बुधवार, २ ऑगस्ट, २०१७

जुन्या पुलांचा आक्रोश अजूनही सुरुच आहे...

 -उमाजी म. केळुसकर ⬑ खारावारा ⬉


    कोकणवासियांना गटारी अमावस्या, म्हणजेच आषाढ अमावस्या दोन दुर्दैवी घटनांनी कायम लक्षात राहणारी आहे. एक घटना म्हणजे ७९ वर्षांपूर्वी १९४७ ला शनिवार, १७ जुलै रोजी रेवसजवळील झालेला रामदास बोटीचा दुर्दैवी अपघात आणि दुसरी घटना म्हणजे गेल्या वर्षी, मंगळवार, २ ऑगस्टला रात्री अकरा-साडेअकरा वाजता मुसळधार पावसात महाडचा सावित्री नदीवरील ८८ वर्ष जुना पूल कोसळण्याची. या दोन्ही घटनांच्या तारखा वेगळ्या असल्या तरी तिथीने त्या एकाच दिवशी घडल्या. ती गटारी अमावस्या म्हणजेच दीपअमावस्या होती. पण त्या पावसाळी रात्री बळी पडलेल्यांच्या नशिबी प्रकाश नव्हता, दुसर्‍या दिवशी येणारा मनभावन श्रावण नव्हता तर अमावस्येचाच काळाकुट्ट अंधार होता. आज तिथीनुसार अमावस्या नाही, पण तारीख तीच म्हणजे २ ऑगस्ट आहे. आज महाड सावित्री पूल दुर्घटनेला १ वर्ष पूर्ण होत आहे. या दरम्यान वाहून गेलेल्या त्या पुलाशेजारी नवा पूल बांधण्यात आला असला तरी त्या दुर्घटनेच्या जखमा ओल्याच आहेत. जेव्हा कोकणातील सर्व जुन्या पुलांचे नूतनीकरण होईल, तेव्हाच ती सावित्री पुलाच्या दुर्घटनेत बळी ठरलेल्यांना श्रद्धांजली असेल.
    मुंबई-गोवा महामार्गावरील महाड-पोलादपूर दरम्यान राजेवाडी ङ्गाट्याजवळ सावित्री नदीवर १९२८ साली ब्रिटीश राजवटीत बांधण्यात आलेल्या पुलाचे आयुष्य संपत आल्याने त्याच्या शेजारी नवा पुल १५ वर्षांपूर्वी बांधण्यात आला होता. सदर नवा पुल जाण्या-येण्यासाठी न वापरता जुना पुल येण्यासाठी आणि नवा पुल जाण्यासाठी वापरला जात होता. वास्तविक जुन्या पुलावरील वाहतूक बंद करणे गरजेचे होते. परंतु जुना पुल मजबूत असल्याने अजून काही काळ त्यावरुन वाहतूक सुरु ठेवण्याचा अभिप्राय राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अभियंत्यांनी दिला. त्यामुळे नवीन पूल बांधूनही एकमार्गी वाहतुकीसाठी जुना पूल वापरात ठेवला. तोच जुना पुल मंगळवार, २ ऑगस्टला रात्री अकरा-साडेअकरा वाजता पुरात वाहून गेला. त्याबरोबर जयगड-मुंबई व राजापूर-बोरिवली या दोन एसटी बसेसही बुडाल्या. इतर काही वाहनेही वाहून गेली. या दुर्घटनेत जवळपास ४२ जणांना जीव गमवावा लागला. त्यातल्या काहींचे तर मृतदेहही मिळाले नाहीत. रायगड पोलीस, राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाचे (एनडीआरएङ्ग) जवान, नौदल आणि तटरक्षक दल आणि स्थानिक सेवाभावी संस्था यांच्याकडून महिनाभर शोधकार्य राबविण्यात आले. नौदल आणि तटरक्षक दलाने पाणबुड्या, हेलिकॉप्टरच्या सहाय्याने शोधकार्य सुरु केले. मुख्यमंत्री देवेंद्र ङ्गडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी ङ्गडणवीस यांनी बचावकार्याचा आढावा घेतला आणि अधिकार्‍यांना आवश्यक सूचना दिल्या. 
  वास्तविक ब्रिटिश सरकारने २०१३ च्या सुमारास भारत सरकारला महाडच्या सावित्री पूलासह कोकणातील अन्य ३६ पुलांचे आयुष्य संपलेले असून ते कालबाह्य व वाहतूक करण्यास योग्य नाहीत असे कळविलेले आहे. स्थानिक रहिवाशांनीही जुना पूल धोकादायक झाल्याचे राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या निदर्शनास आणून दिले होते. खरे तर स्थानिकांच्या सूचनांचा विचार करून त्याच वेळी जुन्या पुलावरील वाहतूक बंद केली गेली असती तर त्या ४२ निष्पाप लोकांचे जीव नक्कीच वाचले असते. मुंबई-गोवा महामार्गातील धोकादायक पुलांचे सर्वेक्षण २०१६ च्या मे महिन्यात तज्ज्ञ अभियंत्यांनी केले होते व त्याबाबतचा अहवालही त्यांनी संबंधित विभागाच्या उच्चपदस्थांकडे सोपवला होता. सर्वेक्षणात सुरक्षित पुलांच्या यादीत सावित्री नदीवरील महाडच्या जुन्या पुलाचाही समावेश होता. पण तोच जुना पूल वाहून गेला. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल असे त्यांनी सांगीतले. पण दोषी कोण आढळले आणि त्यांच्यावर कोणती कारवाई झाली, हे अजून गुलदस्त्यातच आहे. पण त्यावेळी रायगडचे पालकमंत्री प्रकाश महेता यांची निष्क्रियता ठळकपणे समोर आली. त्यांच्या सेल्फीप्रकरणाने घटनेचे गांभीर्य पालकमंत्र्यांना किती आहे, असा प्रश्‍न निर्माण झाला. 
    ६ ऑगस्टला केंद्रीय रस्ते व राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी दुर्घटनास्थळी गेले तेव्हा त्यांनी  निविदा निघाल्यानंतर तेथे सहा महिन्यात नवा पूल बांधण्यात येईल, असे जाहीर केले. त्यानुसार त्यांनी दुर्घटनेनंतर दहाच महिन्यात १८० दिवसांचे उद्दीष्ट असताना नवा पूल १६५ दिवसात ३१ मे २०१७ रोजी पूर्ण केला. त्याचे उद्घाटन केंद्रीय रस्ते व राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी. मुख्यमंत्री देवेंद्र ङ्गडणवीस, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांच्या उपस्थितीत ५ जून २०१७ रोजी झाले. सावित्रीवर नवा पूल बांधला गेला पण इतर जुन्या पुलांचा प्रश्न कायम आहे. गोवा-मुंबई महामार्गावर रायगड जिल्ह्याच्या हद्दीत असे जुने १० च्या जवळपास ब्रिटीशकालीन धोकादायक पूल आहेत. त्यांचे दुखणे आहेच. पण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार क्षेत्रातीलही मार्गावर, गावांत ब्रिटीशकालिन पूल, तसेच स्वातंत्र्यानंतर बांधलेले अनेक पूल कमकुवत झाले आहेत, त्याचे कठडे कोसळले आहेत. तेही नूतनीकरणासाठी आक्रोश करीत आहेत. परंतु आक्रोश मुर्दाड व्यवस्थेला ऐकू येत नाहीत. सार्वजनिक बांधकाम विभागाने, राज्य सरकारने आता तरी ग्रामीण भागातील रस्ते आणि पूल यांच्या बाबतची उदासिनता सोडली तरच ती सावित्री पूल दुर्घटनेतील मृतांना खरी श्रद्धांजली ठरेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा