरठ्यापर्यंत येईल याचा काही नेम राहिलेला नाही. देशात कोरोना बाधितांची संख्या २८ लाख ३६ हजार ९२६ वर पोहोचली आहे. आतापर्यंत २० लाख ९६ हजार ६६५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, तर ५३ हजार ८६६ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात कोरोना बाधितांची संख्या ६ लाख १५ हजारावर पोहोचली आहे. यापैकी २० हजार ६८७ रुग्णांचा मत्यू झाला आहे, तर चार लाख ३८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. रायगड जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची सख्या २२ हाजर ३५३ वर पोहोचली आहेत यापैकी ६७२ रुग्णांचा मृत्यू झाला असून १८ हजार ३३३ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. सद्यस्थितीत ३ हजार ३४८ पॉझिटीव्ह रग्णांवर उपचार सुरु आहेत. अलिबाग तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या १ हजार ५२१ वर पोहोचली आहे. यापैकी ४३ रुग्णांचा मत्यू झाला तर १ हजार २२२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. २५७ रुग्णावर उपचार सुरु आहेत. ही सर्व आकडेवारी तासातासाला बदलत असल्यामुळे हा लेख वाचेपर्यंत या आकडेवारीत चढउचार झालेला पहायला मिळेल, तथापि मृत्यूची टक्केवारी कमी असली तरी मृत्यूची संख्या कमी नाही हे लक्षात घेतले पाहिजे.
दोन दिवसांवर गणेशोत्सव आला आहे. कोरोना महामारी धर्म बघत नाही, सण-उत्सव बघत नाही, त्यामुळे सर्व जनतेनेे सावधगिरी बाळगून आपल्या घरातच गणेशोत्सव साजरा करुन जनसंपर्क टाळला पाहिजे. आतापर्यंत असा समज होता की प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे बालके आणि वृद्धांना कोरोनाचा धोका असतो, पण प्रत्यक्षात तरुणांनी सावधगिरी न बाळगल्यामुळे त्यांचेच मृत्यू कोरोनामुळे अधिक झाले आहेत. कोरोनापासून बचाव व्हावा यासाठी काही बाबींची काटोकोर पूर्तता होणे गरजेचे आहे. पचापचा कुठेही थुंकणार्यांनी आपल्या तोंडावर लगाम घातला पाहिजे. कारण त्यांच्या या सवयी जाताना दिसत नाहीत. त्यांच्या या सवयीने दुसर्यांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो हे त्यांनी लक्षात घेतले पाहिजे. मास्कचा वापर करणे व हातांची, तसेच शरीराची स्वच्छता ठेवणे, पिण्यासाठी थंड पाण्याचा वापर न करणे, पौष्टिक आहार आणि योग्य व्यायाम करण्याची गरज आहे. प्रतिकारशक्ती वाढवूनच कोरोनाला हरवायचे आहे. कोरोनापेक्षा कोरोनाच्या संशयाने, किंवा त्याच्या धास्तीने होणारा मनस्ताप जास्त आहे. त्यामुळे हा मनस्ताप होऊ नये, याच्यावर काळजी घेणे हाच एक सर्वोत्तम उपाय आहे. अशी काळजी घेतली नाही, तर कोरोनाचे आक्रमण प्राणघातकही ठरु शकते. रोज डोळ्यासमोर वावरणारे बांधकाम व्यवसायिक प्रताप गंभीर कोरोनाने गेले, यापुढे कोणीही कोरोनाने जाऊ नये, याची दक्षता घ्यायलाच हवी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा